मी केलेल्या अमीरबाई कर्नाटकी या कन्नड पुस्तकाच्या मराठी भाषांतराच्या निमित्ताने माझा त्या पुस्तकाचे लेखक रहमत तरीकेरी यांचा जवळून परिचय झाला. आता माझा आणि साहित्य, लेखक यांच्याशी असा परिचय यापूर्वी असण्याचे काहीच कारण नव्हते. मला थोडीफार वाचनाची आवड आहे इतकेच. त्यामुळे त्यांचा परिचय झाला ही माझ्यासाठी विशेष बाब आहे. येथे आज त्यांची थोडी ओळख करून द्यावे असा विचार करून लिहायला बसलो आहे.
गोहारबाई आणि अमीरबाई
२०१० मध्ये हा सिलसिला सुरु झाला. एका कन्नड मासिकात बालगंधर्व आणि गोहारबाई यांच्यावर रहमत तरीकेरी यांनी लिहिलेला मी लेख माझ्या वाचनात आला. त्यांच्याशी संपर्क करून, मी तो लेख मराठीत करूयात अशी विचारणा केली. त्यांनी थोडेसे कचरतच मला परवानगी दिली, याचे प्रमुख कारण, त्यात गोहारबाई यांची बाजू मांडली गेली होती, आणि त्यांना धास्ती अशी होती की मराठी रसिकजन ते कसे स्वीकारतील. मी मराठीत तो लेख भाषांतरीत करून ग्रंथालीचे आणि थिंक महाराष्ट्रचे दिनकर गांगल यांच्याकडे पाठवला. त्यांनी तो प्रसिद्ध केला. वाचकांना तो आवडला आणि बरीच मतमतांतरे झाली. पुढे काही दिवसांनी तरीकेरी मला अमीरबाई कर्नाटकी पुस्तकाबद्दल सांगितले. त्याचे मराठी भाषांतर करायलाही त्यांनी मला परवानगी दिली.
लोकसंस्कृती संशोधक, साहित्य समीक्षक
तो पर्यंत रहमत तरीकेरी हे काय प्रकरण आहे याचा मला अंदाज आला होता. त्यांचा चिक्कमंगळूर जिल्ह्यातील समतळ येथे जन्म(१९५९) झाला. पुढे तरीकेरी, शिमोग्गा, मैसूर येथे शिक्षण झाले. हम्पी येथील कन्नड विद्यापीठात साहित्याचे प्राध्यापक, विभाग प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे. वेगवेगळे उपासना पंथ/भक्ती संप्रदाय, साहित्य समीक्षा, साहित्य मीमांसा, संस्कृती चिंतन, नियतकालीकातून लेखन, लोकसाहित्य क्षेत्रात संशोधन आणि लिखाण, आणि त्यानिमित्ताने भारतभर प्रवास त्यांनी केला आहे. त्यांच्या काही साहित्यकृती अश्या आहेत-प्रतीसंस्कृती, मरदोळगण किच्चू, कर्नाटकद सुफीगळू, कर्नाटकद नाथपंथ, कित्तीयंचीन दारी, चिंतनेय पाडू, इल्ली यारू मुख्यरल्ला, मातु तलेयत्तुव बगे, अंडमान कनसु, कदळी होक्कूबंदे, धर्मपरीक्षे, नडेदोशट्टुनाडू, नुडी संकर साहित्य, कन्नड साहित्य वाग्वादगळू इत्यादी. १९९३, १९९८, २००० मध्ये कर्नाटक साहित्य अकादेमी, २००८ मध्ये जीएसएस, लंकेश हामाना, २०१० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ह्यातील काही पुस्तके मी मागवली आणि त्यांचेही भाषांतर करावयाचा मानस आहे. जसे त्यांचे पुस्तक ज्यात कर्नाटकातील सुफी पंथाविषयी त्यांनी अतिशय विस्ताराने, त्या सुफी संतांबरोबर फिरून, संशोधन करून लिहिले आहे. तसेच त्यांचे कर्नाटकातील नाथपंथ याविषयीचे पुस्तक तर नक्कीच मराठीत यावे. त्या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांची थोर संशोधक रा. चिं. ढेरे यांच्याशी त्यांची ओळख झाली. मराठी आणि कन्नड भाषेतील संस्कृतीचा अजून एक समान धागा ह्यामुळे जोडला गेला.
त्यांची पहिली पुणे भेट
माझी आणि त्यांची प्रत्यक्ष भेट व्हायला २०१३ साल उजाडावे लागले. तो पर्यंत माझा आणि त्यांचा फोन, ईमेल असाच संवाद होत होतं. २०१२ च्या मे मध्ये मी हम्पीस गेलो होतो, पण मला वेळ नसल्यामुळे मला त्यांची भेट घेता नाही आली. पुण्यात भेट होण्यास निमित्त ठरले ते मी आणि चैतन्य कुंटे असे दोघे मिळून सुदर्शन संगीत सभेच्या अंतर्गत त्यांचे बिळगी भगिनी(Bilagi Sisters, अर्थात अमीरबाई आणि गोहरबाई कर्नाटकी) याविषयावर सदीप व्याख्यान ठेवले होते. त्यांच्या प्रथम दर्शनाने तर मला चकितच केले. अतिशय साधे कपडे, पाठीवर हॉवरसक. अतिशय चिकित्सक नजर, भरभर चालणे, आणि सतत पडणारे प्रश्न ही काही ठळक वैशिष्टे.
रहिमत तरीकेरी यांच्या समवेत
त्यांची ही काही पुण्यास पहिलीच भेट नव्हती. अमीरबाई यांच्यावरच्या पुस्तकाच्या निमित्ताने ते पुण्यातील FTII मध्ये आले होते एक-दोनदा. मी माझ्या यथामती त्यांचे विचार आणि प्रेरणा समजावून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती, भाषा, पुण्याचा इतिहास, मराठी-कन्नड भाषेत यापूर्वी काम केलेले अनेक व्यक्ती याबद्दल आमच्या चर्चा झाल्या. त्यांची एकूणच जीवनातल्या आणि संस्कृतीच्या प्रत्येक क्षेत्रात रुची होती, माहिती होती-खाद्य संस्कृती असो, भाषेमधील लकबी आणि विशिष्ट शब्द असोत, त्यांचे विचार त्यांनी मनमोकळेपणाने माझ्याबरोबर आणि माझ्या कुटुंबियाबरोबर वाटले. त्यांची कन्नड भाषा जी अतिशय वेगळी आणि कर्णमधुर वाटत होती. त्या वेळेस कार्यक्रमाच्या निमित्ताने २ दिवस माझ्याकडे राहिले आणि आम्ही समृद्ध होवून गेलो. माझ्या घरच्या वास्तव्यात त्यांनी अगदी मनमोकळेपणे, कसलाही अहं न दाखवता, अतिशय मितभाषीपणे संवाद साधला, त्यांच्याकडे असलेली त्यांच्या हम्पी येथील घराची छायाचित्रे त्यांनी आम्हाला दाखवली. त्यांचा सुदर्शन रंगमंच येथील कार्यक्रमही सुंदर झाला. त्यांच्या अमीरबाई कर्नाटकी पुस्तकाच्या संशोधनाच्या निमित्ताने अनेकांशी त्यांचा संपर्क झाला आहे, तसेच त्यांनी बरीच माहिती, आणि गाणी, जुनी छायाचित्रे त्यांनी गोळा केली होती. त्याचा वापर करून त्यांनी अतिशय खुबीने कार्यक्रम रंगवला.
मराठी भाषांतर आणि प्रकाशनाच्या निमित्ताने
त्यांची दुसरी भेट अमीरबाई पुस्तकाच्या मराठी भाषांतराच्या प्रकाशनाच्या निमित्ताने झाली. त्याधीही, त्यांच्या बरोबर, १-२ वर्षे सततचा फोन, ईमेल वर संपर्क होताच. भाषांतर अचूक आणि त्यांनी सुचवलेले पर्याय यावरून त्यांचा व्यासंग, आणि आपले काम परफेक्ट करण्याचा त्यांचा असलेला कायमचा प्रयत्न दिसून आला. तसेच अमीरबाई आणि गोहरबाई यांचे आयुष्य आणि त्यांनी केलेला संघर्ष जगासमोर आणण्यासाठीची त्यांची मनापासूनची तळमळ मला कायम दिसून आली. मराठी आवृत्तीसाठी त्यानीच मला FTII कडे असलेले अमीरबाई यांचे दुर्मिळ आणि सुंदर छायाचित्र घेण्यास सुचवले. डिसेंबर २०१४ मध्ये प्रकाशन होते मुंबईस. ते पुण्याला आल्यानंतर आमच्याबरोबर मुंबईस प्रकाशन सोहळा पाहण्यास आले. त्यांना अतिशय उत्सुकता होती, की मराठी साहित्य विश्वात, कसे काय कार्यक्रम होतात, आणि ते प्रत्यक्ष पाहण्याची. तो सोहळा त्यांना खूप भावला आणि समाधान व्यक्त केले. त्याचे दुसरे असे कारण होते की ज्या अमीरबाईने मुंबई हे आपले कार्यक्षेत्र निवडले होते, तेथे त्याच्यावरच्या पुस्तकाचा प्रकाशन होत होता.
तर असे हे रहमत तरीकेरी. कन्नडमधील पुरोगामीवृत्तीचे संस्कृती आणि साहित्य समीक्षक, साहित्य संशोधक, लेखक. त्यांची इतरही पुस्तके मराठीत आली पाहिजेत, आणि मराठी जगताला त्यांच्या कार्याचा आणखीन परिचय व्हायला हवा.