कन्नड नाटक आणि मी

काही दिवसांपूर्वी कन्नड नाटक या विषयावर माझे भाषण झाले. धारवाडच्या अभिनय भारती या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मला बोलण्याची संधी मिळाली होती. हा ब्लॉग म्हणजे ते संपादित भाषण आहे. गेली चार दशके हि संस्था कर्नाटकात कन्नड नाटक चळवळीशी निगडीत आहे. पुण्यात राहून कन्नड भाषेत, त्यातही कन्नड नाटक विषयी काम करणाऱ्या चार वक्त्यांना बोलावण्यात आले होते. हा कार्यक्रम फेसबुक लाइव्ह होता. प्रसिद्ध अनुवादिका उमा कुलकर्णी यांचे देखील भाषण झाले, आणि त्या कन्नड नाटकांच्या अनुवादांशी निगडीत अनुभवांबाबत बोलल्या. वेळेअभावी मी पाहिलेल्या सगळ्याच कन्नड नाटकांबद्दल खूप बोलता आले नाही. पण मी त्या त्या वेळेला लेख लिहिले आहेत, त्यांची संकेतस्थळे मी येथे दिली आहेत.

कार्यक्रम पत्रिका

तो कार्यक्रम युट्युब वर उपलब्ध आहे.

नमस्कार

सर्वात आधी मी माझी ओळख करून देतो. माझे नाव प्रशांत कुलकर्णी, पुण्यात राहतो. पण माझे मुळ कर्नाटक, निंबाळ गावाचा. माझे प्रमुख कार्यक्षेत्र म्हणजे माहिती तंत्रज्ञान, ज्यात मी गेली ३० वर्षे कार्यरत आहे. छंद, किंवा हौस म्हणून इतर बऱ्याच क्षेत्रात माझी लुडबुड चालू असते. मी सह्याद्री डोंगररांगांमध्ये , महारष्ट्र कर्नाटक मिळून १५० अधिक किल्ल्यांवर भटकंती केली आहे. साहित्य, संगीत, भाषा, नाटक, चित्रपट (film appreciation course at NFAI) या या क्षेत्रांत रुची आहे. माझा ब्लॉग मी चालवतो आहे, त्या द्वारे माझे लेखन सुरु असते. कन्नड भाषेतील साहित्य मराठीत अनुवादित करण्याचा छंद आहे. २०१४ मध्ये मुंबई स्थित ग्रंथाली ने माझे अमीरबाई कर्नाटकी हे अनुवादित पुस्तक प्रकाशित केले. प्रसिद्ध अभिनेता गुरुदत्त यांच्या आईने त्याचे कन्नड भाषेतील चरित्र मी मराठीत अनुवादित केले आहे, जे या ब्लॉग वर उपलब्ध आहे. अजूनही एक दोन पुस्तकांवरकाम चालू आहे. बरीच कन्नड लेख देखील मराठीत अनुवादित केले आहेत. त्याच प्रमाणे मी मानसिक आजार क्षेत्रात देखील काम करतो (Schizophrenia Awareness Association).

मला या व्यासपीठावर बोलण्यास संधी दिल्याबद्दल श्री अशोक डंबल यांचा मी आभारी आहे. मी देखील आपल्या सर्वांप्रमाणे प्रथम विविध कलांचा एक आस्वादक आहे, रसिक आहे. त्याच नात्याने, कन्नड नाटकांच्या आस्वादाचा माझा प्रवास मी आज थोडक्यात आपल्यासमोर मांडणार आहे. खरे तर नाटकांप्रमाणेच कन्नड चित्रपटांबद्दल देखील मी पूर्वी माझ्या ब्लॉग वर लेख लिहिला होता (मी आणि कन्नड चित्रपट).

मी तसे पाहिले तर पुणेकरच, कारण माझे शिक्षण, व्यवसाय सर्व पुण्यातच झाले, होत आहे. पण आपल्या सर्वांप्रमाणे माझ्या वंशवृक्षाची मुळे कर्नाटकात आहेत. जन्म विजापूर(सध्या विजयपूर) जिल्ह्यातील निंबाळ या गावी(जेथे गुरुदेव रानडे यांच्या आश्रम आहे). दहावी परीक्षा दिल्यानंतर लागलेल्या सुट्टीत आईने कन्नड भाषा वाचायला(आणि थोडीफार लिहायला) शिकवले. घरी कन्नड बोलले जात असे, आणि तसेच कन्नड मासिके येत असत. ती मी थोडीफार वाचत असे अधूनमधून.

पण एकूणच साहित्य आणि तसेच विविध ललित कलांच्या अस्वादाकडे आयुष्यात मी जरा उशिराच ओढलो गेलो. पोटार्थी व्यवसाय आणि इतर संसारिक बाबी थोड्या स्थिरस्थावर झाल्यावर, २००० साली , काही निमित्ताने आधी नाटकं आणि मग इतर कलांच्या आस्वादाकडे जाणीवपुर्व लक्ष द्यायला लागलो. प्रायोगिक नाटके, तसेच व्यावसायिक नाटके पाहू लागलो. या सगळ्याचा इतिहास , एकेमकांवर झालेला प्रभाव याचा अभ्यास करू लागलो. मला आठवते, २००१ च्या सुमारास मला प्रसिद्ध नाट्यसमीक्षक वि भा देशपांडे यांचा मराठी नाट्यकोश हाती लागला. त्यात मराठी नाटकांच्या जोडीने, कन्नड रंगभूमी बद्दल, मीना वांगीकर यांचा लेख, वाचायला मिळाला. पुण्यातील स्नेहसदन येथे तसेच अलीकडे सुदर्शन रंगमंच येथे बरीच मराठी प्रायोगिक नाटके पहिली.

तशातच माझ्या इतिहासाच्या प्रेमापोटी मला २००४ मध्ये Indology अभ्यासक्रमाला प्रवेश घेता आला, आणि त्यातील विविध विषय शिकता शिकता झालेल्या वाचनामुळे मराठी-कन्नड भाषा, तसेच एकमेकांवर असलेला संस्कृती प्रभाव या बद्दल थोडेफार वाचायला मिळाले.

आणि २००७ मध्ये मी पहिल्यांदा बंगळुरास गेलो असता मी पहिले कन्नड नाटक पाहिले. ते म्हणजे प्रसिद्ध कन्नड लेखक भैरप्पा यांच्या मंद्र ह्या कादंबरीवर आधारित असलेले आणि तेही रंग शंकर या सुप्रसिद्ध अश्या कन्नड नाट्य चळवळशी निगडीत वास्तू मध्ये. रंग शंकर हे कन्नड नाट्य, चित्रपट अभिनेते शंकर नाग यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या पत्नी अरुंधती नाग यांनी स्थापन केलेली संस्था. प्रायोगिक नाटके, कन्नड तसेच इतर भाषांतील नाटके, नाट्यप्रशिक्षण, या सर्व क्षेत्रात हि संस्था कायम कार्यरत असते. त्यावर्षीच्या बंगळूरू भेटी दरम्यान, कन्नड चित्रपटसृष्टीचा १९६० आणि १९७० च्या दशकातील सुपरस्टार असलेल्या डॉ. राजकुमार यांचा कन्नड जनमाणसावर असलेला प्रभाव मी अनुभवला. पण तो वेगळा विषय आहे, कारण आज कन्नड नाटक हा विषय आहे. असो.

नंतर पुढे त्याच वर्षी ऑक्टोबर मध्ये अमोल पालेकर यांनी पुण्यात रंगसंगीत नावाचा नाट्यमहोत्सव आयोजित केला होता. त्यात अनेक कन्नड नाटकांचे प्रयोग होणार होते. एणगी बाळप्पा, तसेच आपल्या भारदस्त आवाजामुळे सुप्रसिद्ध अश्या बी जयश्री हे देखील येणार होते. एणागी बाळप्पा हे कन्नड संगीत रंगभूमी वरील मोठे नाव. गुब्बी विरण्णा सारखेच. दुर्दैवाने त्यांचे पुढे २०१७ मध्ये निधन झाले ते वयाच्या १०३ व्या वर्षी. गुब्बी विरण्णा यांची मुलगी, म्हणजे जी व्ही मालाताम्मा या देखील आल्या होत्या. मला त्या महोत्सवात बरीच नाटके माहायला मिळाली. लक्ष्मीपती, चित्रपटा, कारीमाई, चैती, गिरीजा कल्याण. तसेच कन्नड लोकरंगभूमी वरील सुप्रसिद्ध असे कृष्ण पारिजात हे लोकनाट्य देखील पाहायला मिळाले. पुढे काही वर्षांनंतर मला म्हैसूर येथील गणेश अमीन यांनी लिहिलेले एणगी बाळप्पा यांचे चरित्र भेट म्हणून पाठवले. त्याचा मी अनुवाद करत आहे. त्यात देखील तत्कालीन मराठी आणि कन्नड भागातील नाट्य व्यवहाराविषयी, होत असलेल्या देवाण घेवाणी विषयी माहिती मिळते.

त्याच वर्षी दसऱ्या निमित्त पुण्यातील कन्नड संघातर्फे एक कौटुंबिक नाटक सदर केले गेले. त्याचे नाव होते इडु जोडू. ६०-७० ह्या दशकात आलेल्या मराठी कौटुंबिक नाटकाप्रमाणेच हलकेफुलके नाटक धारवाडी कन्नड भाषेत पाहताना मजा आली होती.

२००८ मध्ये पुण्यात समन्वय तर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बी व्ही कारंथ रंगमहोत्सव नावाचा एक नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी देखील मला बरीच वेगवेगळी कन्नड नाटके पाहायला मिळाली होती. गिरीश कार्नाड यांचे हयवदन, डॉ. चंद्रशेखर काम्बार यांचे जोकुरस्वामी, पुतिना यांचे गोकुळ निर्गमन हि ती नाटके होत. बी व्ही कारंथ ह्यांनी नाटकांचे दिग्दर्शन नाही केले तर, त्यांनी संगीत देखील दिले बऱ्याच नाटकांना. त्याचा देखील आढावा सदर करण्यात आला होता त्या कार्यक्रमात. बी व्ही कारंथ कर्नाटकातील नाट्य-चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध नाव. त्यांनी अनेक चित्रपट आणि नाटके दिग्दर्शित केली आहेत. त्यांनी रंगायन हे नाट्यसंस्था देखील स्थापन केली आहे.

२००८ मध्ये धारवाड महोत्सव असतो असे समजले होते, पण जायला जमलेच नाही. त्यात नाटकांशिवाय इतर कला प्रकार सादर होणार होते. विविध जानपद कलांचे सादरीकरण देखील होते.

पुढे एकूणच कलाटणी देणारी घटना घडली. २००९ मध्ये एका कन्नड मासिकात (मयूर) गोहारबाई कर्नाटकी आणि बालगंधर्व यांच्या संबंधावरील लेख वाचला. त्याचे महत्व जाणून मी त्याचे मराठी मध्ये अनुवाद करून ग्रंथाली प्रकाशनचे श्री दिनकर गांगल यांना दिला. त्यांनी तो थिंकमहाराष्ट्र या पोर्टलवर प्रकाशित केला. आणि त्यामुळेच त्यांनी पुढे मी अनुवादित केलेल्या अमीरबाई कर्नाटकी चे चरित्र २०१४ मध्ये प्रसिद्ध पुस्तक प्रकाशन संस्था ग्रंथाली यांनी प्रकाशित केले. ह्या पुस्तकाच्या अनुवादाने एकूणच स्वातंत्र्यपूर्व कालीन कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक संबंध कसे होते, हिंदुस्तानी राग संगीत, संगीत नाटक यांची कशी जोपासना झाली याचा सगळा पट उलगडला.

२०१२ राजेंद्र कारंथ यांचे एक नाटक बदकील्लदवन भावगीते मी बंगळूरू मध्ये के के कला सौध रंगमंदिरात पहिले. त्याचा प्रयोग चित्तार संस्थे तर्फे आयोजित राष्ट्रीय कारंथ नाटकोत्सव कार्यक्रमात आयोजित कण्यात आले होते. इतरही नाटके त्यावेळी होणार होती, पण ती पाहता नाही आली, जसे अभिनेत्री, गंगावतरण वगैरे. पुढच्या वर्षी पुण्यात सुदर्शन रंगमंच येथे नाटक केत्ताकथा पहिले, त्यात बी. जयश्री यांनी काम केल्याचे आठवते.

२०१५ मध्ये एकोणिसाव्या शतकातील कर्नाटकातील प्रसिद्ध कवी, नाटककार नारायणराव हुईलगोळ यांच्या चरित्राच्या एकूण खंडांपैकी एक खंड माझ्या हाती लागला. त्यांनी १०० वर्षांपूर्वी केलेल्या भाषण त्यात दिले होते. त्यात त्यांनी मराठी रंगभूमी कशी जोमाने वाढत आहे, आणि तिचा उगम कर्नाटकातील लोकनाट्य अविष्कारात आहे हे त्यांनी ठासून नमूद केले होते.
अतुल पेठे यांचे सत्यशोधक हे नाटक मला कन्नड मध्ये देखील अनुभवण्याची संधी कन्नड संघामुळे लाभली. मी ते मराठी देखील आधी पहिले होते. हे नाटक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर आहे(ता. क. महात्मा फुले यांनी सुरु केलेल्या सत्यशोधक समाज संस्था सप्टेंबर २४, २०२२ तारखेला दीडशेव्या वर्षात पदार्पण करत आहे) . डी एस चौगुले यांनी ते नाटक मराठीतून कन्नड मध्ये अनुवादित केले होते. त्यांचेच आणखीन एक कन्नड नाटक वखारी धूस या नावाचे अतुल पेठे सादर करणार असे त्यांनी त्या वेळेस जाहीर केले होते, पण अजून तरी ते आले नाही असे दिसते. त्याच वर्षी माझ्या बंगळूरूच्या भेटी दरम्यान महान कन्नड नाटककार श्रीरंग यांचे कत्तले बेळकू हे नाटक पाहायला मिळाले, ते देखील बंगळुरातील रंग शंकर येथेच.

२०१६ मध्ये मला कर्नाटकातील हेग्गाडू येथे निनासम मध्ये जायला मिळाले. निनासम म्हणजे निलकंठेश्वर नाट्य सेवा मंडळी के व्ही सुब्बण्णा यांनी निर्माण केलेल्या ह्या नाट्य शिक्षणाची पंढरी असलेल्या ह्या संस्थेत प्रती वर्षी आठवडाभराचा संस्कृती शिबीर नावाचा एक निवासी अभ्यासक्रम राबवला जातो. नारळा, पोफळीच्या बागा असलेल्या अतिशय रमणीय या गावात आणि आजूबाजूच्या परिसरातील सामान्य लोकांना बरोबर घेत जात नाट्य चळवळ, नाटक कला जोपासण्याचे मोठे कार्य ह्या संस्थेने केले आहे. अश्या परिसरात वसलेल्या ह्या संस्थेत काही दिवस राहता आले हे माझे भाग्य. दररोज संध्याकाळी तेथील नाट्यगृहात विविध कन्नड नाटके (काही नवी, तर काही जुनी, क्लासिक). त्यात काम करणारे कलावंत म्हणजे निनासमचे विद्यार्थी, तसेच गावातील हौशी कलाकार. गेली कित्येक वर्षे हा प्रयोग चालू अतिशय यशस्वी पणे चालू आहे. तुमच्या पैकी कोणाला शक्य असेल तर जरुर यावे. त्याच वर्षी प्रकाश गरुड यांचे दोड्डाटा आणि सन्नाटा या कर्नाटकातील दोन लोकंनाट्य प्रकाराबाद्द्ल्चे सादरीकरण अनुभवता आले, पुण्यातील सुदर्शन रंगमंच येथे. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी बरेच संशोधन करून या माहितीपटाची निर्मिती केली आहे.

२०१७ लोकशाकुन्तल हे कन्नड नाटक बंगळूरू मध्ये National School of Drama च्या आवारात असलेल्या नाट्यगृहात हा दीर्घांक मी पहिला. कालिदासाच्या शाकुंतल या संस्कृत नाटकाचा के व्ही सुब्बण्णा कृत कन्नड अविष्कार तो हि याक्षगानाच्या लोकरंगभूमीच्या रुपात वेगळा अनुभव होता तो. त्याबद्दल मी ब्लॉग लिहिला होता.

२०१८ रंग शंकर मध्येच दोन नाटके पहिली. पहिले होते चित्रा, जे रवींद्रनाथ टागोर यांच्या चित्रांगदा या नावाच्या बंगाली नाटकाचा इंग्लिश अनुवाद होता. दुसरे जे मी पहिले ते म्हणजे गिरीश कार्नाड यांचे milestone नाटक तलेदंड जे आपल्याला माहिती आहे कि कर्नाटकातील महान संत बसवेश्वराच्या जीवनावर बेतले आहे.

२०२१ मध्ये बंगळुरास गेलो होतो पण एकूणच कोरोना मुळे लावलेल्या निर्बंधामुळे नाटके पाहायला जाता आले नाही.
ह्या वर्षी (२०२२) मात्र एक मोठी संधी लाभली. एक-दोन महिन्यांपूर्वीच पुण्यातील कन्नड संघ ह्या संस्थेतर्फे भैरप्पा यांच्या पर्व या महाकादंबरी वर आधारित एक महानाट्य याचा एक प्रयोग आयोजित करण्यात आला होता. याच कन्नड संघातर्फे मी पूर्वी कधीतरी गुढी पाडव्याच्या वेळेला यक्षगानचा प्रयोग पहिला होता. जवळ जवळ सात तासांचा हा महाप्रयोग कुठेही कंटाळवाणा होत नाही. विषय आहे महाभारत आणि भैरप्पांनी त्या मधील स्त्री पात्रांच्या बाजूने मांडलेले विचार हे प्रयोगात खिळवून ठेवतात. महाभारतावरील नाटक, तेही एवढे मोठे, त्यावरून प्रसिद्ध नाटककार पीटर ब्रूक्स यांच्या इंग्रजी नाट्यप्रयोगाची आठवण होते. त्या बद्दल मी वाचले आहे, प्रयोग पाहिलेला नाही. त्यांचे नुकतेच निधन झाले. पुण्यातील कन्नड संघ हि संस्था कित्येक दशकांपासून पुण्यातील कन्नड भाषिक लोकांना एकत्र आणण्याचे कार्य करते आहे.

तुफान लोकप्रिय अश्या मुख्यमंत्री या कन्नड नाटकाचा प्रयोग देखील मी पुण्यातच पहिला होता, कधी ते आठवत नाही. कन्नड संघ तर्फेच तो आयोजित केला गेला होता. मुख्यमंत्री चंद्रु या नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्याने मुख्यमंत्र्यांची भूमिका अगदी इरसाल रीतीने केली होती, ते पाहून मला निळू फुले यांच्या इरसाल राजकीय भूमिका आठवत होत्या.

असा हा माझा आतापर्यंतचा कन्नड नाटकांच्या अनुभवांचा प्रवास. अजूनहि बरीच नाटके पहायची आहेत, बरेच अनुवाद प्रकल्पांवर काम करायचे आहे. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल अभिनय भारती(धारवाड) संस्थेचे आभार आणि सर्व श्रोत्यांचे देखील आभार. मला वाटते पुढील सोमवारी कथावाचनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत, ठीक ७ वाजता. पुन्हा भेटू!

सत्यदेव दुबे, भाग#२

सत्यदेव दुबे हे भारतीय रंगभूमीवरील एक मोठे नाव. त्यांची काही नाटके मी पाहिलेली आठवतात, जसे अंधायुग, पगला घोडा वगैरे. गिरीश कार्नाड आणि सत्यदेव दुबे यांनी एकत्र काम केले आहे. गिरीश कार्नाड यांनी सत्यदेव दुबे यांच्याबद्दल The Hindu या वर्तमानपत्रात एक इंग्रजी लेख लिहिला होता २००७ मध्ये. त्याचे कन्नड भाषांतर त्यांच्या गिरीश कार्नाड यांच्या आगोम्मे ईगोम्मे या कन्नड पुस्तकात आहे. सध्या ते पुस्तक मी मराठीत भाषांतरित करत आहे. गेल्या महिन्यातच (डिसेंबर २५) सत्यदेव दुबे यांची पुण्यतिथी साजरी झाली. तेव्हाच खरे तर हे भाषांतर देण्याचा मानस होता. पण जमले नाही. दोन भागात मी हे भाषांतर माझ्या ब्लॉग वर टाकत आहे. पहिला भाग येथे आहे. आज दुसरा भाग. ह्या पुस्तकातील इतरही काही लेख मी ब्लॉग वर पूर्वी प्रकाशित केले आहेत. जरूर पहा.

सत्यदेव दुबे

मला सत्यदेव दुबे भेटले ते मी जेव्हा इंगलंड वरून परत येऊन मुंबईत काम करू लागलो त्या वेळी. त्यावेळी माझे वय पंचवीस होते. खिशात ययाती नाटकाची संहिता घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. त्याच वेळी अल्काझी दिल्लीला राष्ट्रीय नाट्य विद्यालयात संचालक म्हणून गेले होते. त्यांच्या Theater Unit ची जबाबदारी सत्यदेव दुबे यांच्याकडे ते देऊन गेले होते.

आमच्या भेटीची सुरुवात चांगली झाली नाही. सत्यदेव दुबे यांचे काहीतरी बिनसले होते. अश्या वेळी ते सहसा बोलत नसत. ‘इंग्रजी मध्ये नाटक लिहिण्याचे काय प्रयोजन?’, असे त्यांनी एकदम विचारले. ‘त्या विदेशी भाषेत अर्थपूर्ण काही लिहिता येईल का?’

मी चाचरत म्हणालो, ‘माझे नाटक इंग्रजीत नाही, तर कन्नड मध्ये आहे’. ते ऐकून त्यांचा चेहरा एकदम उतरला. त्यांनी माझी क्षमा मागून मला नंतर वाचून दाखवायला सांगितले. मी तिथल्यातेथे कन्नड भाषेतील नाटक वाचून दाखवताना इंग्रजीत ते भाषांतर करून त्यांना ऐकवले. त्यांनी ते करायला लगेच होकार दिला. माझे नाटक हे रंगभूमी साठी योग्य आहे हे आश्वासन देणारी पहिली व्यक्ती म्हणजे सत्यदेव दुबे.

त्या नंतर मी मुंबईत मला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा मी त्यांच्या एकांकिका पाहू लागलो(त्यातील काही त्यांनीच लिहिलेल्या होत्या, तर काही चेकोव्हचे फार्स असत), आणि त्यांना मी जवळून समजू लागलो. ते न थकता वाद घालू शकत असत. त्यांच्या नाट्यसंचातील नट मंडळीना ते रागवत, ओरडत असत, त्यात अमरीश पुरी देखील होते, त्यावेळी. त्यांनी एकदा विजय तेंडूलकर यांना सुनावले कि, ‘तुझ्या बरोबर मी भांडणार देखील नाही’. मी देखील त्यांच्या बरोबर कायम वाद घालत असे. त्यातूनच बरेच काही शिकलो.

भोपाल मधील भारत भवनाच्या उद्घाटनाच्या वेळी झालेल्या महोत्सवाच्या वेळी, एके संध्याकाळी, मी, बी. व्ही. कारंत, सत्यदेव दुबे, श्यामकांत जालन, राजेंद्रनाथ असे सगळे मद्यपान करत बसलो होतो. सत्यदेव दुबे त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तार स्वरात बोलायला लागला. आम्ही देखील त्या विवादात उड्या मारल्या. आमच्यातील भांडण विकोपाला जाते आहे हे पाहून, सुप्रसिद्ध नर्तकी सोनाली मानसिंग आणि यामिनी कृष्णमूर्ती काही न बोलता एका कोपऱ्यात चुपचाप बसल्या होत्या, कधी हे हातघाई वर उतरतील ह्याची त्यांना भीती वाटत होती.

दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे काही झालेच नव्हते ह्या अविर्भावात हसत खेळत गप्पा मारत असताना आम्हाला सोनाल यांनी पाहिले आणि म्हणाल्या, ‘एवढे तुम्ही काळ भांडलात आणि तरीही अजूनही तुम्ही सगळे मित्रच आहात!’

‘ययाती’ रंगभूमी वर येई पर्यंत सत्यदेव दुबे यांना तीन वर्षे वाट पाहावी लागली. बी. व्ही. करांत यांनी भाषांतर करून देईन असे वचन दिले होते. पैश्यांची चणचण होती. सत्यदेव दुबे हे पूर्ण लांबीचे नाटक दिग्दर्शित करू शकतील असे कोणाला वाटत नव्हते. शेवटी Indian National Theater ने ते करायचे ठरवले. ययातीच्या भूमिकेसाठी अमरीश पुरी, आणि स्वतः सत्यदेव दुबे पुरू राजाची भूमिका करणार होते. त्या नाटकाच्या अभूतपूर्व यशामुळे सत्यदेव दुबे यांच्या नाटक दिग्दर्शित करण्याच्या शैली मान्य पावली. त्यां नंतर त्यांनी भारतातील अनेक भाषांतील नाटके त्यांनी केली. त्यांनी हिंदी रंगभूमीचे रुपांतर भारतीय रंगभूमी मध्ये आपल्या एकट्याच्या बळावर केले.

त्यांचे सगळ्यात प्रखरपणे चमकणारे नाटक म्हणजे धर्मवीर भारती लिखित अंधायुग हे होय. धर्मवीर भारती यांनी हे नाटक नभोनाट्य म्हणून आकाशवाणी साठी लिहिले होते. दुबे यांनी ते रंगभूमी वर तसेच आणले असते तरी चालले असते. पण त्यांनी तसे न करता, रंगभूमीच्या अनेक शक्यता त्यांनी नभोनाट्य रंगभूमीवर आणताना त्यात घातल्या आणि एक समर्थ रुपांतर त्यांनी केले. ते त्यांनी अल्काझी यांना पाठवले, कोलकत्त्याला पाठवले. आज अंधायुग ह्या नाटकामुळे भारतीय रंगभूमी वर एका नव्या युगाची नांदी ठरली हे सर्वजण मान्य करतात.

‘मुंबईच्या हिंदी भाषिकांना माझ्या नाटकात रस नाही. मराठी गुजराती रसिकांनी मला पाठीशी घातले.’ असे ते काबुल करतात. दुबे यांच्या नाट्यसंच देखील प्रामुख्याने मराठी गुजराती अभिनेत्यांनीच चालवली आहे. जेव्हा दिल्लीतील नाट्यसमीक्षक त्यांच्या नाटकातील नटांचे हिंदी उच्चार बरोबर नाहीत असा अभिप्राय देतात तेव्हा दुबे उसळून प्रत्युत्तर देतात कि हिंदी राष्ट्रभाषा असेल तर फक्त उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यांचीच मक्तेदारी असण्याची गरज नाही!’

हिंदी चित्रपटांतील संगीतामुळे राष्ट्र एकसंध ठेवण्याची शक्ती आहे असे दुबे म्हणतात. आता हे खरे तर विद्यापीठातून शिकवण्याचा विषय झाला आहे. दुबे यांनी हिंदी चित्रपट संगीत हे आजच्या भारताचे खरेखुरे लोकसंगीत आहे त्यांनी म्हणून ठेवले आहे. एवम् इंद्रजीत या नाटकात त्यांनी हि गोष्ट प्रतिमात्मक रित्या वापरली आहे.

मध्यमवर्गातून अभिनयक्षेत्रात आलेल्या दुबे यांना आधुनिक नाटकात असलेले कष्ट चांगलेच माहिती आहेत. त्यांनी Jean Paul Satre याचे No Exit हे नाटक करताना त्यातील एक समलिंगी स्त्री पात्र अभिनेत्री सुलभ देशपांडे यांनी अप्रतिमरित्या वठवले होते. पण त्यांना ते पात्र नक्की काय चीज आहे हे समजायला त्या नाटकाचे बारा प्रयोग जावे लागले. आता तसले पात्र करण्यास त्यांना भीती वाटते.

गेल्या काही वर्षात सत्यदेव दुबे इंग्रजी नाटकांकडे वळले आहेत (George Bernard Shaw हे त्यांचे आवडते नाटककार), त्यात त्यांची स्वतःची देखील काही नाटके आहेत. ‘आता इंग्रजी देखील भारतीय भाषा झाली आहे. आता ती आपली आहे. आपल्या कादंबरीकरांनी ज्या विषयांना स्पर्श केला नाही ते विषय घेऊन आज आपले नव कादंबरीकार इंग्रजी मधून कादंबऱ्या लिहित आहेत’

हिच गोष्ट जर जुन्या काळातील सत्यदेव दुबे यांनी ऐकली असती तर उसळले असते. पण हा मनुष्य एकच एक असा राहतच नाही, बदलत असतो.

[सौजन्य: The Hindu २५ नोव्हेंबर २००७]

(समाप्त)

सत्यदेव दुबे

सत्यदेव दुबे हे भारतीय रंगभूमीवरील एक मोठे नाव. त्यांची काही नाटके मी पाहिलेली आठवतात, जसे अंधायुग, पगला घोडा वगैरे. गिरीश कार्नाड आणि सत्यदेव दुबे यांनी एकत्र काम केले आहे. गिरीश कार्नाड यांनी सत्यदेव दुबे यांच्याबद्दल The Hindu या वर्तमानपत्रात एक इंग्रजी लेख लिहिला होता २००७ मध्ये. त्याचे कन्नड भाषांतर त्यांच्या गिरीश कार्नाड यांच्या आगोम्मे ईगोम्मे या कन्नड पुस्तकात आहे. सध्या ते पुस्तक मी मराठीत भाषांतरित करत आहे. गेल्या महिन्यातच (डिसेंबर २५) सत्यदेव दुबे यांची पुण्यतिथी साजरी झाली. तेव्हाच खरे तर हे भाषांतर देण्याचा मानस होता. पण जमले नाही. दोन भागात मी हे भाषांतर माझ्या ब्लॉग वर टाकत आहे. आज पहिला भाग. ह्या पुस्तकातील इतरही काही लेख मी ब्लॉग वर पूर्वी प्रकाशित केले आहेत. जरूर पहा.

सत्यदेव दुबे

सत्यदेव दुबे हे मध्य प्रदेशातील बिलासपुर (आता झारखंड मध्ये आहे) येथून मुंबईत आले ते कसोटी क्रिकेट मध्ये खेळण्याच्या उद्देशाने. पण ते मुंबईत नाटकाच्या विश्वात गुरफटले गेले. इब्राहीम अलकाझी यांनी Theater Unit नावाचे एक नाट्यसंस्था सुरु केली होती. ती नाट्य प्रशिक्षण केंद्र म्हणून देखील काम करत असे. दुबे यांनी त्यात प्रवेश घेतला. ‘माझ्या वर प्रभाव पडला तो पी. डी. शेणोय यांचा,’ असे दुबे सांगत होते, ‘त्यांच्या नाटकांच्या आकृतीबंध हा त्या नाटकाच्या विविध रंगांना एकत्र विणून त्यांना एकत्र घट्ट ठेवणारे त्यातील ताण असे. एकदा का ते काय असे लक्षात आले कि बाकीचे सोपे होत असे’.

आजही नाटकाच्या structure बद्दल काळजी आणि वेगवेगळे तपशील प्रखरपणे, कुठलाही संदेह नसलेले चित्रण, हेच दुबे यांच्या नाटकांचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

एवढ्यातच बंगळूर मधील रंगशंकर या नाट्यगृहात संपन्न झालेल्या नाट्योत्सवाचा समारोपाच्या नाटकाच्या प्रयोगासाठी दुबे यांनी दिग्दर्शित केलेले Jean Anouilh याचे Antigone हे नाटक निवडले होते. हे नाटक विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ नाटक आहे हे सगळे मान्य करतात. पण त्यात नाझी समर्थन आहे कि काय असा संदेह आजही अनेकांना पडतो. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस जर्मन सैन्याने फ्रान्स मधील परीस नागरवर आक्रमण केल्याच्या सुमारास हे नाटक लिहिले गेले होते. राजा क्रियान यांच्या अत्याचारा विरुद्ध आवाज उठवलेल्या Antigone या तरुणीच्या बंड करण्याचा हक्काला पाठींबा देते. नाटकातील हा क्रांतिकारी संदेश जर्मन सेन्सॉर मंडळाला नक्कीच समाजाला असेल. समजात सुस्थिरत प्रस्थापित करण्यासाठी अत्याचार हे आवश्यक आहेत असे क्रियान वाद नाटक समर्थपणे मांडते असे त्यांना वाटले असावे. त्यामुळे त्यांनी नाटकाला संमती दिली असावी. आता जर्मन आक्रमकांच्या संमतीने आलेली नाट्यकृती अशी अपकीर्ती ह्या नाटकाला लाभली. त्याचा परिणाम म्हणून आजवर झालेल्या ह्या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळेस चर्चा होत राहते. (सध्या डॉ श्रीराम लागू यांनी हे नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले नाही, अनुमती मिळाली नाही)

ह्या प्रयोगात दुबे यांनी Antigone चे स्वपनील रम्य संवाद काढून टाकले. पात्रांची संख्या देखील त्यांनी कमी केली. आणखीन विशेष म्हणजे, क्रियान राजाचा पुत्र तसेच Antigone चा प्रियकर हेमन हे पात्र देखील वगळून नाटकातील भावना पातळ करून टाकल्या. त्या एवजी दुबे यांनी क्रियान राजाला(नट-नसरुद्दिन शाह), आपल्या सुनेबद्दल (नटी-रत्ना पाठक-शाह) वाटणारी आत्मीयता त्यांनी अधिक गडद केली. महालाच्या बाहेर बंड करायचे, आणि आणि घरात कुटुंबात परस्परात आपुलकी यातील द्वंद त्यांनी अधिकच परिणामकारक रित्या चित्रित केले.

‘त्या नाटकात राजा आणि सून याच्यातील दृश्ये दिग्दर्शित करताना, त्या दोन पात्रांतील शारीरिक स्पर्श असलेले प्रत्येक दृश्य मी काळजीपूर्वक करत गेलेओ, कारण ती दोन्ही पात्रे साकार करणारे नट हे वास्तवात पती पत्नी आहेत हे प्रेक्षकांना माहित आहे!’

रंगभूमीवरील नेपथ्य दुबे स्वतःच करतात. याचे कारण नाटकचे चलन वळण तसेच नेपथ्य रचना यांचा वेगवेगळा विचार करता येत नाही. ह्या सर्वांमुळे हे Antigone नाटक प्रेक्षकांसमोर अतिशय ह्रद्य स्वरूपात सादर होते.

१९६०-७० च्या दशकात भारतीय रंगभूमीचा नवोदय झाला असे मानतात. त्या साठी कारणीभूत झालेल्या अनेक कलाकारांमध्ये सत्यदेव दुबे यांचे स्थान आहे. १९६४ मध्ये माझा त्यांच्या बरोबर परिचय झाला आणि तेव्हा पासून मी त्यांच्या नाट्यजीवनातील प्रत्येक टप्प्याचा मी साक्षीदार आहे. त्याच प्रमाणे ह्या पिढीतील नाट्य दिग्दर्शक गेल्या दोन दशकांपासून विशेष क्रियाशील राहिले नाहीत. १९८९ मध्ये दिल्ली मध्ये आयोजित करण्यात आलेल्या नेहरू शताब्दी नाट्य महोत्सवात सादर झालेले बी. व्ही. कारंत यांचे हयवदन हे नाटक अतिशय निरस होते . हेच नाटक जेव्हा १९७१ मध्ये ह्या नाटकाचा प्रयोग झाला तेव्हा भारतीय रंगभूमी खडबडून जागी झाली ह्या वर विश्वास ठेवायला कठीण झाले होते. १९९१ मध्ये इब्राहीम अलकाझी यांनी दिग्दर्शित केलेले तलेदंड पहिले असता, त्या आधीच्या वीस वर्षे आधी, म्हणजे त्यांनी तुघलक नाटकाचे दिग्दर्शन केल्यावर सुद्धा, त्यांना नवीन गोष्टी सुचतील का हा प्रश्न पडला. आत्ताचे हबीब तन्वीर यांनी दिग्दर्शित केलेले राजरक्त हे नाटक त्यात असलेल्या अनेक gimmick मुळे यशस्वी झाले आहे.(हेच नाटक घेऊन त्यांनी युरोप दौरा केला!). ह्याच प्रमाणे बाकीचे देखील आपल्या शैलीच्या चिलखतीमध्ये रुतून पडले आहेत असे दिसते.

असे असताना सत्यदेव दुबे ९२व्या वर्षी सुद्धा, प्रकृती ठीक नसताना देखील, किती सुस्पष्टता, त्यांनी टिकवून ठेवली आहे, हे कसे?

सत्यदेव दुबे यांचे उत्तर असे आहे:

‘मला काय माहित आहे, तेच मला माहित नाही’

आमच्या युगातील श्रेष्ठ नाट्यगुरु असलेल्या अश्या व्यक्तीच्या तोंडून हे शब्द अतिविनयाचे वाटतात. अमरीश पुरी, अमोल पालेकर, हरीश पटेल हे त्यांचे शिष्य. त्यांनी सुनीला प्रधान यांची प्रतिभा, गुणवत्ता ओळखली. सोनाली कुलकर्णीला अभिनय शिकवला. १९८० पासून त्यांनी प्रशिक्षित केलेल्या लोकांमध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्दर्शकांचा समावेश आहे. फक्त पस्तीस वर्षाचे असलेले चेतन दातार, त्यांचे शिष्य, ह्यांना जेव्हा आपल्या दुर्धर आजारापासून सुटका नाही असे समजले, तेव्हा आपल्या गुरूला सत्यदेव दुबे यांना घरी, गुरु पौर्णिमेच्या दिवशी बोलावून सत्कार केला.

सत्यदेव दुबे यांना शिकवायला आवडते. तरुणांच्या सोबत त्यांना राहायला आवडते, त्यांच्यात राहून ते स्वतः तरुण होतात. पुढची पिढी हे माझे भविष्य आहे, असा त्यांचा विश्वास आहे.

Antigone नाटकाच्या प्रयोगाला बंगळूरला ते आले असता त्यांची प्रकृती अतिशय बिघडली होती. नाट्यक्षेत्रात काम करण्यासाठी आलेल्या तरुण मुलांपुढे ते सामोरे गेले. आणि त्यांनी ओरडून मुलांना विचारले, तुम्हा नाटक का बरे करायचे आहे? आणि मुलांना भांबावून सोडले. स्वतः तयार करून आणलेल्या प्रश्नांना सत्यदेव दुबे उत्तरे देतील असे मुलांना वाटले होते, पण एकूणच सगळे विस्कटले.

(क्रमशः)

तियात्र: गोव्याचा रंगमंच, भाग#३

गोव्यातील नाट्यरंगभूमीचा एक अविष्कार म्हणून तियात्र ओळखले जाते. गोव्याची भटकंती कित्येकदा झाली आहे, पण पूर्वी मी कधी त्याबद्दल ऐकले/वाचले नव्हते.  पण २०१७ च्या एप्रिल मध्ये गोव्यात गेलो असता हॉटेलमध्ये वर्तमानपत्रात पणजीतील एका कार्यक्रमाचे निवेदन मी वाचले. त्यात तियात्रच्या १२५व्या वर्षाच्या  प्रारंभाबद्दल तो कार्यक्रम असणार होता. अर्थात मी तेथे जाऊ शकलो नाही. नंतर केव्हातरी याबद्दल माहिती काढावी असा विचार केला होता, पण कालौघात विसरून गेलो. काही महिन्यांपूर्वी(डिसेंबर २०१९) मी एका कन्नड मासिकात ख्रिसमस स्पेशल सदरात तियात्र बद्दल एक लेख वाचला. मराठी नाट्यरसिकांसाठी तो भाषांतरित करावा असे वाटले.  हा मूळ लेख फ्रान्सिस एम एन यांचा आहे. काही दिवसांपूर्वीच गोवा मुक्तीदिन साजरा झाला, पोर्तुगीज राज्यकर्ते परत गेले. गोव्याच्या संस्कृतीवर पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव ठिकठिकाणी दिसून येतो. ते नाकारता येणार नाही. रंगभूमीवर हा प्रभाव कसा झाला हे ह्या लेखाद्वारे पाहणे रोचक ठरावे. आपल्या ब्लॉगच्या सोयीसाठी मी हे भाषांतर काही भागांतून देणार आहे. पहिला आणि दुसरा भाग येथे आणि येथे दिला होता. आज तिसरा आणि शेवटचा भाग देत आहे.

Goan Tiatr Stage

तियात्र कलेतील बदल

तियात्र प्रयोगाच्या सफलतेसाठी चांगली कथावस्तू हवी, आकर्षक गीते/गाणी हवीत, त्याचबरोबर संगीत हवे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विनोदाची रेलचेल हवीच हवी. सुसज्ज रंगमंच, वेधक नेपथ्य, साजेशी प्रकाशव्यवस्था देखील असतेच. तियात्रची कथावस्तू वैविध्यपूर्ण आहे-ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, आणि धार्मिक पार्श्वभूमी असेलेली.

तियात्र रंगभूमी हि प्रवाहशील आहे. त्यात काळानुसार बदल झाले, आणि अजूनही होत आहेत. प्रतिभावंत तियात्र निर्माते त्यात कालानुरूप बदल करत आहेत. उदाहरणार्थ, पूर्वी रंगमंचाचा पडदा वर आणि खाली करण्यासाठी शिटी वाजवली जात असे. मधल्या काळातील संगीत सुरु करण्यासाठी देखील शिटी वाजवून सूचित केले जायचे. आता त्या ऐवजी दिव्यांचा वापरा सुरु झाला.

काही प्रसंगातून प्रकाशाचा सुयोग्य वापरा करून वेगळाच परिणाम तियात्र मध्ये साधतात. त्यातही बरेच बदल झाले आहेत. आता त्याच बरोबर समयोचित संगीत देखील वाजवले जाते. प्रेक्षकांवर परिणाम करण्यासाठी म्हणून एखादा अंक संपल्यानंतर त्यावेळी रंगमंचावर असलेले कलाकार मंडळी काही क्षण आहे त्या स्थितीत स्तब्ध उभे राहण्याचा प्रयोग देखील करण्यात आला. त्याच प्रमाणे आजकाल आता ध्वनीमुद्रित संगीत वापरले जाते.

पणजी येथील गोवा कला अकादमीच्या अंदाजाप्रमाणे, हौशी, व्यावसायिक, गावातील जत्रेत, तसेच चर्च मधील जागेत प्रयोग करायला उचित अशी तियात्र बघायला गेले तर, गोव्यात प्रतिवर्षी साधारण २०० च्या वर तियात्रचे प्रयोग होतात. गोवा कला अकादमी तियात्र स्पर्धा देखील आयोजित करते. त्यात देखील साधारण २५च्या आसपास तियात्र प्रयोग होतात. तियात्र प्रयोगांतील गाणी, प्रयोगांची देखील ऑडियो सीडी, डीव्हीडी स्वरूपात गोव्यात, मुंबईत, तसेच परदेशात देखील विकली जातात.

सामाजिक जाणीव जपणारी तियात्र

राजकीय, सामाजिक परिवर्तनासाठी तियात्र चळवळीने स्वतःचे असे योगदान दिले आहे. गोव्यात पोर्तुगीज राजवट असताना, अनेक तियात्र प्रयोगातून त्या राजवटीविरुद्ध अनेकदा आवाज उठवला गेला असे दिसेल. गोव्याच्या मुक्तीसंग्रामात, तसेच नंतर गोव्याचे महाराष्ट्रात विलीन होऊ देण्यात तियात्र प्रयोगानी मोठा हातभार लावला आहे. गोव्यातील आजकालच्या ज्वलंत प्रश्नांना देखील तियात्र सामोरे गेले आहे. जसे, गोव्यातील अधाधुंद खनिज उत्खानान, गोव्यातील वन संपदा वाचवण्यासाठी, गोव्यातील निसर्ग सौदर्य अबाधित ठेवण्यासाठी देखील हातभार लावला आहे, असे दिसेल.

पोर्तुगीज राजवटी मध्ये गोव्यातील जनतेवर पोर्तुगीज भाषा लादण्याचे प्रयत्न सुरु असता, गोव्यातील स्वतःची अशी लिपी नसलेली मौखिक किंवा बोली भाषा असलेली, कोंकणी भाषा, प्रामुख्याने तियात्र प्रयोगांमुळे जपली गेली असे दिसते. तेवढेच नव्हे तर, कोंकणी भाषा हि राज्याची अधिकृत भाषा घोषित व्हावी यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना देखील तियात्र चळवळीने मोठा हातभार लावला. १९६७ मध्ये गोव्याने मराठी भाषेला बाजूला सारून कोंकणी भाषा हि अधिकृत राजभाषा म्हणून घोषित केली{ कोंकणी लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर सुरु झाला. काही जण, रोमन लिपी सुद्धा वापरून कोंकणीत लेखन करतात. कर्नाटकात कोंकणी भाषा कन्नड लिपी वापरून लिहिली जाते)

गोयातील तियात्र पूर्व नाट्यचळवळी

तियात्र सुरु होण्या आधी गोव्यात नाट्याविष्कार होत नव्हता असे म्हणणे, समजणे चुकीचे ठरेल. गावागावातून विविध सणाच्या, उत्सवांच्या निमित्ताने, तेथे झागोर(जागरण), खेळ, मुसळम खेळ/फेळ, मेळे या सारखी प्रकार सदर केले जात. या सर्वांचे प्रतिबिंब काहीना काही रुपात आजच्या तियात्र मध्ये दिसते.

झागोर आणि खेळ हि पुरुषप्रधान नाट्यप्रकार म्हणता येईल. त्यात भरपूर गाणी असत. झागोर हा प्रामुख्याने उत्तर गोव्यात बार्डोझ गावाच्या आसपास दिसतो. तर खेळ दक्षिण गोव्यातील साल्सेट भागात प्रसिद्ध होता. त्यात संवाद, संभाषण प्रामुख्याने असे. तियात्रच्या आधी कोंकणी लोकांसाठी हे दोन्ही प्रकार मनोरंजनाचे साधन होते. तियात्र हळू हळू प्रसिद्ध होताना, त्याला खेळ तियात्र असे म्हणण्याची पद्धत गेल्या शतकात पन्नासच्या दशकापर्यंत होती. खेळ आणि झागोर मध्ये जेव्हा अश्लीलता शिरू लागली, तसे तसे सुशिक्षित समाज त्यापासून दूर जाऊ लागला. शहरात आता झागोर विशेष दिसत नाही, पण खेळ अजूनही राहिले आहे. मार्च १९५६ मध्ये मोजीन कार्निवल संपल्यानंतर तिसऱ्या दिवशी अंतोनियो बोरिस याने त्याने स्वतः रचलेल्या संद्ल्लोले पूत नावाचे तियात्र सादर केले.

पुढे सत्तरच्या दशकात, रोजारियो, रोड्रीगस वगैरे लोकांनी याला खेळ तियात्र असे संबोधून त्याचा प्रचार केला. नंतर त्यालाच निरंतर नाटक असे नामभिधान प्राप्त झाले.

आज जरी तियात्र आधुनिक काळातील कला आहे असे वाटले असत असले तरी, तिचे मूळ ह्या पूर्वापार चालत आलेल्या लोकनाट्यकलेत आहे हे विसरता येणार नाही. तसेच, खेळ तियात्र या प्रकाची तियात्र हि परिष्कृत आवृत्ती आहे असे म्हटले तर वावगे ठरून नये.

सांकृतिक पर्यटन आणि तियात्र

आजच्या आधुनिक काळात, जेथे, चित्रपट, दूरचित्रवाणी, आणि इतर कल्पनातीत अशी मनोरंजनाकरिता, माहितीकरिता असलेल्या नवीन माध्यमांपुढे तियात्र कसे टिकणार हा प्रश्न साहजिक पडतो. त्याच प्रमाणे इंग्रजी भाषेचे जे आक्रमण आपल्या समाजावर होत आहे, त्यात नवीन पिढी आपल्या मातृभाषेपासून, कोंकणी भाषेपासून दुरावत चालली आहे. त्याच प्रमाणे तियात्र मधील गाणी, त्यांचे प्रयोग हे मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध होत असल्यामुळे, ह्या सर्वांचा परिणाम तियात्र कलेवर, त्याच्या अस्तित्वावर होत आहे.

शेकडो लोकांना तियात्र क्षेत्राने रोजगार पुरवला आहे. तियात्र प्रयोग हे गोव्यातील पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. अनेक देशात सांस्कृतिक पर्यटन अस्तित्वात आहे. हि मागणी तशी नवीन नाही. त्याचा फायदा देखील होत आहे, तसाच तियात्र क्षेत्राला देखील होईल. ख्रिश्चन धर्मियांचा Ash Wedensday तसेच पोर्तुगीज लोकांचा हिवाळा संपल्याचे सांगणारा उत्सव, हे साधारण फेब्रुवारी महिन्यात येतात. गोव्यात पणजी येथे गोवा कार्निवल या स्वरूपात हे दोन्ही सण साजरे केले जातात. वर्षभर याचा गोवा सरकारच्या पर्यटन विभागातर्फे याची जाहिरात केली जाते. आता त्याच सरकार तर्फे गोव्याच्या संकृतीचे प्रतिक असलेल्या तियात्र प्रयोगांचा वार्षिक महोत्सव आयोजित केला जातो. त्यासाठी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी करण्याची नितांत गरज आहे.

पहिला तियात्र ‘कावेल न सुंदरी ‘ बद्दल थोडेसे

‘जायन्त जनान उत्तर दिलेन हांगसोरी, पाय मायांची खुशी भायिरी’

वरील पद पहिल्या तियात्र ‘कावेल न सुंदरी ‘ मधील आहे. १८८५ मध्ये अगस्तीनो फर्नांडीस यांनी या तियात्रची रचना केली होती. परंपरा आणि आधुनिकता यातील द्वंद या पदातून सूचित होते . आई वडिलांनी मुलांवर त्यांच्या लग्नाचा निर्णय लादू नये. आपल्या जीवनसाथीच्या निवडीचे स्वातंत्र्य मुलांना असावे, हे ह्या पदामधून सूचित केले आहे.

‘कोस्ले तोंड आमी गेवून बौन्तात क्रीस्तां म्हणून? किती म्हणून जायत अमका हिंदू, मुसलमान, हेम कास्तावा पालोद्न आमचे किस्तावा मदें?’

वरील संवाद देखील याच तियात्र मधील आहेत. धर्म एकच असला तरी जाती जातींमधील असलेली उच्च नीचता याबद्दल अंतर्मुख होऊन विषादाने काढलेले हे उद्गार आहेत. मानव सगळे सारखे, समान आहेत. त्यात उच्च नीचता नसावी असा भावार्थ या संवादात आहे. हे तियात्र सादर होऊन शतक उलटले तरीही, गोव्यातील ख्रिस्ती समजात असलेला भेदभाव दुर्दैवाने अजूनही गेलेला नाही.

सर्वसाधारणपणे तियात्र रचली गेली ती समाजातील वैगुण्यावर, समस्यांवर बोट ठेवण्यासाठी. अतिरेकी धुम्रपान, मद्यपान, नशेचे व्यसन ह्या सर्व समाजातील समस्या आहेत. या बद्दल, त्याच्या दुष्परिणामाबद्दल प्रेक्षकांपर्यंत संदेश तियात्रने दिला. सरकारी अधिकाऱ्यांच्या चुका, त्यांची वाईट वर्तणूक या सारख्या गोष्टी विनोदी स्वरूपात, विडंबनाद्वारे प्रेक्षकांपर्यंत तियात्रने पोहचवले.

सामाजिक मूल्यांचे अधःपतन घडत असताना लोकांपर्यंत ते पोहचवण्याचे काम तियात्रने केले. विधवा विवाहासारख्या प्रथांना तियात्रने पाठींबा दिला. नंतरच्या काळात गोव्यातील सुशिक्षित मुले मुंबईला जाऊन, पुढे अखाती देशात रोजगारासाठी गेली आणि त्यामुळे निर्माण झालेल्या विविध बऱ्या वाईट गोष्टी देखील तियात्रने हलक्याफुलक्या रीतीने मांडल्या.

(समाप्त)

तियात्र: गोव्याचा रंगमंच, भाग#२

गोव्यातील नाट्यरंगभूमीचा एक अविष्कार म्हणून तियात्र ओळखले जाते. गोव्याची भटकंती कित्येकदा झाली आहे, पण पूर्वी मी कधी त्याबद्दल ऐकले/वाचले नव्हते.  पण २०१७ च्या एप्रिल मध्ये गोव्यात गेलो असता हॉटेलमध्ये वर्तमानपत्रात पणजीतील एका कार्यक्रमाचे निवेदन मी वाचले. त्यात तियात्रच्या १२५व्या वर्षाच्या  प्रारंभाबद्दल तो कार्यक्रम असणार होता. अर्थात मी तेथे जाऊ शकलो नाही. नंतर केव्हातरी याबद्दल माहिती काढावी असा विचार केला होता, पण कालौघात विसरून गेलो. काही महिन्यांपूर्वी(डिसेंबर २०१९) मी एका कन्नड मासिकात ख्रिसमस स्पेशल सदरात तियात्र बद्दल एक लेख वाचला. मराठी नाट्यरसिकांसाठी तो भाषांतरित करावा असे वाटले.  हा मूळ लेख फ्रान्सिस एम एन यांचा आहे. काही दिवसांपूर्वीच गोवा मुक्तीदिन साजरा झाला, पोर्तुगीज राज्यकर्ते परत गेले. गोव्याच्या संस्कृतीवर पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव ठिकठिकाणी दिसून येतो. ते नाकारता येणार नाही. रंगभूमीवर हा प्रभाव कसा झाला हे ह्या लेखाद्वारे पाहणे रोचक ठरावे. आपल्या ब्लॉगच्या सोयीसाठी मी हे भाषांतर काही भागांतून देणार आहे. पहिला भाग काही दिवसांपूर्वी येथे दिला होता. आज दुसरा भाग देत आहे.

गोव्याच्या तियात्रची वैशिष्ट्ये

तियात्रचा प्रयोग सहसा दोन ते तीन तास चालतो. हौशी आणि व्यावसायिक मिळून कलाकार करत असलेले हे प्रयोग , लोकं अगदी गर्दी करून हौसेने पाहायला येतात. सगळे प्रयोग बहुतेक वेळेला हाउसफुल्ल होतात. नाटकांप्रमाणेच तियात्र मध्ये साधारण सहा ते नऊ अंकअसतात. ह्यांना पोर्दो किंवा पोर्दोज असे संबोधले जाते. प्रत्येक अंकाचा अवधी साधारण पंधरा मिनिटांचा असतो. त्यात साधारण चारेक दृश्य अथवा देखावे असतात.

प्रत्येक अंक संपल्यानंतर दुसरा सुरु होईपर्यंत मध्यल्या काळात, पाश्चात्य संगीताने , वाद्यवृंदाने नटलेली एक ते तीन गाणी ऐकवली जातात. ह्याच दरम्यान मुख्य पडद्याच्या मागे पुढच्या अंकाची तयारी करतात, नेपथ्य बदलायचे असेल तर तेही करतात. कधी एकटा गायक गाणी गात असतो तर कधी बरीच गायक मंडळी मिळून गाणी गातात. पुढच्या अंकाची तयारी झाली कि गाणे थांबवून पडदा वर जातो आणि तो अंक सुरु होतो. हा प्रकार प्रत्येक अंक संपल्यानंतर होतो. त्याच बरोबर एखादा विनोदी कलाकार विडंबन, विनोदी प्रसंग सादर करायला असतोच असतो.

A scene from Goan Tiatr

कंतरा आणि कंत

बऱ्याच वेळेला असे होते कि मूळ कथेशी काहीही संबंध नसलेली, कथेला पूरक नसलेली गाणी ह्या अश्या मधल्या जागेत गायली जातात. त्यांचे विषय हे समाजातील विविध दुष्ट प्रवृतींचे विडंबन करणे, समाजातील त्या त्या काळातील विवादात्मक घटनांचे विडंबन वगैरे. अश्या गाण्यांना कंतरा असे संबोधले जाते. तसेच कथेशी संबंधित जर ती गाणी असतील तर त्यांना कंत असे म्हणतात. गाणे हा अर्थ असलेला मूळ पोर्तुगीज शब्द कांतरा आहे. विषद व्यक्त करणारी, विडबन करणारी हि गाणी गोव्यातील राजकारणी, चर्च मधील पादरी या सारख्या मंडळीना न छेडता संपत नाहीत!

तियात्र मधील गाणी सुरु असताना साथीला अनेक वाद्ये वापरली जातात. त्यात पाश्चिमात्य वाद्ये जसे कीबोर्ड, ट्रम्पेट, सेक्सोफोन, गिटार, तसेच ड्रम हि असतात. काही वेळेस प्रेक्षकांना रिझवायला एखादे नृत्य देखील तियात्र मध्ये असते. काही वेळेला तर तियात्र मधील कथानकापेक्षा ह्या इतर गोष्टींसाठीच प्रेक्षक गर्दी करतात.

‘खेळ’ तियात्र नावाचा अजून एक प्रकार प्रचलित आहे. कार्निव्हल सण, इस्टर, ख्रिसमस ह्या सारख्या कार्यक्रमांकरिता सीमित असणारा हा प्रकार त्या त्या सणानुसार तियात्र मध्ये ती ती गाणी येतात.

राजकीय, धार्मिक किंवा राजकीय तियात्र मधून त्यांचे विडंबन जरी केले जात असले तरी, त्या त्या वेळेस प्रेक्षकांवर उचित परिणाम करणारी कथन पद्धती वापरली जाते. त्यात अर्थात हास्य विनोद प्रमुख असते, तेच तियात्रच्या यशाचे गमक आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. तियात्र मधील प्रमुख भाषा देखील जरी कोंकणी असली तरी, पोर्तुगीज, फ्रेंच, हिंदी, मराठी तसेच इंग्रजी भाषेचा वापर असतोच.

एप्रिल १३: तियात्र दिवस

पहिलावहिला तियात्रचा प्रयोग , म्हणजे, इटालियन भुर्गो चा प्रयोग ज्या दिवशी, म्हणजे एप्रिल १३ रोजी झाला, तो दिवस गोव्यातील रसिक मंडळी तियात्र दिवस म्हणून उत्साहात साजरा करतात. गोवेकरांसाठी तियात्र हि काही फक्त नाट्यचळवळ नाही, तर ती त्यांच्या संस्कृतीचा अचल भाग आहे असा त्यांचा दृढ विश्वास आहे. इटालियन भुर्गो च्या यशानंतर रीबेरियोने गोवा ड्रामाटिक कंपनी स्थापन केली आणि तिच्या द्वारे त्याने अलिबाबा, अल्लाउद्दिन, कार्लोस माग्मो या सारखी अनेक तियात्र त्याने रचले आणि प्रयोग केले. त्याने दुसरी एक कंपनी देखील सुरु केली, तिचे नाव रीबेरियो आणि क्रोच ओपेरा. त्या द्वारे देखील त्याने तियात्र कला प्रेक्षकासमोर सादर करत राहिला.

रीबेरियो यांचे बहुतेक तियात्र त्यावेळच्या प्रसिद्ध युरोपियन नाटकांवर आधारित असत. इंग्रजी भाषेतील ती नाटके कोंकणीत अनुवादित करून, इतर गोष्टी त्यात टाकून तो ती प्रेक्षकांना पेश करत असे.

पाय तियात्रीस्ट (Pai Tiatrist): तियात्रचा पितामह

कोंकणी भाषिक समाजामध्ये त्रियात्र नाट्य प्रकार बराच प्रसिद्ध पावला. त्याच सुमारास मुंबई आणि खुद्द गोव्यात देखील अनेक नाटक कंपन्या(प्रामुख्याने संगीत नाटक कंपन्या) उदयास आल्या होत्या. रीबेरियो यांच्या नंतर तियात्र क्षेत्रा मोठे नाव म्हणजे जावू अगस्तीनो फर्नांडीस हे होय. जवळ जवळ १२४ वर्षांपूर्वी त्यांनी १८९५ मध्ये , युरोपियन नाटकांच्या अनुवादांच्या मागे न लागता, स्वतंत्रपणे कोंकणी भाषेत एक तियात्र रचले आणि ते बसवले देखील. त्याचे नाव होते बेल डी कोवेल अर्थात सुन्दरो कावेल्ची. त्यांनी पुढील पन्नास वर्षे तियात्र क्षेत्रात काम करून एक पायाच रचून गेले असे म्हणता येईल.

त्या काळातील विदेशी कादंबरीकार, नाटककार यांच्या कलाकृतींचा अभ्यास असल्यामुळे अगस्तीनो यांना नवनवीन तियात्र प्रयोग रचण्यास मदतच झाली. गोव्यातील कोंकणी जीवनाशी जवळीक साधणारी जवळजवळ अठराहून अधिक तियात्र त्यांनी रचले. ह्या त्यांच्या कार्यामुळे, त्यांचे नाव गोव्यातील घराघरात पोहचले.

तियात्र चे जन्मदाता, जनक रीबेरियो होत. अगस्तीनो फर्नांडीस यांनी त्याचे पालन पोषण करून त्यास मोठे केले. त्यामुळेच त्यांना तियात्र नाट्यकलेचे पितामह (Pai Tiatrist) असे मानाने संबोधले जाते.

स्त्री नट मंडळींचा प्रवेश

अगस्तीनो फर्नांडीस यांची पत्नी रेजिना ह्या तियात्र मध्ये काम करणाऱ्या पहिल्या स्त्री कलाकार आहेत असे समजले जाते. त्यांनी नोव्हेंबर ११, १९०४ रोजी झालेल्या भाटकर (जमीनदार या अर्थाचा कोंकणी शब्द) नावाच्या तियात्र मध्ये त्यांनी पहिल्यांदा काम केले.

सी. अल्वारीस(पूर्ण नाव सेलेस्टीनो संताना फ्रांको अल्वारीस) कोंकणी तियात्र क्षेत्रातील अजून एक मोठे नाव. ते प्रतिभावंत गायक, संगीतकार तसेच अभिनेते होते. त्यांनी काही तियात्र रचून त्यांचे दिग्दर्शन देखील केले आहे. महिल्यांनी ह्या क्षेत्रात येण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले.

तियात्र रंगमंचावरील अजून एक प्रतिभावंत कलाकार म्हणजे एम. बोयार हे होय. त्यांनी अगदी लहान वयात, म्हणजे अठराव्या वर्षात, एक तियात्र रचले, ज्याचे नाव ऋणकारी (म्हणजे मराठीत ऋणको). तियात्र क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल, गोवा मुक्ती आंदोलनाच्या रौप्य महोत्सवादरम्यान त्यावेळच्या राष्ट्रपतींनी म्हणजे ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला गेला. नंतर १९९४-९५ मध्ये त्यावेळच्या राष्ट्रपतींच्या(शंकर दयाळ शर्मा) हस्ते संगीत नाटक अकादमीचे सन्मानपत्र त्यांना प्रदान केले गेले. २००५ मध्ये राष्ट्रपती अब्दुल कलाम आझाद यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री देखील प्रदान केले गेले.

एम. बोयार ह्यांनी पंचवीसहून अधिक तियात्र रचले आणि दिग्दर्शन देखील केले. एक हजारांपेक्षा अधिक गाणी देखील त्यांनी रचली. पाच हजारांपेक्षा अधिक तियात्र प्रयोगात त्यांनी काम केले. त्यांनी रचलेले एकोच रस्ता नावाचे तियात्र, हे त्यांनी रचलेल्या तियात्र पैकी एक म्हत्वाचे तियात्र.

ओफेलीया नावाची एक अभिनेत्रीची trajedi queenअशी ओळख होती.

असे एक ना एक तियात्र क्षेत्रातील स्त्री कलाकार. त्यांची यादी अजूनही मोठी आहे.

रॉबिन वोज यांनी डॉन बॉस्को, डॉमनिक सावियो, फातिमा सायबीण या सारखी धार्मिक तियात्र रचली. कॅथोलिक ख्रिश्चनांचे रोम मधील जगद्गुरू सहावे पोप पॉल मुंबई दौऱ्यावर असताना त्यांच्या समोर एक तियात्र ऑक्टोबर ५, १९८० रोजी सादर केले गेले. ते केले होते Aristides Dias नावाच्या तियात्र कलाकाराने , आणि तियात्रचे नाव होते डायव्होर्स.

(क्रमशः)

तियात्र: गोव्याचा रंगमंच 

गोव्यातील नाट्यरंगभूमीचा एक अविष्कार म्हणून तियात्र ओळखले जाते. गोव्याची भटकंती कित्येकदा झाली आहे, पण पूर्वी मी कधी त्याबद्दल ऐकले/वाचले नव्हते.  पण २०१७ च्या एप्रिल मध्ये गोव्यात गेलो असता हॉटेलमध्ये वर्तमानपत्रात पणजीतील एका कार्यक्रमाचे निवेदन मी वाचले. त्यात तियात्रच्या १२५व्या वर्षाच्या  प्रारंभाबद्दल तो कार्यक्रम असणार होता. अर्थात मी तेथे जाऊ शकलो नाही. नंतर केव्हातरी याबद्दल माहिती काढावी असा विचार केला होता, पण कालौघात विसरून गेलो. काही महिन्यांपूर्वी(डिसेंबर २०१९) मी एका कन्नड मासिकात ख्रिसमस स्पेशल सदरात तियात्र बद्दल एक लेख वाचला. मराठी नाट्यरसिकांसाठी तो भाषांतरित करावा असे वाटले.  हा मूळ लेख फ्रान्सिस एम एन यांचा आहे. काही दिवसांपूर्वीच गोवा मुक्तीदिन साजरा झाला, पोर्तुगीज राज्यकर्ते परत गेले. गोव्याच्या संस्कृतीवर पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव ठिकठिकाणी दिसून येतो. ते नाकारता येणार नाही. रंगभूमीवर हा प्रभाव कसा झाला हे ह्या लेखाद्वारे पाहणे रोचक ठरावे. आपल्या ब्लॉगच्या सोयीसाठी मी हे भाषांतर काही भागांतून देणार आहे. आज पहिला भाग देत आहे.

तियात्र (Tiatr): गोव्याचा रंगमंच 

पाश्चिमात्य आणि भारतीय संस्कृतीचा संकर असलेला हा नाट्यप्रकार म्हणजे आधुनिक  लोकनाट्य प्रकार असे म्हणता येईल.

सभोवताली हिरवाकंच सस्यश्यामलाम् असा परिसर, पाहावे तिकडे ताडा माडांची झाडे, भातशेती, गावातल्या घरांसमोर तुलसी वृंदावन, त्यांची ती कौलारू घरे, भलेथोरले आंगण, ठिकठिकाणी दिसणारी छोटी मोठी दगडी मंदिरे, चर्च, मशिदी, कायम लोकांनी गजबजलेला समुद्र किनारा, भाताचा घमघमाट, माश्याचे कालवण, वाटीएवढाल्या इडल्या, केळ्याच्या बागा, फुटबॉलचा खेळ, तसेच फेणी आणि कार्निवल असे सगळे आपल्या डोळ्यासमोर गोवा म्हटले कि येते. या साऱ्या सोबत, आठवड्याच्या शेवटी तियात्र नाटकाचा आस्वाद घेणारी रसिक मंडळी, विसरून चालणार नाही!

गोव्यातील लोकांच्या जीवनात पाश्चिमात्य संगीत, तेथील खाद्य-संस्कृती या व्यतिरिक्त गाणे -बजावणे ह्या अतिशय आवडत्या गोष्टी आहेत. सुमारे दीड शतकांपूर्वी गोव्यातील काही रंगभूमी प्रेमी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी हा तियात्र नावाचा आधुनिक काळातील लोकनाट्य प्रकार निर्माण केला आणि तो तेव्हापासून गोव्याच्या घराघरातील जनतेच्या जीवनाचा एक भागच बनला, तसेच तेथील संस्कृतीचा देखील एका अविभाज्य भाग बनला.

काय आहे हे तियात्र? एका माहितीच्या ठिकाणी, नट मंडळी तेथील रसिक प्रेक्षकांच्या समोर एखाद्या काल्पनिक अथवा घटीत कथेवर आधारित हास्य, व्यंग, शोकान्त , सुखांत, अश्या सर्व रसांनी तसेच संगीताने परिपूर्ण असे नाटक म्हणजे तियात्र होय. सामान्य लोकांच्या जीवनातील, मनातील राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक अश्या प्रकारच्या समस्यांना तोंड फोडणे, किंवा जाता जाता प्रस्थापित व्यवस्थेला एखाद-दुसरा चिमटा काढत, जन जागृती करण्याचा हा नाट्यप्रकार, रंगविष्काराचा प्रकार म्हणजे तियात्र. आजमितीला १२२ वर्षे हि कला सादर केली जात आहे, आणि तिने आपल्यासोबत समाजातील साऱ्या वर्गाना बरोबर घेत हि वाटचाल केली आहे.

नव्या काळातील रंगभूमी प्रकार

आधुनिक संगीताच्या सावलीत नव्या काळातील उत्पत्ती म्हणजे तियात्र असे म्हणता येईल. प्रती वर्षी गोव्यात या तियात्र नाट्यप्रकाराचा जन्मोत्सव साजरा करण्याचे योजले आहे. पहिल्या वहिल्या तियात्र प्रयोगाचा साद्यंत इतिहास उपलब्ध आहे. त्यामुळे तियात्र नाट्यप्रकाराच्या जन्माचा दाखला आहे! त्यामुळे जन्मोत्सव साजरा होण्याचे त्याच्या नशिबी आहे.

कर्नाटकातील करावळी(म्हणजे किनारपट्टीवरील, कोंकण) भागातील लोकं स्थलांतरित होऊन नवीन जागी गेलेल्या ठिकाणी यक्षगानाचे प्रयोग, त्यातील प्रवेश सादर करत असतात. गोव्याबरोबर, गोव्यातील लोक घेऊन, कर्नाटकातील मंगळूर, महाराष्ट्रातील मुंबई , तसेच इंगलंड, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, कॅनडा मध्ये तियात्रचे प्रयोग कायमच होत असतात.

कालांतराने गोव्यात पोर्तुगीज आले, त्यानंतर ब्रिटीश देखील आले. गोव्यातील लोकांनी स्वतःची लोकनाट्य तसेच रंगभूमीच्या साठी म्हणून झागोर (Zagor) नावाची संस्था सुरु केली. आल्फ्रेड थिएटर, व्हिक्टोरिया थिएटर, Gaity Theater या ठिकाणी गोव्याचे मूळ लोकनाट्य झागोरचे खेळ/प्रयोग सादर केले जायचे. १८६२ मधील नोव्हेबर महिन्यात लंडन मधील ब्रिटीश संसदेत झालेला झागोरचा प्रयोग दादाभाई नवरोजी यांनी देखील पाहिला होता.

मुंबई तियात्रचे जन्मस्थान

त्यावेळच्या महाराष्ट्रात १८५२ पासूनच कंपनी नाटक (अर्थात नाटक मंडळ्या) सुरु झाल्या होत्या. आधीपासूनच त्यांना व्यापारी मंडळीकडून उत्तेजन आणि प्रोत्साहन मिळत गेले. मुंबई मध्ये स्थायिक झालेली गोव्यातील मंडळी इंग्रजी, किंवा पोर्तुगीज भाषेतील नाटकांचे प्रयोग करत असत. तियात्र गोव्याचा; गोव्यातील लोकांचा, पण त्याचा जन्म महाराष्ट्रातील वाणिज्य नागरी मुंबई मध्ये झाला. याचा जनक लुकासिनो रीबेरियो (Lucacinho Ribeiro)हा होय.

‘इटालियन भुर्गो’ (म्हणजे इटलीचा मुलगा) या नावाचा पहिलावहिला तियात्र प्रयोग मुंबईतील न्यू आल्फ्रेड थियेटर मध्ये एप्रिल १२, १८९२ मध्ये झाला. मुंबईतील स्थायिक गोवेकरी मंडळी , तसेच इतर प्रतिष्ठित प्रेक्षकांच्या समोर हा प्रयोग सादर करण्यात आला. त्या दिवशी इस्टरचा सण होता. आज त्या थियेटरच्या जागेत मुंबईच्या पोलीस कमिशनरचे कार्यालय थाटले गेले आहे. त्यानंतर त्याने जानेवारी एक तारखेला आपल्या गोव्यातल्या जन्मस्थानी म्हणजे बार्डेझ ( Bardez) तालुक्यातील अस्सा गाव (Assagao) येथे प्रयोग केला आणि गावकऱ्यांची वाहवाह मिळवली. त्या दिवशी गोव्यातील कॅथोलिक ख्रिश्चन संस्कृती आणि इटालियन रंगभूमीचा मिलाफ तियात्र मध्ये झाला.

गोव्याच्या भूमीतून मुंबईला हाताला काम शोधात रीबेरोयो आला आणि तेथे तो कोंकणी नाटकातून नांदी गात असे. त्याचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते, आणि तसेच त्याच्या जवळ संगीताचे ज्ञान देखील होते. व्हायोलीन आणि सारंगी देखील तो वाजवत असे, गाण्यांना चाली देखील देत असे. त्यावेळी मुंबईत साऱ्या हिंदुस्तानातून लोकं येत असत, आली होती. इटालियन नाटके(ओपेरा) पाहणारी मंडळी देखील होती (Royal Opera House). मुंबईत असलेल्या इटालियन नाटक मंडळीत त्याने नेपथ्याचे काम करत, त्यांच्या सोबत अनेक ठिकाणी दौऱ्यावर गेला होता, जसे पुणे, मद्रास, कलकत्ता, सिमला वगैरे.

इटालियन भुर्गो

एकदा तो काम करत असलेली इटालियन नाटकाची कंपनी बर्मा(आजचे म्यानमार) येथे दौऱ्यावर असताना त्याने ते काम सोडून परत मुंबईत आला. आपण स्वतः नाटके लिहून, ती बसवून त्याचे प्रयोग करावेत असे त्याचे स्वप्न होते. ती कंपनी सोडताना त्याने कंपनीतील नटमंडळी वापरत असलेली काही रेशमी मखमली पोशाख त्याने विकत घेतले होते. ती कंपनी करत असलेल्या एका नाटकावर आधारित त्याने रचले. काही समविचारी कलाकारांना त्याने बरोबर घेतले आणि नऊ एक पात्रे असलेले ते नाटक त्याने रंगमंचावर आणले.

पोशाख असेल, गायकी असेल, संगीत असेल, त्या सगळ्यात त्याने इटालियन रंगभूमी परंपरे प्रमाणे होते. दोन अंकांच्या दरम्यान गायली जाणारी गाणी जी होती त्यांचा क्रम त्याने वेगळा केला हे त्यांचे नाविन्य होते. तियात्र मधील पद कोंकणी भाषेत तसेच पोर्तुगीज भाषेत ठेऊन त्याचे त्रियात्रो असे नामकरण केले. पहिल्या प्रयत्नात असलेला हा तियात्र ओबडधोबड असलेला, काळानुसार बदलत गेला आणि तो गोव्याच्या लोकनाट्याचे परिपूर्ण रूप घेतले.

इंग्रजी भाषेतील तियेटर शब्दाशी साम्य असणारा पोर्तुगीज शब्द तियात्रो हा ‘तियात्र’ चे मुळ असावे. हा तियेटर शब्द सामान्य लोकात थियेटर, थेटर असा आपल्याकडे उच्चारला जातो. तसेच हा तियात्र शब्द आधी थियात्रो, थैत्रो, तिअत्रो, अश्या तऱ्हेने उच्चारला जाई. गोवा कला अकादमीने तियात्र असे नामकरण केले, तोच शब्द आता रूढ आहे.

त्यामुळे आधीपासूनच भरपूर मनोरंजन करणारा हा नाट्यप्रकार गोव्याला प्रसिद्धी मिळवून गेला. गोव्यातील कोंकणी भाषिक रोमन कॅथोलिक ख्रिस्ती लोकांची हि नाट्यचळवळ म्हणावी लागेल. नाटके तीच लोकं रचत असत, आणि तीच लोकं त्याचे प्रयोग करत असत. चर्च मधील विविध समारंभाच्या वेळेस, सणासुदीच्या वेळेस त्याचे प्रयोग होत असत. तियात्र हि त्यांची एक सांस्कृतिक ओळखच बनली. त्यामुळे, ह्या नाट्यप्रकाराला, ‘रोमन कोंकणी तियात्र’ असे देखील संबोधले जाऊ लागले.

आज तियात्र कॅथोलिक ख्रिश्चनांचा परीघ ओलांडून बराच पसरला आहे. समाजात त्याला आता ओळख आहे, मान्यता मिळाली आहे. अनेक हिंदू, मुस्लीम कलाकार त्यात आता आले आहेत, आणि ते कॅथोलिक ख्रिश्चनांची सीमा ओलांडून त्याला आता सामाजिक स्वरूप देत आहेत. या सर्वांमुळे, गोवा कला अकादमीने १९७४ मध्ये मे महिन्यात तियात्र उत्सव सुरु केला. त्या मुळे ह्या नाट्य प्रकारचा आणखीन प्रसार होण्यास मदत झाली. हिंदू समाजातील लोकं कोंकणी भाषेत नाटके रचून त्याचे प्रयोग करत असत, ते मराठी नाट्यपरंपरा डोळ्यासमोर ठेऊन. त्याला कोंकणी नाटक म्हणतात.

(क्रमशः)

Under the hood of Paramount Theater

Paramount Theater च्या अंतरंगात

मी सिएटल मध्ये राहत असलेल्या जागेपासून ऐतिहासिक असे Paramount Theater एखादा मैल असेल नसेल एवढ्या अंतरावर आहे. नेहमी दृष्टीस पडे. पण एखादे musical किंवा नाटक आवर्जून पाहावे असे काही लागत नव्हते. नुकतेच मी The Nutcracker देखील पहिले होते. पूर्वी देखील फिलाडेल्फिया आणि न्युयॉर्क भेटी दरम्यान काही नाटके पहिली होती. त्यामुळे अमेरिकेत नाटके पाहण्यातील नाविन्य तसे गेले होते. आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देखील तीन तीन हजार लोकांसोबत नाटके पाहण्याचे टाळत होतो. Paramount Theater ची सैर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी असते हे कुठूनतरी समजले होते. त्यामुळे मी २०२२ च्या पहिल्या दिवशी, जो शनिवार होता, त्या दिवशी मी सकाळी सकाळी लवकर उठून दहाच्या आधीच तेथे धडकलो. अश्या ऐतिहासिक नाट्यगृहाच्या अंतरंगात शिरायला, इतिहास ऐकायची संधी मी सोडणार नव्हतो. मी मुंबईच्या ऐतिहासिक Royal Opera House मध्ये गेलो होतो काही वर्षांपूर्वी. त्यावेळेस मी जमेल तसे ते नाट्यगृह पहिले होते. पण असा इतिहास सांगणारा कार्यक्रम तेथे नव्हता आणि अजून नाही.

Paramount Theater च्या बाहेर सगळीकडे सामसूम होती. रस्त्यावर आजूबाजूला घट्ट झालेला बर्फ अजून तसाच पडला होता. मी सोडून तिकडे कोणी अजून फिरकले नव्हते. लोकं आज येतील कि नाही शंकाच होती आणि तसेच त्यामुळे नाट्यगृह दर्शनाचा कार्यक्रम रद्द होतो कि काय असे वाटत होते. मी नाट्यगृहाच्या तिन्ही बाजूला चक्कर मारून आलो. जुनी इमारत होती. विटांचे बांधकाम दिसत होते. My Fair Lady चा दुपारी प्रयोग होणार होता. त्याचे फलक लागले होते. पु ल देशपांडे यांचे ती फुलराणी हे नाटक याच नाटकाचे रुपांतर आहे, याची मनात आठवण झाली. बरोबर दहा वाजता एक जण माझ्याजवळ आला आणि मला नाट्यगृहाच्या दर्शनाच्या सैरी साठी आलो आहे के ते विचारले. मी हो म्हटले. त्याने मग काही वेळ इतर काही जण येत आहेत का ते पाहूयात आणि सैर करू यात असे म्हटले. मला आश्चर्याचा धक्का बसला. मला वाटले तो म्हणले जेवढे हवे तेवढे लोकं नाही म्हणून सैर होणार नाही असे म्हणेल. ती व्यक्ती नाट्यगृहाची व्यवस्थापक होती, त्याचे नाव Mason Sherry.

आणि काही वेळाने खरेच त्याने मला एकट्याला घेऊन सैर सुरु केली. जवळ जवळ दीड तास तो मला घेऊन नाट्यगृह, त्याचा इतिहास अगदी उत्कटपणे नमूद करत होता. त्याचा एक सहकारी देखील काही वेळाने तेथे आला आणि त्याने एका ऐतिहासिक पियानो बद्दल माहिती तेवढ्याच उत्कटपणे दिली. गेली दोन वर्षे हा कार्यक्रम झाला नव्हता. २०२१ च्या ऑक्टोबर मध्ये परत सुरु करण्यात आला होता. हे नाट्यगृह सुरु झाल्यापासून त्याची मालकी, हस्तांतरण, देणगीदार याबद्दल देखील त्याने सविस्तर माहिती दिली.

आम्ही आत गेलो तो समोर रंगमंचावर My Fair Lady च्या दुपारच्या प्रयोगाचे नेपथ्य करून झाले होते. १९२८ मध्ये Seattle Theater नावाने सुरु झालेल्या ह्या नाट्यगृहाबद्दल सांगायला सुरुवात केली. १९२० चे दशक अमेरिकेत मूकचित्रपटाने व्यापले होते. खरे तर हे मूकचित्रपट दाखवायला म्हणून हे ३००० आसनक्षमतेचे चित्रपटगृह म्हणून सुरु झाले. तो म्हणाला कि सुरुवातीची बॉक्स ऑफिसची जागा मुख्य दरवाजाच्या मध्यभागी होती. नंतर ती एका बाजूला करण्यात आली. Grand Lobby मध्ये उभे राहिल्यावर दिसणारा आजूबाजूचा भाग, भिंतीवरची सोनेरी फुलापानांची कलाकुसर, भले थोरले chandelier, दरवाज्याच्या वरच्या भागात The Lion King नाटकातील सिम्बाच्या चेहऱ्याचे शिल्प, ख्रिसमस ट्री उलटा टांगायला असलेले मजबूत असा आकडा असे सर्व तो अखंड बडबड करत सांगत होता.

नाट्यगृहातील आसन व्यवस्थेच्या वैशिष्ट्यांचे तो वर्णन करू लागला. मुख्य भागातील जवळ जवळ दोन हजार आसने एका बाजूला सारून भलेमोठे पटांगण तयार होईल अशी व्यवस्था नाट्यगृहात आहे. तशी व्यवस्था जगात कुठेच नाही. त्याने मला नंतर खाल्याचा मजल्यावर गेल्यावर ती व्यवस्था कशी चालते याचे दर्शन मला घडवले. असंख्य hydraulic systems द्वारे ती व्यवस्था होती. तश्या तयार झालेले पटांगण विविध कार्यक्रम करायला वापरले जाते. एखादी rock concert, ballroom असेल, किंवा अगदी ice skating सारखे कार्यक्रम देखील झाले आहे असे तो मला म्हणाला. दोन्ही बाजूला मोठ्या अश्या जाळीदार panel च्या मागे ऑर्गनचे सूर ऐकू येण्याची व्यवस्था आहे असे त्याने सांगितले. वरती छताकडे बोट दाखवत घुमटासारखे काहीतरी होते, छान पिवळ्या दिव्यांनी ते उजळले होते. त्या घुमटाचा देखील ध्वनी परिवर्तीत करण्यामध्ये उपयोग होतो अशी माहित त्याने पुरवली. हिवाळ्यात वाफेचा वापर करून नाट्यगृह कसे गरम राखले जाते याबद्दल त्याने सांगितले. रस्त्याच्या पातळीच्या वर जेवढी इमारत आहे, तेवढी खाली देखील आहे.

रंगमंचाच्या खाली orchestra pit होते ते दाखवले. आणि मला थेट रंगमंचावर नेले. माझा स्वतःवर विश्वास बसेना. समोर तीन हजार खुर्च्या, भले मोठे नाट्यगृह आणि My Fair Lady च्या नेपथ्य झालेल्या रंगमंचावर त्यांच्या सोबत उभा! समोर एक दिवा मिणमिणत होता, बाकी तसा अंधार होता. त्या दिव्याला ghost light म्हणतात असे त्याने सांगितले आणि त्याचा उपयोग सांगितला. गेली दोन वर्षे नाट्यगृह बंद होते. तरीदेखील तो दिवा कायम लावला गेला होता, जेणेकरून ते परत सुरु होणार हा संदेश देत असल्याची भावना त्यामागे होती, असे तो भावूकपणे सांगत होता. त्यानंतर मला त्याने नाट्यगृहातले प्रमुख आकर्षण म्हणजे ऑर्गन(Wurlitzer Organ) दाखवला, ज्याचे sound pipe नाट्यगृहात दोन बाजूला भिंतीवर गेले आहेत.

Posters of past shows in green room

नंतर त्याने मला green room, कलाकारांसाठी असलेल्या विविध सुविधा, त्यांच्या खोल्या ह्या दाखवल्या. मी पूर्वी फक्त एकदा पुण्यातील बालगंधर्वच्या ह्या भागात गेलो होतो. तेथील दृश्य माझ्या डोळ्यासमोर आले, आणि इथली व्यवस्था पाहून स्वतःची कीव आली. नंतर त्याने मला रंगमंचाच्या खालच्या भागात नेले. तो भाग दाखवला. तेथील भिंतींवर जुन्या गाजलेल्या नाटकंचे, musicalsचे, आणि इतर कार्यक्रमांचे पोस्टर्स लावले गेले होते.

नाट्यगृहाच्या अगदी वरच्या भागात जेथे चित्रपट दाखवण्यासाठी म्हणून लागणारी प्रोजेक्टर व्यवस्था असते तेथे नेले. एका भागात जुने निकामी झालेले प्रोजेक्टर्स पडले होते. त्यांची व्यवस्था एका संग्रहालयात करण्यात येणार आहे त्याने नमूद केले. कार्बनच्या पेटत्या दांड्याने प्रोजेक्टर कसा फिल्म प्रोजेक्ट करत असे त्याबद्दल त्याने माहिती दिली. तेथील भिंतीवर असंख्य स्टेनसिल आर्ट प्रकारातील रंगरंगोटी दिसली. त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला कि हे प्रोजेक्टर ऑपरेटर लोकं तो उद्योग करत असत असे त्याने सांगितले. खालच्या मजल्यावर येत, त्याने मला महिलांच्या स्वछ्तागृहाकडे नेत म्हणाला कि तुम्हाला मी छानशी गोष्ट दाखवतो. मी मनात म्हणालो इथे काय असेल बुवा पाहण्यासारखे. त्या जागेवर पूर्वी प्रेक्षकांना नाटकाच्या प्रयोगात मध्यांतरात एकत्र होण्यासाठीची जागा होती. एका भिंतीवर एक छोटीशी पाटी होती. त्यावर एका महिलेच्या लग्नाच्या दिवशी येणाऱ्या लोकांचे स्वागत करणारा तो फलक होता. त्याची त्याने कथा सांगत म्हणाला कि एका महिलेने ते नाट्यगृह लग्नासाठी राखले होते. पण व्यवस्थापनाने नंतर एका नाटकाच्या प्रयोगासाठी तिचे आरक्षण रद्द केले. त्यावर तिने भरपाई म्हणून पैसे मागितले, दुसरीकडे लग्नासाठी जागा मागितली आणि शेवटी Paramount Theater मध्ये आम्ही उभे होतो त्या ठिकाणी तो फलक लावावा अशी मागणी केली, आणि ती पुरी करण्यात आली!

त्याच भागात मला एक छोटेखानी पियानो जे play piano होते ते पाहायला मिळाले. Kurt Morrison जो याची देखभाल करतो त्याने मला piano roll घातले कि वाजते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

२०२२ सालचा पहिला दिवस असा सार्थकी लागल्याचे समाधान मला लाभले होते. मी क्षणाचाहि विचार न करता भारावून शंभर डॉलर त्या दोघांच्या हातावर देत म्हणालो हि तुमच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेविषयी, उत्कटपणे तुम्ही हे सगळे जगताय , ह्या साठी माझी छोटीशी भेट. ती त्यांनी स्वीकारली, पण लगेच नाट्यगृहाच्या फंडात ती जमा करू असे त्यांनी सांगितले. त्यांच्या आपल्या कामाच्या जागेबद्दल, कामाबद्दल, नाट्यकले बद्दल असणारे प्रेम, आणि एकूणच जाणीव या सर्वाना मी सलाम करून भारावलेल्या मनाने घरी परतलो.

The Nutcracker Ballet

मला नाटकांचे वेडआहे. मिळेल तिथे, मिळेल तशी मी नाटकं पाहत असतो. त्याबद्दल लिहितहि असतो. पुण्यात पाहत असलेल्या नाटकांबद्दल, कर्नाटकात बंगळूरूला गेल्यावर तिथली कन्नड नाटकं पाहतो, त्याबद्दल लिहितो. अमेरीकेतीही मी अधून मधून जात असतो तेव्हा जमेल तशी नाटकं पाहत असतो. काही वर्षांपूर्वी मी The Phantom of Opera हे गाजलेले नाटक पहिले होते, तेही न्युयॉर्क मधील प्रसिद्ध Broadway वर! मी सध्या अमेरिकेतील सिएटल(Seattle) शहराची सैर करत आहे. हिवाळ्यामुळे येथे हवा अतिशय थंड , दिवसही लहान. त्यात ख्रिस्तमसचे दिवस. रात्री सगळीकडे रोषणाई. आणि मला ख्रिस्तमसच्या सुट्टीत अमेरिकेत कित्येक दशकांपासून पहिले जाणारे नाटक पाहायला मिळाले. त्याचे नाव The Nutcracker. हे नाटक खरे पहिले तर ballet नृत्यप्रकार वापरून सांगितलेली पारंपारिक गोष्ट आहे.

सिएटल सेंटर भागात असलेल्या McCaw Hall मध्ये ह्या नाटकाचा प्रयोग होता. मी राहत असलेल्या ठिकाणापासून १५-२० मिनिटांची पदयात्रा होती. ती मी करून तेथे पोहचलो. प्रयोगाची वेळ संध्याकाळची ७.३० ची होती. अमेरिकेतील नाटकांना, संगीत कार्यक्रमांना तो सुरु झाल्यावर सहसा प्रवेश देत नाहीत. हे माहित असल्यामुळे मी अमंळ लवकर निघून लवकरच पोहोचलो होतो. पाहतो तो काय, नाट्यगृहाचा परिरसर लोकांनी फुलून गेला होता. चित्ताकर्षक रोषणाई केली होती. नाटकाचे रंगीबेरंगी मोठाले भित्तीपत्रके लावली गेली होती. लहान मुलांची उपस्थिती लक्षणीय होती.

McCaw Hall

नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेने आपले नागरिक सोडून इतरांना देशात प्रवेश करायला जी सर्वसाधारण बंदी आणली होती, २०२१ च्या मे महिन्यापासून, ती बंदी नोव्हेंबर मध्ये उठवली गेली. माझे अमेरिका प्रयाण जे गेली काही महिने कोरोना मुळे रखडले होते, मी लगेच जायचा निर्णय घेऊन, अमेरिकेत धडकलो. एका आठवड्यातच ओमायक्रोनची (Omicron) बातमी आली आणि परत निर्बंधांचे सावट आले. मी देखील तिसरा बुस्टर डोस देखील घेतला आणि मनात धाकधूक ठेवूनच मी ह्या नाटकाला जाण्याचा निर्णय घेतला होता. मुद्दामच शनिवार रविवार सोडून आडवारी गेलो होतो. तर तेथे हि गर्दी. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला!

मास्क आणि कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्र बघून आत सोडत होते. त्यामुळे जरा बरे होते. मास्क देखील लोकांनी त्यांच्या नाटकाला जायच्या नेहमीच्या पोशाखावर लोकांनी चढवले होते. त्यामुळे एकूण दृश्य मजेशीर दिसत होते. एक दोन कोपऱ्यात मोठमोठाले चंदेरी चकचकीत रोषणाई केलेले ख्रिस्तमस ट्री उभे केले होते. तेथे छायाचित्र काढायला लोकांची गर्दी उसळली होती. अमेरिकेत नाटकाला जाणाऱ्या प्रत्येकाला नाटकाची एक पुस्तिका(playbill) दिली जाते, ती तशी ह्या देखील नाटकाला दिली गेली. ती घेऊन मी आत गेलो, आणि मी तडक रंगमंचाकडे गेलो. त्याजवळ असलेल्या बेचक्यात पाश्चात्य संगीत वाजवणाऱ्या वादकांचा चमू बसला होता आणि प्रत्येक जण समोर असलेल्या नोटेशन मध्ये पाहून काहीना काही वाजवत आपलाले वाद्य तपासून घेत होते.

नाटक तसे दहा मिनिटे उशिरा सुरु झाले. दोन अंकी नाटक होते. Balletनृत्य असल्यामुळे संवाद नसणार होते. फक्त संगीत आणि नृत्य, हावभाव. पुस्तिकेवरून साधारण अंदाज आला. अतिशय भव्य असा रंगमंच, वेगवेगळी दृश्ये बदलण्याची खास व्यवस्था हे सारे प्रेक्षणीय होते. ह्या नाटकाला तसा बराच मोठा इतिहास आहे, आणि गमतीची बाब अशी कि हे नाटक अमेरिकेतील कुटुंबासाठी त्यांच्या ख्रिस्तमस सोहळ्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. हे ballet नृत्य १८१६ मध्ये जर्मन लेखक Hoffmann याच्या एका लघुकथेवर आधारित, १८९२ मध्ये प्रथम त्यावेळच्या सोविएत रशियात प्रदर्शित झाले. मूळ सोविएत रशियाच्या जॉर्जिया प्रांताचा असलेला आणि नंतर अमेरिकेन नागरिक झालेला George Balanchine या ballet नृत्य रचनाकाराने रचलेल्या , पण मूळ संगीत रचना त्याच कायम ठेऊन, १९५४ मध्ये सादर केलेल्या प्रयोगाची हि आवृत्ती होती, ती Pacific Northwest Ballet (PNB) या विविध ballet नृत्य सदर करणाऱ्या सिएटल स्थित कंपनीची. Ballet नृत्य प्रकारात प्रामुख्याने पायांच्या बोटांवर तोल सांभाळत , नजाकतीने नृत्य करतात. अतिशय अवघड प्रकार आहे, पाहताना सारखे कसे करत असतील असे वाटत राहते. हा नृत्य प्रकार इटलीत जन्माला आला, आणि पुढे रशिया, फ्रान्स देशातही तो चांगलाच फोफावला. तिची स्वतःची एक नृत्य भाषा आहे.

या नाटकाची कथा थोडक्यात अशी आहे. खरेतर हि एक परीकथाच आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. आता nutcracker म्हणजे काय या पासून. याचा शब्दशः अर्थ आहे तो अडकित्ता. हो , आपण वापरतो तो सुपारी काताराण्यासाठी असलेला अडकित्ता. जर्मन प्रदेशात तो विविध प्रकारचा सुका मेवा जसे अक्रोड फोडण्यासाठी वापरत असत. कालांतराने, त्याचे शुभचिन्ह, दुष्ट शक्तींपासून घराचे रक्षण करणारे, घरात ठेवण्याची वस्तू, म्हणून वापर सुरु झाला. त्यामुळे प्रत्येक घरात असे लाकडी, रंगीत, बाहुली सारखे nutcracker असतात. तसेच ते तेथील मुलांच्या खेळण्यातील देखील भाग झाला.

दोन अंकात ह्या नृत्य नाटिकेचे सादरीकरण आहे. पहिल्या अंकात एका घरात ख्रिस्तमस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असते. बरीच लहान मुले, आणि कुटुंबातील इतर मोठी माणसे रमत गमत, हसत खिदळत ,नाचत हा सोहळा साजरा करत असतात. त्या घरातील क्लारा नावाच्या मुलीला एक लाकडी nutcracker भेट म्हणून देतात. तिचा दुष्ट भाऊ, फ्रिट्झ, असूयेपोटी त्याचे तुकडे करतो आणि ख्रिस्तमस ट्री मध्ये लपवून ठेवतो. क्लारा तो जवळ घेऊन झोपी जाते. आणि गंमत सुरु होते. पुढील सर्व प्रयोग तिच्या स्वप्नात आहेत असे दाखवले आहे. रात्री बाराच्या ठोक्याला, सगळे गाढ झोपेत असता, जवळचा ख्रिस्तमस ट्री आपोआप वाढू लागतो. तो लाकडी nutcracker जिवंत होतो. उंदरांची फौज रंगमंचावर येते. त्यांची आणि फ्रिट्झच्या खेळण्यातील सैनिक जे मोठे झालेले असतात, ते आणि उंदरांची झटापट सुरु होते, त्यात शेवटी उंदरांचा प्रमुख nutcracker कडून मारला जातो. पुढच्या दृश्यात nutcracker चे रुपांतर देखण्या राज्पुत्रात होते. तो आणि क्लारा बर्फाने आच्छादलेल्या जंगलात गेलेले दाखवले आहे. तेथे त्यांचे प्रेक्षणीय ballet नृत्य आपल्या पुढ्यात येते. पहिला अंक येथे संपतो, आणि टाळ्यांच्या गजरात पडदा पडतो.

दुसऱ्या अंकात तो राजपुत्र साखरेच्या दुनियेत जातो(Land of Sugar).तेथे विविध देशांच्या गोड खाद्यपदार्थ रुपी पऱ्या दाखवल्या आहेत. अरेबियाची कॉफी, चीनचा चहा, रशियाची candy अश्या स्वरूपात त्या सर्व पऱ्या आपल्या समोर येतात, त्या त्याचे balletनृत्य कौशल्य दाखवतात आणि टाळ्या मिळवतात. ह्या अश्या नाच गाण्यांत, पुढे क्लारा आणि राजपुत्र रेनडीअरच्या रथात बसून परत आपल्या जगात येतात, आणि तेथे तिचे स्वप्न थांबून , तिला जाग येते. आणि नाटक तेथे समाप्त होते.

जसे सिएटल मधील PNB हि संस्था The Nutcracker सादर करते, तसेच अमेरिकेतील इतर अनेक ballet नृत्य संस्था देखील हे नाटक सादर करतात. न्यूयॉर्क शहरात देखील New York City Ballet ने देखील ह्या वर्षी ह्याचे प्रयोग सुरु केले होते, पण आजच बातमी आली आहे कि, वाढत्या कोरोना संक्रमणामुळे, त्या शहरात निर्बंध कडक करण्यात आले आहेत, आणि त्यामुळे ह्याचे प्रयोग आता तात्पुरते तरी दुर्दैवाने थांबले आहेत.

साखर खाल्लेला माणूस

साखर खाल्लेला माणूस हे नाटक प्रशांत दामले आणि शुभांगी गोखले यांचे आहे, त्यावर मी आधी इंग्रजीत(का कोणास ठाऊक!) लिहिले होते. जुलै २०१७ मध्ये पाहिले होते आणि त्याच वेळी लिहिले होते. मराठीत देखील लिहायला सुरुवात केली होती, पण अर्धवट राहिले होते, कच्चा खर्डा तसाच पडला होता. परवा नजरेस पडला. तो पूर्ण करून आज इथे देतो आहे.

नाटकांबद्दल मी माझ्या ब्लॉग वर नेहमीच लिहीत आलो आहे. आज परत योग आला आहे, तेही पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर मध्ये पाहिलेल्या नाटकाबद्दल. कित्येक दिवसांनी मी बालगंधर्व मध्ये नाटक पहिले. पूर्वी मी तेथे खुपदा नाटकं पहायचो. नुकतेच बालगंधर्व रंगमंदिर सुरु होऊन गेल्याला ५० वर्षे झाली(सुवर्ण महोत्सवी वर्ष). त्यानिमित्ताने त्याचे नुतनीकरण केले गेल्याचे मी ऐकले होते. तेही पाहायचे राहिले होतेच. तर मी पहिले ते नाटक म्हणजे सध्या गाजत असलेले साखर खाल्लेला माणूस. प्रशांत दामले आणि शुभांगी गोखले यांची प्रमुख भूमिका असलेले हे नाटक. दोघेही माझे आवडते कलाकार. शुभांगी गोखले यांची नाटके मी पूर्वी पाहिलेली नाहीत. पण प्रशांत दामलेची तर मी कित्येक नाटके पहिले आहेत. प्रशांत दामलेची रेकॉर्ड असलेली एकाच दिवशी पाच नाटकांचे पाठोपाठ प्रयोग या बालगंधर्व मध्येच होते, त्यावेळेस त्याचे चार दिवस प्रेमाचे हे नाटक पाहिले होते.

साखर खाल्लेला माणूस हे त्याचे नवे नाटक येऊनही बरेच दिवस झाले. आता तर ते नाटक लंडन वारी देखील करून आले आहे. आपण सगळे जण लहानपणी एक कविता वाचली असते ज्याची सुरुवात “ Johnny, Johnny..Yes, Papa, eating sugar? No, Papa!”. मला माहित आहे की, ब्लॉगचे शीर्षक “साखर खाल्लेला माणूस” असे आहे, मुलगा नाही. असो. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे मला बर्‍याच काळाने नाटक पहायची संधी मिळाली. पूर्वी मी तिथे नेहमीच नाटकं बघायचो. हे थिएटर आपले 50 वे वर्ष साजरे करीत आहे. खुद्द बालगंधर्वांनीच नाट्यगृहाची पायाभरणी केली होती. गेल्या महिन्यात 5 दिवसाचा उत्सव आयोजित केला होता, ज्याला मी भेट देऊ शकलो नव्हतो.

तर ह्या नाटकात प्रसिद्ध नाट्य कलाकार प्रशांत दामले आणि शुभांगी गोखले यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. दोघेही माझे आवडते अभिनेते आहेत. मी पूर्वी शुभांगी गोखलेचे कुठले नाटक पाहिलेले आठवत नव्हते; तिने स्टेजवर फारसे काम केलेले नाही (पण तिने काम केलेले श्रीयुत गंगाधर टिपरे किंवा अग्निहोत्र ह्या मालिका मला आवडायच्या आणि तिचे काम देखील). यापूर्वी मी प्रशांत दामलेची बरीच नाटके बर्‍याचदा पाहिले आहेत. मी काही वर्षांपूर्वी एकाच दिवशी पाच नाटकांतून त्याला लिम्कामध्ये विक्रमी कामगिरी करताना देखील पाहिले आहे. त्याची स्वतःची वेबसाइट आहे आणि खरं तर मी त्या वेबसाइटवरच या नाटकासाठी तिकिटे बुक केली आहेत. हे नाटक गेल्या वर्षी सुरू करण्यात आले होते. खरं तर, नुकतीच नुकतीच ती लंडनमध्येही गेली होती. या नाटकाची जाहिरात शुगर कोटेड ब्लॅक कॉमेडी म्हणून केली जाते. हे नाटक शुगर कोटेड तसेच ब्लॅक कॉमेडी देखील नाही. त्यामध्ये प्रशांत दामले असतील तेव्हा हा विनोद नक्कीच कसा आहे हा विनोद नाही. पण मधुमेहाच्या रोगाने ग्रस्त अशा मध्यमवयीन व्यक्तीवर एक विनोदी भाष्य आहे.

मला अशाच थीमवर खूप काळापूर्वी नाटक (वाजे पाउल आपले) पाहिल्याचे आठवले. त्या नाटकात मध्यमवयीन व्यक्तीला हृदयरोग होण्याचे आणि त्याच्याशी कसा सामना करायचा हे दाखवले गेले होते. मला वाटते की हे पुण्याच्या प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशन नावाच्या मंडळाने आयोजित केले होते आणि मुख्य कलाकार दिलीप वेंगुर्लेकर होते. विख्यात मराठी लेखक विश्राम बेडेकर यांनी हे लिहिलेले (Norman Barasch and Caroll Moore यांचे इंग्रजी नाटक Send Me No Flowers वर बेतलेले होते). साखर खाल्लेला माणूस  हे उच्च मध्यमवर्गीय कुटूंबातील नाटक आहे, जिथे एका खाजगी विमा कंपनीत वरिष्ठ कार्यकारी असलेला मध्यमवयीन पतीला, एक दिवस मधुमेह झाल्याचे समजते. मग त्याची नेहमीच काळजी घेणारी पत्नी आणि कुटुंबातील इतर लोक थोडे जास्तीच संवेदनशील होतात आणि टोकाच्या प्रतिक्रिया देत त्याचे जगणे हैराण करतात. हे नाटक प्रेक्षकांना हास्याच्या सागरात डुबक्या मारून आणते,  याचे कारण अनेक प्रेक्षक देखील स्वतःच्या जीवनात ह्याच परिस्थितीतून जात असतात.

प्रशांत दामले त्याच्या अभिनयामुळे प्रसंगानुरूप विनोद निर्माण करण्यात, अचूक टायमिंग, आणि सहकलाकारांबरोबर असलेले tuning या मुले बहार आणतो. या नाटकातील पात्र साकारताना या सर्व गोष्टी करण्याची त्याला पूर्ण संधी आहे. त्याची सहकलाकार शुभांगी गोखलेही त्याची उत्तम साथ करतात. हे एक वेगवान नाटक आहे, प्रेक्षकांना श्वास  उसंत देखील देत नाही. या जोडप्याच्या मुलीचे प्रेम प्रकरण या नाटकाची आणखी एक बाजू आहे. वडीलांचे मुलीशी असलेले नात्याचेही छान सादरीकरण केले आहे. प्रत्येक प्रसंगामध्ये तयार झालेल्या विनोदामुळे आणि कलाकारांमधील ऊर्जेमुळे प्रेक्षक खुर्चीवर अडकून राहतात. प्रशांतला गाण्याची आवड आहे, त्याने या नाटकातही गायले आहे. एक छोटीशी चूक मला लक्षात आली ती म्हणजे तो संवादाच्या वेळी भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)चे ‘जिदंगीके साथ, जिंदगीके बाद’ ह्या घोषवाक्याचा संदर्भ येतो. हे घोषवाक्य एलआयसीचे आहे, कुठल्या खाजगी विमा कंपनीचे नाही.

आम्ही थिएटर जवळ जंगली महाराज रस्त्याच्या नुकत्याच नूतनीकरण केलेल्या भागात(smart city प्रकल्पाच्या अंतर्गत) चक्कर मारली. दिवसभर पाऊस पडत होता. या नवीन ओल्या रस्त्याने संध्याकाळी चालताना मस्त वाटत होते. रस्त्याचा नूतनीकरण केलेला विभाग बर्‍याच मोठा आहे. आशा आहे की हे असेच राहील. असो, नाटकाकडे परत येतो . मी प्रशांतच्या दुसर्‍या नाटकाबद्दल ब्लॉग लिहिला आहे (कार्टी काळजात घुसली). जरूर पहा आणि प्रतिक्रिया कळवा!

आधुनिक कला आणि सामाजिक परिवर्तन

आज गिरीश कार्नाड यांचा पहिला स्मृतीदिन. गेल्या वर्षी(म्हणजे २०१९ मध्ये) १० जूनला त्यांचे निधन झाले. पाच-सहा वर्षांपूर्वी माझी त्यांचासोबत ईमेल वर बातचीत झाली होती. निमित्त होते ते त्यांच्या एका कन्नड पुस्तकाचे मी करत असलेल्या भाषांतराचे. आगोम्मे ईगोम्मे असे त्याचे कन्नड नाव. भाषांतर तसे अजूनही संपलेले नाही. ह्या वर्षी होईल असे वाटले होते, पण झाले नाही, त्यातच लॉकडाऊनचे देखील निमित्त झाले.

त्या पुस्तकातील मी पूर्वी काही भाषांतरित लेख ह्याच ब्लॉगवर प्रसिद्ध केले होते. पहिला ब्लॉग एका कथेचे भाषांतर होते(सर्व काही संपल्यावर). दुसरे होते ते नाटक कलेच्या मुळाबद्दलच्या एका पौराणिक कथेचे(Origin of theatrical arts). तसेच त्यांनी गुरुदत्तच्या चरित्राच्या पुस्तकाला  लिहिलेल्या प्रस्तावनेचे देखील मी नुकतेच भाषांतर केले होते(गुरुदत्त कोण?). आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचाच पुस्तकातील एक वैचारिक लेख भाषांतरित स्वरूपात येथे देत आहेत. गिरीश कार्नाड प्रसिद्ध होते म्हणजे त्यांचे स्पष्ट आणि परखड विचार. ते भाषणे देखील भरपूर करत, त्यांना विविध ठिकाणी व्याख्यानाला बोलावणे येत असे. पुण्यात एकदा मी त्यांचे संगीताबद्दल विचार, शुभा मुदगल यांनी आयोजित केलेल्या बाजा गाजा या संगीत महोत्सवामध्ये, ते देखील इंग्रजीत.

हा लेख देखील म्हणजे त्यांचे एक भाषण आहे. ते देखील मुळ इंग्रजीत होते. त्यांचे कन्नडमधील भाषांतर त्यांच्या उपरोल्लिखित पुस्तकात त्यांनी प्रसिद्ध केला होता(आधुनिक कले मत्तू सामाजिक परिवर्तने असे त्या लेखाचे कन्नड शीर्षक). भाषणाचे निमित्त होते नेदरलँड्मधील एक कार्यक्रम. भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित तेथील Royal Tropical Institute ने India’s Culture in Motion हा कार्यक्रम आयोजित केला होता, १९९८ मध्ये. त्यावेळी त्यांनी केलेले अध्यक्षीय भाषण म्हणजे हा लेख होय. मुळ लेख बराच मोठा आहे. सोयीसाठी मी दोन भागांत ब्लॉग रुपात प्रसिद्ध करणार आहे. खाली दिलेले भाषांतर पहिला भाग आहे. पुढचा भाग नंतर प्रसिद्ध करणार आहे.

Girish Karnad

Girish Karnad. Photo from back-cover of his Kannada book Agomme Igomme

जाता जाता, गिरीश कार्नाड यांच्या चरित्राचे परिचय करून देणारा ब्लॉग(नोडनोडता दिनमान, आडाडाता आयुष्य#१) मी लिहिला होता. तसेच त्यांनी रचलेल्या तलेदंड नाटकाच्या प्रयोगाबद्दल देखील मी लिहिले होते(बसवण्णा, गिरीश कार्नाड आणि तलेदंड). ते देखील जरूर वाचा आणि ह्या श्रेष्ठ आणि बहुरंगी अश्या व्यक्तिमत्वाच्या स्मृतीला श्रद्धांजली अर्पण करूयात!

आधुनिक कला आणि सामाजिक परिवर्तन

भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने हे संमेलन आयोजित केले गेले आहे. याचा प्रमुख उद्देश असा आहे की, भारतात गेल्या अर्ध-शतकात, समाजात कलेच्या क्षेत्रात झालेलं वेग-वेगळे बदल आणि त्यांचा मागोवा, आणि त्यांचे विश्लेषण करणे हा आहे. सांस्कृतिक क्षेत्रात तरी स्वातंत्र्य-पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळ असे निश्चित असे कालखंड आहेत असे म्हणता येते. स्वातंत्र्योत्तर काळात क्रियाशील असलेल्या शक्ती ह्या स्वातंत्र्य-पूर्व काळातील वसाहतवादी युगात उगम पावून वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे ह्या शक्तींचा परिचय करून घेताना, त्यामागील प्रक्रिया देखील जाणून घेणे अगत्याचे आहे.

माझ्या विवेचनाच्या आरंभी मला ब्रिटीश काळातील दोन आयमाकडे आपले लक्ष वेधायचे आहे. पहिला आयाम म्हणजे, शिक्षण आणि राज्यकारभारात/व्यवहारात झालेले इंग्रजी भाषेचे आगमन हे होय. १९३३ मध्ये, लॉर्ड मॅकॉलेने लिहिलेल्या टिप्पणी असे म्हणते, ‘येथील मुळनिवासी जनतेला इंग्रजी साहित्य, तसेच विज्ञान समजण्यासाठी इंग्रजी भाषा शिक्षणाचे माध्यम होणे गरजेचे आहे, तसेच, सर्व पौर्वात्य शिक्षणासाठी देण्यात येणारी सरकारी मदत थांबवण्यात येत आहे’. या धोरणामुळे आमच्या सुशिक्षित समाजाची विचार प्रक्रियाच शासकीय भाषेनुसार नियंत्रित झाली. स्वतः भारतीयांत आपल्या जीवनाच्या विविध अंगांचा, पाश्च्यात परिकल्पनाचा झालेल्या परिचयामुळे, साम्राज्यवादाच्या चौकटीत ठेवून विवेचन करण्याची सुरु झाली. याचा परिणाम असा झाला की भारतीय बुद्धीजीवी समाजात स्वतःकडे पाहण्याची पद्धतीच बदलून गेली.

त्याच बरोबर, आमच्या समाजात एक नवी मूल्यव्यवस्था निर्माण झाली. आमच्या दैनदिन जीवनात देखील, काय बरोबर, किवा काय चुकीचे आहे, हे पाश्च्यात तर्क-पद्धतीनुसार ठरवू लागलो.

दुसरा आयाम असा की, मद्रास, कलकत्ता, मुंबई या सारखी नगरे निर्माण झाली आणि त्यांची वाढ झाली/होऊ लागली. अशा शहरीकरणामुळे, एका नवीनच मानसिकता समाजात वाढीस लागली. ब्रिटिशांच्या आधी सुद्धा, भारतात शहरे होती, नाही असे नाही; पण त्यांची मनोभूमिका वेगळी होती. त्या काळी समुद्र-किनारी असलेल्या राज्यांच्या व्यतिरिक्त, भारतातील बहुतेक शहरे ही समुद्र किनाऱ्यापासून लांब, अंतर्गत भूभागावर वसली गेली होती. ब्रिटीश संस्कृती ही ह्याच्या अगदी विरुद्ध अशी समुद्रगामी अशी होती. त्यांचा सर्व व्यापार हा सागरावर अवलंबून होता. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांनी समुद्रकिनारी शहरे वसविली. त्यामुळे भारतात त्यांनी ज्या तीन ठिकाणी नवीन शहरे निर्माण केली, त्यांना त्यांचा स्वतःचा असा पूर्वेईतिहास काही नव्हता. ह्या शहरात त्यांनी थाटलेल्या कारखान्याच्या आसपास, आणि ब्रिटीशांनी दिलेल्या सवलतीमुळे, एतद्देशीय भारतीय व्यापारी आकर्षित होवून ह्या शहरात येवू लागले. त्यामुळे हळूहळू ब्रिटीश साम्राज्य आपले पाय रोवू लागले. साहेबाच्या प्रती निष्ठा, कौतुक वाढीस लागले, त्याच्या सारखेच दिसावे ही भावना देखील वाढीस लागली. तसेच एका तऱ्हेचा Bourgeois समाजच निर्माण झाला, जो ब्रिटीश व्यापाराचा केंद्रबिंदू झाला.

पुरातन अथवा मूळच्या भारतीय नगरांत आणि वसाहतवादी अर्थव्यवस्थेतून नवीनच उदयास आलेल्या ह्या तीन शहरात मध्ये सुरुवातीपासूनच एक सांस्कृतिक भेद होता. भारतातील मुळच्या नगरात जरी लोक राहत असले तरी, त्या नगरांच्या आसपास असलेल्या गावामधून राहत असलेला समाज, याची जीवन मूल्ये ही साधारण एकच असत. देव, धर्म, जाती, कुटुंबव्यवस्था, सामाजिक संबंध वैगरे गोष्टी, त्या दोन्ही समजातील लोकाच्या आचरणात विशेष भेद नसे.

याविरुद्ध, ब्रिटीश वसाहतवादी काळातील ह्या नवीन नगरात ‘शहरी’ आणि ‘ग्रामीण’ असा भेद तीव्र होत गेला, असे दिसते. मुक्त अर्थव्यवस्थेवर आधारित व्यापार, वैयक्तिक कर्तृत्व शक्तीला मिळालेला वाव, तसेच सामाजिक जीवनात, धर्म-जाती-मत यांचे झालेले निराकरण, अशी ही सर्व ह्या नवीन शहरी संस्कृतीची वैशिष्ट्ये होती. एकूणच आधुनिक आणि पाश्चिमात्य नागरी जीवन हे लक्ष्य होते.

यामुळे, ग्रामीण भागातील लोक, ह्या दृष्टीने मागे राहू लागले, त्यांच्या मध्ये अज्ञान वाढीस लागले. शहरातील जीवन हे पुढारलेले आहे, अशी भावना वाढीस लागली, या सर्वामुळे, शहरे आणि ग्रामीण भाग यातील अंतर आणखीन वाढू लागले. ब्रिटीशांनी, शहरी भागात शाळा, महाविद्यालये, आधुनिक हॉस्पिटल इत्यादी सुविधामुळे, ह्या भावनेला आणखी चालना मिळाली.

इथे एका गोष्टीचा उल्लेख करावयास हवा. हा शहरी समाज कितीही पुढारलेला होऊ लागला, पाश्चिमात्यांचे अनुकरण करू लागला असला तरी, घरात त्याचा प्रवेश झाला नाही. कुटुंबात, जाती-मत-कुलाचार, संप्रदाय, याथाप्रकार चालूच राहिले. यामुळे, शहरी जीवनात एक प्रकारचे द्वंद आणि दांभिकता निर्माण झाली(ह्या विषयावर विचारवंत आशिष नंदी यांनी लेखन केले आहे).

नाट्य आणि संस्कृती

पाश्चिमात्यांचे अनुकरण हा शहरी समाजाच्या जीवनाच्या शैलीचा भाग झाला, हे जरी खरे असले तरी, सांस्कृतिक अनुकरण सार्वजनिक क्षेत्रात सोपे असते. घरातील व्यवहार त्याने दुषित होत नाहीत. ह्या नवीन मध्यमवर्गाने, हा सांस्कृतिक बदल, कोठे आणला असेल तर तो रंगभूमी वर.

असे दिसून येते की, येथील मनोरंजनाचे स्वरूपच ब्रिटिशांच्या रंगभूमीच्या दोन आयामांमुळे बदलून गेले. पहिला बदल झाला तो शहरी/नागरी रंगभूमीवर असलेला procemium arch. सांप्रदायिक भारतीय रंगभूमीवर, प्रेक्षक आणि रंगभूमी ह्या दोघात कायम देवाणघेवाण, संवाद असे. तो यामुळे तुटला. नवीन प्रकाश्योजानेद्वारे, आता रंगभूमीवरील नटांवर/कलाकारांवर तो केंद्रित झाला, आणि प्रेक्षागृहात अंधार ठेवण्याची प्रथा सुरु झाली. रंगभूमीवरचे नाट्य आत्ता जणूकाही लांबवर एका कक्षात घडत असलेले स्वप्नवत भासू लागले(अपवाद अर्थात, गाण्याला अथवा सांगितला मिळणारा वन्समोअर, किंवा हास्य-विनोदाला मिळणारी प्रेक्षकांची प्रतिक्रिया)

दुसरा महत्वाचा बदल घडून आला, तो नाटकासाठी असलेली तिकीट-विक्रीच्या व्यवस्थेमुळे. नाटकामुळे मनोरंजन करून घ्यायचे असेल तर, त्यासाठी उचित दाम मोजला पाहिजे अशी वृत्ती वाढू लागली. या आधी, राजे-राजवाडे, समाजातील धनिक व्यक्ती, देवस्थान वगैरे ही मंडळी, नाटकाच्या प्रयोगाचा खर्च उचलत असत, ज्या मुळे प्रेक्षकांना काही दाम द्यावा लागत नसे.

ब्रिटिश रंगभूमी आणि त्यांची इंग्लिश शिक्षण पद्धती या दोन उपक्रमामध्ये एक सिद्धांत अंतर्भूत होता. तो म्हणजे, शेक्सपियरच्या नाटकात ब्रिटीश समाजाचे यथार्थ चित्रण आले आहे, यावर असलेला दृढ विश्वास, हा होय आणि त्याच्या नाटकात चितारलेला ब्रिटीश समाज हा जगातील इतर समाजापेक्षा श्रेष्ठ आहे, असा मुद्दा उपस्थित केला जाई. भारतातील बुद्धीजीवी समाजात, ह्या एका नाटकाने टाकलेला प्रभाव हा अभूतपूर्व असा होता. ब्रिटिशांचे अनुकरण करणे आणि आपण त्यांच्या पेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही, मागे नाही, ही त्या बुद्धीजीवी समाजाची त्या वेळी गरज बनली होती.

आपल्याकडे तत्व-ज्ञान, पुराण, महाकाव्य, ही सर्व असल्यामुळे, ब्रिटिशांची बरोबरी स्थापन करण्यास मदत झाली. ब्रिटीशांनी अकस्मातपणे नाटकाकडे मोर्चा वळवला. शेक्सपियरच्या तोडीस तोड भारतीय नाटककार उभा करणे आवश्यक झाले. सर विलियम जोन्स याने शाकुन्तालाचे भाषांतर केले होते आणि त्यांची प्रशंसा केली होती. जर्मन महाकवी गटे याने तर शाकुंतल नाटकाला डोक्यावर घेतले होते. भारतात कालिदासाला जरी श्रेष्ठ नाटककार म्हणून मान्यता मिळाले असले तरी, तो राष्ट्रीय अस्मितेचा भाग तो पर्यंत तरी बनला नव्हता. आता त्याला शेक्सपियर ऑफ इंडिया असे नामाभिधान त्याला बहाल करण्यात आले.

शेक्सपियरच्या उदाहरणावरून त्यावेळचे भारतीय बुद्धिजीवी समाज किती ढवळून निघाला हे जर पाहायचे असेल तर १९व्या शतकात आलेल्या भाषांतरांची संख्या पहिली तर लक्षात येईल. शेक्सपियरच्या नाटकाची नव्हे, तर कालीदासाच्या नाटकांची! १९व्या शतकात उत्तरार्धातील केवळ २० वर्षात, ‘शाकुंतल’ ची चार मराठी भाषांतरे, तर २ कन्नड भाषांतरे आली होती.

अण्णासाहेब किर्लोस्कर(ज. १८४३) हे मराठी व्यावसायिक रंगभूमीचे जनक. त्यांनी रंगभूमी वर आणलेले पहिले नाटक हे ‘शाकुंतल’ हेच होते. त्यांनी अश्या संस्कृत कृती वर आधारित नाटके आणून नाटक कंपन्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली, हे खरे आहे. पण त्यांनी असेही म्हटले आहे की मला ‘इंग्लिश’ पद्धतीची रसनिर्मिती करायची आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

ब्रिटीश सरकार सारख्या विदेशी राज्यकर्त्यांचा विरोध करायला हवा असे मानणाऱ्या राजकीय विचारवंतामध्ये ही शेक्सपियर मुळे कशी संदिग्धता निर्माण झाली होती, त्याचे मराठी नाटककार कृष्णाजी खाडिलकर हे उत्तम उदाहरण आहेत. त्यांचे एक नाटक ‘कीचकवध यांच्या नाटकात, सैरंध्री आपल्या आप्तजनांना गमावते, त्या वेलची तिची दर्शवलेली विपन्नावस्था ही सरळ सरळ त्या काळातील भारतमातेच्या अवस्थेशी मिळते जुळते असे आहे. त्या नाटकात सैरंध्रीचा पाणउतारा करणारा, तिच्या वर हात टाकणारा कीचक, हा त्यावेळी भारताचा प्रमुख लॉर्ड कर्झन आहे हे ही स्पष्ट होते.ब्रिटीशांनी ह्या नाटकावर, राजकीय हिंसेला खतपाणी मिळेल ह्या विचाराने, बंदी आणली. त्याच खाडीलकारांचे दुसरे नाटक ‘सवाई माधवरावांचा मृत्यू’ ह्यात नायकाचे पात्र ह्याम्लेटवर तसेच खलनायकाचे पात्र हे इयागोवर आधारित होते.

खाडीलकरांचे समकालीन नाटककार राम गणेश गडकरी ह्यांनी तर ‘शेक्सपियरच्या पुढ्यात मी अपूर्ण आहे. त्याची ३६ नाटके आणि माझी फक्त १८च नाटके आहेत’ असे जाहीर केले. किर्लोस्कर, खाडीलकर, गडकरी, ह्यासारख्या उच्चवर्णीय व्यक्तींनी, मराठी समजात चाललेल्या ब्रिटीश विरोधी चळवळीबद्दल असणाऱ्या भावनांना वाट करून दिली, तसेच खतपाणी देखील घातले.

१९व्या शतकाच्या मध्यात ब्राम्हण तसेच इतर उच्चवर्णीय समाजात नाटकाच्या प्रती तिरस्काराची भावना होती. देवळातील उत्सवाशी निगडीत अथवा धार्मिक उद्देशाने केल्या जाणाऱ्या अशा उपक्रमाव्यतिरिक्त नाटक निषिद्ध होते. तसे केल्यास जातीभ्रष्ट होण्याची भीती त्यात असे. धार्मिक कारणाव्यतिरिक्त, मनोरंजासाठी म्हणून कथा सांगणे, नृत्य, संगीत तसेच जादूचे खेळ हे सर्व इतर जातीच्या समाजात प्रचलित होते. (इथे एखादे उदाहरण पुरेसे आहे. रायचूरचे अपराळ तम्मण्णा १९०० मध्ये ‘श्री कृष्णपारिजात’ नाटक लिहून रंगभूमीवर आणले. ते लोकप्रिय झाले. तसे असले तरी त्यावेळच्या माध्व ब्राम्हण समजाचा रोष ओढवून घेतला. नाटकावर बहिष्कार टाकण्यात आला. तेव्हा तम्मण्णा यांच्या बंधूनी ते नाटक मठाधिपतींच्या समोर सादर करून आणि त्यांना हे नाटक धर्मप्रसाराचे काम करते आहे असे पटवून दिले, आणि बहिष्कार काढून टाकण्याची विनंती केली. आणि याउपर धर्मकार्य केल्यावाद्दल तम्मण्णाला शाबासकी देण्यात आली.)

हिंदू-मुस्लीम समाजामध्ये त्यावेळी नाटककलेच्या प्रती असलेला पूर्वग्रह एका बाजूला, तर ब्रिटीश समाजात नाटकाचे स्थान अत्यंत महत्वाचे होते. ब्रिटीश भारतात पाय ठेवल्यापासून, त्यांनी ब्रिटन मधून नाटक कंपन्या भारतात येत राहिल्या. त्यांच्या विलासी नाटक प्रयोगांना भरपूर उत्तेजन मिळे. त्यातील स्त्री भूमिका ‘मेमसाहेब’ करत असत. ह्यावरून नाटककलेला असलेली प्रतिष्ठा दिसून येते.

मुंबईतला पारसी समाज ब्रिटिशांचे अनुकरण करण्यात पुढे होता. त्यांनी १८५० मध्ये मुंबईमध्ये पारसी नाटक मंडळ स्थापन केली. १८५३ मध्ये लखनौचे नवाब वाजीद अली शाह हे एका फ्रेंच सांगितीकेवरून प्रभवित होवून ‘इंदर सभा’ हे संगीत नाटक लिहून घेतले. ते त्याचे प्रयोग करीत आणि स्वतः त्यात नृत्य करीत असत. त्यावेळेस देशभर त्याचे शंभराहून अधिक प्रयोग झाले.

१८८० च्या सुमारास महाराष्ट्रात ब्राम्हण आणि इतर उच्चवर्गीय समाजातील लोक, तसेच बंगाल मधील ब्रिटीशांनी पोसलेले जमीनदार यांनी नाटकाचे आधीचे संकेत मोडून स्वतःची अशी व्यावसायिक नाटके रंगभूमीवर आणली. किर्लोस्कर आदी मंडळीना मिळालेल्या यशामुळे नाटक कंपन्यांची एक समृद्ध अशी परंपराच सुरु झाली, जी पुढील ७५ वर्षे टिकून राहिली. procemium arch, सुमधुर नाट्यसंगीत, आणि ह्या नाटक कंपन्यांची असलेली एक विशिष्ट अशी आर्थिक व्यवहार पद्धती ह्या सर्व गोष्टी ह्या नवीन रंगभूमीची वैशिष्ट्ये होती. पौराणिक-ऐतिहासिक नाटके सुद्धा ब्राह्मण्य शैलीमध्ये सादर केली जायची, ज्याचे उदात्तीकरण होण्यास हे नाटकासारखे नवीन माध्यम पूरकच ठरले. त्याच वेळेला लोकसंगीतातून स्फूर्ती घेवून सादर केले जाणारे लोकनाट्य तसेच ग्रामीण नाट्य प्रकार हे कनिष्ठ दर्जाचे आहेत असा समज दृढ होत गेला. शतकानुशतके आपली लोकनाट्य परंपरा जीवित ठेवणाऱ्या ह्या कलाकारांना नुकत्याच उदयास आलेल्या व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश मिळाला नाही.(ह्या बाबतीत पारसी रंगभूमीने त्यांचे स्वागत करून अधिक उदारपणा दाखवला)

आमच्या संस्कृतीच्या व्याख्येमध्ये एक नवीन, मुलभूत बदल होवू घातला होता; जो देशातील वेगवेगळया भागात, वेगवेगळ्या कलाप्रकारात; वेगवेगळया रीतीने, जरी दिसायला सुरुवात झाली असली तरी, त्याचे मूळ स्वरूप आणि परिणाम एकच होता असे दिसते. उच्चवर्गातील समाजाने आतापर्यंत ज्या परंपरागत व्यवसायांना आपल्या पासून दूर ठेवले होते, त्याच गोष्टी आता ‘संस्कृती’, ‘कला’, ‘दोन हजार वर्षांची परंपरा” ह्यासारखी लेबलं लावून स्वीकारार्ह होत गेल्या.

आमच्याकडे अनादी काळापासून काही कलाप्रकार कनिष्ठ वर्गातील समाजाने आपल्या व्यवसायाचा भाग म्हणून जपून ठेवले, त्याचे संवर्धन केले. ह्या समाजाला, वर्गाला, शहरातील नाट्य चळवळीबाहेर जाणून बुजून ठेवण्यात आले. ह्या नवीन नाटक कंपन्या शहरी संस्कृतीच्या गौरवाचा, अभिमानाचा विषय ठरू लागला. नाट्यकलेने स्वतःची जात बदलली असे म्हणावे लागेल.

(क्रमशः)