पूर्वीच्या काळी गावातून, अथवा तालुक्याच्या ठिकाणाहून मुंबईला गेले की अगदी वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे होई. मोठे शहर, ट्राम, मोठमोठ्या जुन्या इमारती, चाळी, गर्दी वगैरे पाहून लोकं अचंबित होत. चार दिवस हे लोक मुंबईत येऊन या सगळ्याची मजा घेऊन परत गावी जाऊन आपल्या राम-रगाड्यात गुंतून जात. ह्या सर्वाचे निर्देशक म्हणून जीवाची मुंबई करणे हा वाक्यप्रचार देखील प्रचारात आला. आजकाल मुंबईला जाणे हे काही अप्रुपाची गोष्ट राहिली नाही. डेक्कन क्वीन सारख्या रेल्वेतून, द्रुतगती मार्गावरून चाकरमाने आणि इतर दररोज पुणे मुंबई पुणे असा प्रवास करतात. मीही आपल्या सर्वांप्रमाणे कित्येकदा या ना त्या कारणाने मुंबईला गेलो आहे. कामानिमित्त, किल्ले पाहायला, तसेच नेहमीचे फिरायला म्हणूनही गेलो आहे. मुंबईचे, विशेषतः दक्षिण मुंबईतील, जुन्या मुंबईचे आकर्षण फिरण्यासाठी आकर्षण कमी होत नाही. अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईचा पोवाडा, मुंबईचे वर्णन सारखी पुस्तकांतून, आणि इतर कथा/कादंबऱ्यामधून आपल्याला थोडाफार १९व्या, २०व्या शतकातील मुंबई कशी होती हे समजते. तसेच जुन्या चित्रपटांमधून देखील तीचे दर्शन होतेच. उदाहरणादाखल, गिरीश कर्नाड यांनी त्यांच्या आत्मचरित्रात मुंबई वास्तव्याचा उल्लेख केला आहे. ते एके ठिकाणी म्हणतात, की मुंबईचा नकाशा पाहिला तर असे वाटते की एखादा अरबी माणूस समुद्रात आपले बाहू पसरून उभा आहे.
परवा असेच काहीतरी निमित्त होऊन मुंबईला गेलो, थोडासा वेळ होता म्हणून जीवाची मुंबई करण्याचा बेतही आखला. आमचा पहिला पाडाव नव्या मुंबईत नेरूळ येथे एका नातेवाईकांकडे होता. मुंबईत जुन्या गोष्टीबरोबर दरवर्षी काहीना काही तरी पाहण्यासारख्या नवीन गोष्टींची भर पडतच जात असते. १२-१५ वर्षांपूर्वी IMAX theater, fly-overs, द्रुतगती मार्ग, INS Vikrant Museum(जे नामशेष झाले आहे आता), Essel World, Water Kingdom नवीन होते. ह्या वेळेस Sea Link, Metro Railway, नुतनीकरण झालेले Royal Opera House, गोराईचा बौद्ध धर्मीय Golden Pagoda, आणि अजून काही गोष्टी वगैरे गोष्टी डोक्यात होत्या. त्यादिवशी संध्याकाळी मी नेरूळहून नवीन Eastern Freeway वरून थेट Royal Opera House येथे एका कार्यक्रमासाठी म्हणून गेलो. त्याबद्दल येथे सविस्तर वेगळेच लिहिले आहे.
त्या नंतर रात्रीची मुंबई पाहिली. कशी? रात्रीची मुंबई पाहण्यासाठी MTDC ने छान सोय केली आहे असे ऐकले होते. Gateway of India येथे त्याची तिकिटे मिळतात, आणि नंतर Hornbill House/Wellington Fountain येथून सहल सुरु होते. त्यांच्या वरून खुल्या असलेल्या डबल डेकर बसमधून(Open Deck, नीलांबरी) रात्रीची जुनी मुंबई, तेथील इमारतींवरील रोषणाई पाहत तास दीडतास त्यांच्या गाईडची बडबड ऐकत फिरणे हा छान अनुभव आहे. त्यातील मुंबई महापालिका आणि सीएसटी इमारत(पूर्वाश्रमीची व्हीटी) यांच्या वरील रोषणाई पाहण्यासारखी असते. Western Railway चा मुख्य कार्यालयाच्या इमारतीवर त्यादिवशी रोषणाई नव्हती. जुन्या मुंबईच्या संस्कृतीचा, ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारती यांचे जतन हा एक मोठा विषय आहे. तसेच मुंबईतील खाद्य भटकंती हा देखील एक मोठा विषयच आहे खरेतर. रात्रीच्या मुंबईची धावत्या भटकंती नंतर, आम्ही स्वाती नावाच्या गुजराती पदार्थ हे वैशिष्ट्य असणाऱ्या हॉटेल मध्ये विविध पदार्थांवर मस्त ताव मारला. रात्री परत अंधेरीला मुक्कामासाठी येताना जांभळ्या रंगात रोषणाई केलेल्या Sea Link वरून येताना एकदम मस्त वाटते.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बांद्र्यात फिरायचे होते. प्रथम तेथील जुने असे हळू हळू अस्ताला पावणारे इराणी हॉटेल Good Luck Restaurant मध्ये चक्कर मारली. जवळच चित्रपट चित्रीकरणासाठी प्रसिद्ध साले मेहबूब स्टुडिओ आहे, तो पहायचा राहून गेला. नंतर तेथील टेकडीवरील १०० वर्षांहून अधिक जुने Mount Mary Church पाहायला गेलो. त्यावेळेस नेमके तेथे प्रार्थना चालू होती, आणि त्या दिवशी Palm Sunday देखील होता. नंतर बांद्र्यातील जुना १६व्या शतकातील पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला(खरे तर त्याचे अवशेष) पाहिला. त्याचे पोर्तुगीज नाव Castella de Aquada. तो सर्व परिसर छान आहे. जवळच Taj Lands End नावाचे हॉटेल आहे. किल्लावरून Sea Link, आणि अर्थात समुद्राचे नयनरम्य दृश्य दिसते. पण ह्या भागाला Bandstand म्हणतात, का ते कळाले नाही. पूर्वी तेथे bands वाजवले जात असत की कोण जाणे.
नुकतेच असे वाचले होते की वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर कासवे दृष्टीस पडली, कचरा, घाणीविना असलेला किनारा, कासवे यांचे छायाचित्र देखील आले होते. बांद्र्यापासून जवळच होते, म्हणून पाहायला गेलो तर निराशाच झाली. तेथे दहा मिनिटे देखील थांबू शकलो नाही. त्यानंतर मोर्चा वळवला तो जुहू भागातील नाट्यक्षेत्रातील जुने, प्रसिद्ध असे ठिकाण म्हणजे पृथ्वी थिएटर पाहायला गेलो. पृथ्वीराज कपूरने सुरु केलेले, तसेच पुढील पिढीने जतन, संवर्धन केले हे नाट्यचळवळीतील महत्वाचे ठिकाण. त्या दिवशी सकाळी तेथे दुर्दैवाने काही नाट्यप्रयोग नव्हता, तो होता रात्री. त्यामुळे प्रयोग पाहण्यासाठी, तसेच NCPA देखील पाहण्यासाठी परत यावे लागेल!
शाहरुख खानचा मन्नत बंगला पाहिला तसेच अमिताभ बच्चनचे प्रतीक्षा, जलसा हे बंगले लांबूनच पहिले. दुपार होऊन गेली होती, जेवण करून मेट्रो रेल्वेने घरी जायचे ठरले होते. Gonguura नावाच्या हॉटेलमध्ये आंध्र प्रदेश/तेलंगणा स्टाईल जेवण केले, मेट्रोने जायचा कंटाळा आला, उन मी म्हणत होते, म्हणून सरळ रिक्षा करून घरी पोहचलो.
पूर्वीच गेटवे ऑफ इंडिया आणि परिसर, घारापुरीची लेणी(परवा ऐकले की तेथे नुकतीच वीज आली, म्हणजे इतकी वर्षे वीज नव्हती?!), Strand Book Stall(जे नुकतेच बंद झाले), Prince of Wales Museum, RBI Coin Museum, जहांगीर आर्ट गॅलरी, काला घोडा परिसर(कलेच्या विश्वात प्रसिद्ध असलेल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्स राहिलेच आहे पाहायचे), मुंबई विद्यापीठ वगैरे गोष्टी पहिल्या होत्याच. पण ह्या सर्व गोष्टी आणि आणखीन कितीतरी गोष्टी सवडीने, चालत चालत(Bombay Heritage Walks) परत पाहायला हव्यात. काही वर्षात मुंबईच्या समुद्रात शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, स्मारक निर्माण होत आहे, तेही नक्कीच पर्यटकांमध्ये hit होणार यात शंका नाही.
अशी दोन दिवसांची जीवाची मुंबई करून, रात्री परत पुण्याला घरी पोहचलो आणि सहज टीव्ही लावला, तर एके ठिकाणी मुंबईमधील मराठी टक्का कमी होतोय, मेट्रो मुळे, तसेच परळ आदी भागातील जुन्या कापड गिरण्या नामशेष झाल्या आणि त्यांच्या जागेवर मोठमोठाल्या इमारती, मॉल्स उभारली गेली, या सर्वांमुळे देखील, त्यात हा टक्का कमी होण्यात आणखीन भर पडते आहे असा सूर असलेला रिपोर्ताज चालू होता. मी मनात म्हटले हा तर काळाचा महिमा!