छेल्लो शो उर्फ The Last Film Show

ऑस्कर पारितोषिकाच्या साठी असलेल्या स्पर्धेत भारतातर्फे एक गुजराथी चित्रपटाची वर्णी लागली आहे. त्याच्या बद्दल वाचल्यावर चित्रपटाबद्दल जबर उत्सुकता निर्माण झाली. कारण मी काही दिवसांपूर्वी पाहिलेला एक जुना इटालियन चित्रपट, ज्याचे नाव सिनेमा पॅराडिसो. त्याचा विषय आणि ह्या चित्रपटाचा विषय मला साधारण सारखाच वाटला. आणि विषय होता तो लहान मुलामध्ये असलेले चित्रपटांविषयीचे वेड , ध्यास. असेही वाचले कि छेल्लो शो चित्रपट हा Pan Nalin या त्याच्या दिग्दर्शकाची स्वतःची कहाणीच आहे. मी परवाच तो पाहून आलो, आणि म्हटले त्याबद्दल थोडेसे ब्लॉगवर व्यक्त होऊयात, त्यामुळे हा प्रपंच. खरे तर अजून एक भारतीय चित्रपट ऑस्कर स्पर्धे मध्ये गेला आहे, त्याचे नाव आहे RRR, पण तो अधिकृत नामांकन नाही असे वाचण्यात आले. असो.

मी खूप वर्षांपूर्वी Adlabs नावाच्या एका आगळ्या वेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एका उद्योगात थोडेसे पैसे गुंतवले होते. भारतात नव्याने तयार होणार्या चित्रपटांच्या फिल्म्सवर प्रक्रिया (post production process चा एक भाग). ज्या प्रमाणात भारतात चित्रपट बनतात ते पाहता त्यांच्या कडे भरपूर काम असे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कि आजकाल चित्रपट ह्या फिल्मवर नसतो तर डिजिटल स्वरूपात संगणकात असतो. त्यामुळे फिल्म प्रोजेक्टर जाऊन डिजिटल प्रोजेक्टर, उपग्रहाद्वारे अनेक चित्रपटगृहात दाखवण्याची आता सोय आली आहे. काळाच्या ओघात Adlabs (जिला अनिल अंबानी यांच्या समूहाने विकत घेतली होती) ती बुडाली. माझे पैसे देखील बुडाले!

हे सर्व सांगण्याचे कारण असे कि, छेल्लो शो चित्रपटात फिल्म्स रील्सचा जमाना मागे पडण्याचा जो वेध घेतला आहे तो अतिशय हृद्य, यातनादायकआहे. असे म्हणतात कि change is the only constant याची प्रचीती येते. हे सर्व चित्रपटाच्या दुसऱ्या भागात येते.

पहिल्या भाग, जो मला अधिक आवडला, त्यात गुजरातेतील काठीयावाड भागातील एका कोह्डकर, आणि उद्योगी अश्या लहान शाळकरी मुलाचे चित्रपटांचे वेंड दाखवले आहे. हा भाग आणि वर उल्लेख केलील्या सिनेमा पॅराडिसो या मध्ये साम्य आहे. रेल्वे स्थानकावरील एका चहावाल्याचा हा मुलगा. हे रेल्वे स्थानक कसे तर , चलाला नावाच्या कुठल्यातरी आडगावातील. आजूबाजूला शेती, खुले माळरान, सिंहासाठी प्रसिद्ध असलेले गीरचे जंगल जवळच. गाडी आली कि हा मुलगा प्रवाश्यांसाठी चहा विकायला जाणार. बाकीचा वेळ शाळा, आणि इतर मुलांबरोबर हुंदडणे. एके दिवशी आपल्या कुटुंबासोबत गावात लागलेल्या एक धार्मिक चित्रपट पाहायला जातो. आणि त्याची सहज बालबुद्धी चित्रपटांकडे आकर्षित होते. तो हळू हळू शाळा चुकवून चित्रपट पाहण्याची चटक लागते. कधी चोरून चित्रपटगृहा जाणे, तर कधी पैसे चोरून तिकीट काढणे असे उद्योग सुरु होतात. एके दिवशी त्याची चोरी पकडली जाते आणि चित्रपटगृहातून बाहेर काढला जातो. त्यावेळेस त्याला film projectionist भेटतो, आणि त्याच्याशी त्याची गट्टी जमते. आणि तो projection room मधून चित्रपट पाहायला लागतो. हळू हळू त्या हलत्या चित्रांची दुनिया त्याला उमगू लागते, त्याला फिल्म्स हाताळायला मिळतात.

तो आणि त्याचे मित्र मिळून काहीतरी जुगाड करून घराच्या घरी हलती चित्रे दाख्वाण्यासाठीची सोय करतात. हे पाहताना मला माझ्या लहानपणीची गोष्ट आठवली. आम्ही देखील. खास करून उन्हाळ्यातील सुट्ट्यात, बाजारात मिळणारी शोले सारख्या चित्रपटांची फिल्म्स आणून ते एका अंधाऱ्या खोलीत दुपारी, पांढऱ्या साडीवर अथवा धोतरावर पाहत असू, दुसऱ्यांना दाखवत असू.

आणि, चित्रपटात असे सर्व कारनामे होत असताना, एके दिवशी अचानक बदल घडतो. चित्रपट आता फिल्म्सच्या रील्स वर दाखवता संगणकाच्या सहाय्याने दाखवला जाणार असतो. त्यामुळे चित्रपटगृहाच्या film projectionist ची नोकरी जाते, फिल्म्सच्या रील्स, प्रोजेक्टर इत्यादी सर्व समान भंगारच्या भावात विकले जाते. त्या फिल्म्सचे रुपांतर पुढे मग रंगीबेरंगी बांगड्यामध्ये होते. काही दिवसांनी तो मुलगा घरातून बडोद्याला चित्रपट क्षेत्रात काहीतरी करायला आपल्या कुटुंबाला सोडून जातो. हा शेवट थोडासा रोमान्तिक आहे, मनाला पटत नाही. एवढासा तो मुलगा, त्याला चित्रपट क्षेत्रात काय करायचे आहे ह्याची कल्पना कशी असणार, त्याचे आई वडील त्याला जाऊन कसे देतात, हे सर्व तितकेसे पटणारे नाही.

असे असले तरी हा चित्रपट नक्कीच पाहावा असा आहे, प्रामुख्याने ज्यांनी फिल्म रील्सवर असणारे एक पडदा चित्रपटगृहात असे चित्रपट पहिले असतील तर ,त्यांना नक्कीच त्या दुनियेत परत घेऊन जाणारे आहे.

दोन हटके चित्रपट

काही दिवसांपूर्वी विलास सारंग यांची एक जुनी कादंबरी वाचत होतो. नाव होते ‘एन्कीच्या राज्यात’ आणि ती प्राचीन इराकच्या प्रदेशात १९७० च्या दशकात घडणारी कथा होती. त्यात कथानकाच्या ओघात नाईन आवर्स टू रामा या शीर्षक असलेल्या एका चित्रपटाचा संदर्भ आला होता. आणि तो होता गांधी हत्येच्या संदर्भातील. तो चित्रपट मी युट्युब वर नुकताच पाहिला. योगायोगाने महात्मा गांधी यांची जयंती नुकतीच होऊन गेली. ह्या चित्रपटाबद्दल पूर्वी मी ऐकले किंवा वाचले देखील नव्हते. आणि त्याच्या निमित्ताने त्याबद्दल लिहिण्याचा योग येत आहे.
दुसरा चित्रपट ज्या बद्दल लिहिणार आहे तो आहे सिनेमा पॅराडिसो. तो हि मी नुकताच पाहिला. नुकतेच फ्रेंच न्यू वेव्ह सिनेमाचा प्रणेता गोदार्द यांचे निधन झाले. हा लेख त्यांना श्रद्धांजलीपर मानता येईल.

नाईन आवर्स टू रामा
महात्मा गांधी हे अनेक चित्रपटांचा विषय झाले आहेत. महात्मा गांधी यांची जयंती नुकतीच पार पडलीआणि त्याच्या निमित्ताने इंटरनेट वर त्या चित्रपटांची यादी फिरत आहे. त्यात ह्या चित्रपटाचा देखील समावेश आहे. हा १९६३ चा चित्रपट. त्यावर भारत सरकारने बंदी आणली होती. कारण यात महात्मा गांधी यांच्या पेक्षा नथुराम गोडसेच्या आयुष्यावर बेतलेला आहे. आणि तो थोडेसे सत्य आणि बरेच काही कल्पनानिक अश्या घटनांनी रेखाटण्यात आला आहे. हि एक अमेरिकन हॉलीवूड चित्रपटआहे, आणि त्यातही मुख्यतः भरणा आहे तो अभारतीय कलाकारांचा.

हा चित्रपट नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची हत्या करण्याआधी नऊ तास त्याच्या काय आयुष्यात घडले ह्यावर एक काल्पनिक कथानक मांडले आहे. Stanley Wolpert या लेखकाच्या त्याच नावाच्या एका कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. अर्थात, नथूरामच्या मनात काय सुरु आहे, त्याच्या पूर्वायुष्यातील घटना (बहुतेक सगळ्या काल्पनिक, ज्यात प्रेम प्रकरण वगैरे गोष्टी देखील आहेत) यांचे चित्रण या सर्वांनी चित्रपट व्यापला आहे. इंग्रजी संवाद, अभारतीय कलाकार, एकूणच कल्पनेवर आधारित कथानक या सर्वांमुळे चित्रपट वेगळा ठरतो. या लेखकाने पुढे २००१ मध्ये गांधींचे चरित्र देखील लिहिले पण ते देखील समीक्षकांच्या पसंतीस उतरले नाही. इंटरनेट ह्या वादग्रस्त चित्रपटाबद्दल शोधले असता असे दिसते कि एकूणच गांधी हत्या ह्या सारख्या संवेदनशील विषयावर ज्या सवंगपणे हा चित्रपट चित्रीकरण करतो त्यावर बराच वादंग त्या काळी मजला होता. त्यातील मला तरी एकच भारतीय अभिनेता ओळखू आला, तो म्हणजे डेव्हिड, ते हि एका पोलीस हवालदाराच्या छोट्याश्या भूमिकेत. महात्मा गांधींच्या छोट्याश्या भूमिकेत कोणी कश्यप नावाचे अभिनेता आहेत. चित्रपटात गांधींची भूमिका करणारे बहुतेक ते पहिलेच अभिनेते असावेत. १९८२ मध्ये आलेल्या चित्रपटात Ben Kingsley याची गांधीची भूमिका गाजली होती.

सिनेमा पॅराडिसो
हा चित्रपट म्हणजे चित्रपटगृहांवरील नितांतसुंदर चित्रपट आहे. आपल्या इथे एक पडदा चित्रपटगृह पाडून नवीन मल्टीप्लेक्स चित्रपटगृह उभारायला सुरुवाट होऊन आता कित्येक वर्षे झाली आणि नवीन मल्टीप्लेक्स संस्कृती देखील बऱ्या पैकी रुळली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा चित्रपटाचा आस्वाद घेणे मनोरंजक ठरते. हा अडीच पावणेतीन तासांचा इटालियन चित्रपट इंग्रजी सब टायटल्स सह युट्युब वर उपलब्ध आहे.(युट्यूबने age restriction हे कारण देऊन लिंक preview mode द्यायला परवानगी नाकारली)
१९५० च्या आसपास इटली मध्ये घडणारी हि कथा आहे. इटलीतील एका छोट्याश्या गावात एकमेव असे एक चित्रपटगृह असते. त्या चित्रपटगृहासमोर एका मोठा चौक दाखवला आहे. चित्रपटगृहाचा मालक आणि फिल्म प्रोजेक्टर वर चित्रपट दाखवणारा अल्फ्रेडो नावाचा मध्यवयीन माणूस आहे. गावात राहणारा एक सात आठ वर्षांचा साल्वातोर उर्फ टोटो नावाचा छोटा मुलगा देखील प्रमुख पात्रात आहे. या दोघांच्या मधील भावपूर्ण संबंधावर coming of age प्रकारच्या कथनशैलीतील हा चित्रपट आहे. आजच्या डिजिटल चित्रपट प्रोजेक्शन तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट असलेलेले फिल्म प्रोजेक्शन जे जग कसे होते ह्याचा देखील प्रत्यय येतो.

टोटोची चित्रपटगृहात जा ये असते, प्रोजेक्टर रूम मध्ये देखील तो जात येत असतो. अल्र्फ्रेडोचे काम न्याहाळत असतो. त्या दोघांची गट्टी जमते. त्याला प्रोजेक्टर कसा चालवायचा हे देखील अल्फ्रेडो त्या मुलाला शिकवतो. एक रात्री चित्रपट सुरु असताना एक दुर्घटना घडते. काही कारणाने चित्रपटांच्या फिल्मच्या रिळांना आग लागते. चित्रपटाच्या फिल्म्स ह्या अतिशय ज्वलनशील असतात. त्या दुर्घटनेत अल्फ्रेडो भाजून निघतो, चित्रपटगृहाचे देखील आगीत नुकसान होते. टोटो त्याला वाचवण्याचा प्रयत्न करो पण अल्फ्रेडोची दृष्टी जाते, तो अंध होतो, पण त्याचा जीव वाचतो. आणि चित्रपटाला एक कलाटणी मिळते. टोटो आणि अल्फ्रेडो एकमेकांचे जिवलग बनून जातात.

कालांतराने टोटो तरुण होतो, चित्रपटगृह परत सुरु झाले आहे, पण ते आता अंध अल्फ्रेडोकडे नाही. टोटो आता त्याचे काम करत आहे, चित्रपट फिल्म प्रोजेक्टर चालवत आहे. नवीन मालक जवळच्या गावात अजून एक चित्रपटगृह सुरु करतो. टोटो कडे चित्रपट रिळे एका ठिकाणाहून दुसरी कडे सायकल वर नेण्याचे पोचवण्याचे देखील काम येते. एकूणच या चित्रपटाशी संबंधित कामात त्याला रस आहे गती आहे. एका छोटा व्हिडियो कामेरा घेऊन छोट्या छोट्या घटना चित्रित करू लागतो. अल्फ्रेडोच्या लक्षात आलेले असते कि टोटोला ह्या कलेविषयी आत्मीयता आहे, तो त्या विषयी संवेदनशील आहे.

या चित्रपटात एक प्रेमप्रकरण देखील आहे. तरुण टोटोचे एलिना नावाच्या गावत नवीनच आलेल्या एका मुलीवर मन बसते. तिला देखील तो आवडू लागलेला असतो. एकमेकांची आयुष्यभर साथ करण्याचा निर्णय घेतात, पण एलीनाच्या घराचा विरोध असतो. दरम्यान टोटोला सक्तीची सैन्यात रवानगी होते. वर्ष दोन वर्षांनी परत आल्यावर इलिन दुसरीकडे गेली असते. अल्फ्रेडो त्याला रोमला जाऊन चित्रपटक्षेत्रात काम करण्याचा सल्ला देतो. टोटो तो मानतो देखील.

आता चित्रपट तीस वर्षे पुढे सरकला आहे. टोटोने चित्रपटक्षेत्रात बरेच नाव कमावले आहे. त्याला एके दिवशी आईकडून समजते कि अल्फ्रेडोचे निधन झाले आहे. त्या निमित्ताने तो कित्येक वर्षांनी गावत येतो. गावातले जुने झालेले चित्रपटगृह पाहतो. आता ते पाडण्यात येणार असते. तसेच त्याला वयस्कर झालेली एलिना भेटते आणि ते गतकाळाचा लेखाजोखा घेतात आणि चित्रपट तेथे विराम घेतो.

ह्या चित्रपटात एका दृष्टीने चित्रपटगृह हे देखील एक पात्र आहे असे म्हणावे लागेल किंबहुना हा चित्रपट त्याचीसुद्धा कथा सांगतो. एक तर दुसऱ्या महायुद्धानंतरचा काळ, युरोपसह इटली देखील होरपळून गेला आहे. एकूणच मंदी, हलाखाची परिस्थितीमुळे लोकं रंजले गांजले होते. गावातील असलेल्या एकमेव असे चित्रपटगृह हे त्यांचे विरुंगळ्याचे ठिकाण. अनेक प्रकारचे लोकं, त्यांचे स्वभाव, त्यांच्यामधील छोटी मोठी पेल्यातील वादळे, भांडणे. जसे काही गावात एखादा पार असतो तेथे कश्या बारा भानगडी होत असतात तसे हे त्या गावातले त्या काळचे चित्रपटगृह हे ठिकाण. चित्रपट पाहता पाहता तेथील प्रेक्षक करणारे अनेक उद्योग हे सगळे पाहताना मजा वाटते.

इटलीतील सिसिली भागातील Palazzo भगात सिनेमा पॅराडिसो वसलेले होते, ते आता नाही पण तो चौक तेथे असावा. पुढे कधीतरी इटलीच्या प्रवासाचा योग आला तर, तो पाहायचा अशी मनीषा आहे! चित्रपटक्षेत्राशी निगडीत अने चित्रपट आहेत, पण सिनेमा थियेटर या विषया भोवती हा बहुतेक एखादाच चित्रपट असावा.

‘फियरलेस’ नादिया, भाग#३

साधारण पाच वर्षांपूर्वी विशाल भारद्वाज दिग्दर्शित, आणि आजची वादप्रिय अभिनेत्री कंगना राणावत हिची प्रमुख भूमिका असलेला रंगून नावाचा चित्रपट आला होता. तो नादिया नावाच्या एका जुन्या काळातील अभिनेत्रीच्या आयुष्यावर आधारित होता. ती मी पाहिला होता, आणि आवडला होता मला. त्याच नादियावर १९७६ मध्ये गिरीश कार्नाड एक लेख लिहून गेले आहेत. त्यांच्या आगोम्मे ईगोम्मे (२००८, प्रकाशक मनोहर ग्रंथमाला, धारवाड) या कन्नड पुस्तकात तो आहे. त्याच वेळेला मला तो लेख भाषांतरित करून ब्लॉग वर टाकायचा होता. पण जमले नाही. आज तो योग येत आहे. हा लेख काही भागात ब्लॉगवर आपल्या साठी देत आहे. पहिला आणि दुसरा भाग येथे आणि येथे आहे. आज तिसरा आणि शेवटचा भाग देत आहे. युट्यूब वर नादियाचे काही चित्रपट आहेत. वेळ काढून कधीतरी पहिले पाहिजेत आणि तो काळ थोडासा तरी अनुभवता येईल असे वाटते.

फियरलेस’ नादिया, भाग#३

‘एका चालत्या रेल्वेवर खलनायकाला मी उचलून धरते असे एक दृश्य एका चित्रपटात होते. रेल्वेच्या वर जाण्यासाठी एक अरुंद अशी फळी होती. दोन्ही बाजूला उतार होता. चार चार कॅमेरे लावले होते. होमीने कॅमेराकडे चेहरा फिरवण्यास सांगितले. इकडे मी ह्या माणसाला खांद्यावर घेऊन उभी होते, आणि तो ‘मुझे तुम छोडो!’ असा संवाद बोलत होता. तुम्हीच कल्पना करा. मी त्या चालत्या रेल्वेवर उभी राहिले आहे, तो माझ्या खांद्यावर आहे, त्याला मी रागावून तोंड बंद करायला सांगणारा संवाद म्हणायचं आहे, आणि कॅमेराकडे चेहरा देखील करायचा आहे. आणि हे सगळे मी माझा तोल सांभाळून करायचे आहे.’

मी होमी वाडिया यांना विचारले, ‘एखाद्या अवघड दृश्याची कहाणी सांगा’. होमी यांनी Diamond Queen मधील एका दृश्याची आठवण सांगू लागले. विल्सन धरणाच्याजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्यात नादिया बुडाली नाही, वाहून गेली नाही हे नशीब.

पण नादिया यांनी सांगितलेली आठवण वेगळीच होती.

‘Jungle Princess नावाच्या चित्रपटात असलेले सिंहाबरोबर एक दृश्य होते. होमी वाडिया यांनी मला ते समजावून सांगितल्यावर मी नकार दिला. बहुयात काय होते असे म्हणत सर्कशीतील सिंहाच्या पिंजऱ्यात त्याने पाय ठेवला. तेवढ्यात सर्कशीत काम करणाऱ्या एका मुलीने सिंहासाठी दुधाचे पातेले आणून ठेवले. मी कसाबसा होकार दिला. ‘

‘चित्रीकरणाच्या दिवशी सर्कशीतील पिंजरा आणला गेला. त्याच्या आजूबाजूला झाडेझुडुपे, फांद्या वगैरे लावली गेली आणि जंगलाचा आभास निर्माण करण्यात आला. सिंहांना एकट्या दुकट्याने काम करण्याएवजी एकमेकांबरोबर काम करायला आवडले, ते सोपे देखील जाते असा अनुभव असल्याने चार चार सिंह पिंजऱ्यात आणले होते. ‘

‘चित्रीकरण सुरु झाले. त्याच वेळेस त्या चार सिंहामधील एक सुंदरी नावाची सिंहीण होती तिने मोठी डरकाळी फोडून उडी मारली. माझे डोके, होमीचे डोके, तसेच छायाचित्रकाराचे डोके ओलांडून तिने पिंजऱ्याच्या सळ्यांवर धडाका मारायला सुरुवात केली. बाकीचे तीन सिंह त्यामुळे उत्तेजित झाले आणि त्यांनी देखील आपल्या शेपट्या वळवळायला सुरुवात केली. त्या सिंहाचा प्रशिक्षक आम्हाला हलू नका, डोळ्यांच्या पापण्या देखील मिटू नका असे सांगू लागला. डोळ्यांच्या पापण्या काय मिटता त्या वेळेला, आमचा श्वास देखील थांबला होता. आम्हाला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात आले. मी माझ्या साऱ्या जीवनात एवढी भेदरलेली, घाबरलेली नव्हते.’

असे असले तरी नादियाच्या चित्रपट कारकीर्दीच्या सुरुवातीला वाटणारी समस्या हि ‘स्टंन्ट’ ची नव्हतीच!

‘मला भाषेची मोठी समस्या वाटत होती. सुरुवातीच्या एका चित्रपटात एक असे दृश्य होते कि, मला गुंडांनी पकडलेले असते. मुझे छोड दो असे मला ओरडायचे होते. पण मी तसे ओरडल्यावर तेथे असलेले सगळे जण जोरजोरात हसू लागले होते. शेवटी हिंदी शिकवायला मला एक मास्टर ठेवण्यात आला. छोड दो आणि चोत दो या दोन वाक्यातील फरक मला सांगण्यात आला!’

‘असे असले तरी सुद्धा ह्या हिंदी भाषेच्या समस्येच्या आव्हानाने मला प्रेरित केले होते. पहाडी कन्या या चित्रपटात तर मला पुरते एक पान संवाद होते. मी एक महिना ते पाठ करत होते.’

‘वसंत प्रोडक्शनचा पहिला चित्रपट मौज(१९४२) यात माझ्या तोंडी मी रडत रडत म्हणण्याचे काही संवाद होते. मी दिवस रात्र ते पाठ करून समाधानकारकपणे शॉटच्या वेळेस म्हटले. चित्रपट पूर्ण झाल्यावर वितरकांना जेव्हा दाखवला गेला तेव्हा त्यांनी माझे ते संवाद असलले दृश्य काढून टाकावे असे सुचवले. त्याप्रमाणे ते दृश्य काढले गेले. मी अशी रडकी स्त्री नाही असे त्यावेळी ते म्हणत होते.’

नादिया-जॉन कावस (John Cawas)यांचे चित्रपट पाहिल्यावर कॅथार्सिसचा (भावनांचे विरेचन) अनुभव येत नसे. चित्रपट पाहून झाल्यावर त्याचे स्वतःचे एक असे स्थान असे. दुपारचा matinee चा खेळ पाहिल्यानंतर आम्हा शाळकरी मित्रांची टोळी ढिश्युम ढश्याम करत हवेत हातवारे करत फिरत असू. ह्याच कारणामुळे असे चित्रपट पाहून आल्यानंतर घरी घेत नसत. कारण आम्ही घरी सुद्धा तसेच करत फिरत असू. घरातील मेज, खुर्ची इत्यादी वर प्रहार करत, आवाज करत चित्रपटातील दृश्यांचे अनुकरण करत असू. पण आम्ही हे असे अनुकरण बाहेर, शेतात, झाडांवर विशेष करत नसू, ते सुरक्षित नसे.’

”स्टंन्ट’ चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे १९३५-४०. त्या नंतर ती क्रेझ गेली. १९४१-४३ हि वर्षे तर आणखीन वाईट गेली.’

ह्या ‘स्टंन्ट’ युगातील शेवटचा चित्रपट वाडिया मूव्हीटोन यांनी निर्मित केलेला चित्रपट ‘राज नर्तकी’ (The Court Dancer)हा होय. त्यात साधना बोस हि नायिका होती. अत्यंत महत्वाकांक्षी असलेला हा चित्रपट जी. बी. एच यांनी चार भाषेत दिग्दर्शित केला होता. चित्रपटाचा खर्च वाढत गेला, बजेटच्या बाहेर गेला. पण बॉक्स ऑफिस वर हा साफ आपटला. तेथेच जी. बी. एच आणि होमी वाडिया वेगळे झाले.

दुसरे महायुद्ध सुरु झाले. महागाई गगनाला पोहोचली.

‘उदाहरणार्थ, वाडिया मूव्हीटोन बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आम्ही आमचे सेट्स, इतर सामग्री व्ही. शांताराम यांना दोन लाखात विकावी लागली. ध्वनी यंत्रणा दक्षिणेकडील एका निर्मात्याला साठ हजारात विकावी लागली. ‘

‘१९४३ मध्ये होमी वाडिया यांनी चेंबूर मध्ये बसंत स्टुडियो सुरु केले.

मी मेकअप मध्ये काम करू लागले, Waves, perms इत्यादी,’ नादिया बोलत होत्या. चित्रपटांचे स्टंन्ट’ युग संपल्यात जमा होते. मला उदारनिर्वाहासाठी दुसरा उपाय नव्हता. पाच महिने ते काम मी केले! एक दिवस होमी वाडिया धावत माझ्याकडे आले आणि म्हणाले आपण ‘हंटरवाली कि बेटी’ हा चित्रपट करणार आहोत.’

नादिया, तसेच जॉन कावस हे देखील चित्रपटात असणार होते. चित्रपट अत्यंत यशस्वी ठरला. पुढील दहा वर्षे नादियाने आणखीन दहा चित्रपटातून काम केले.

‘पण प्रेक्षकांची अभिरुची बदलत होती,’ होमी म्हणाले, ‘न्यू थियेटर, बॉम्बे थियेटर यांचे सामाजिक चित्रपट लोकप्रिय होऊ लागले होते. ‘

वाडिया मूव्हीटोनने फक्त स्टंन्ट चित्रपटांचीच निर्मिती केली असे नाही. बसंत स्टुडियो मध्ये होमीने रामभक्त हनुमान, माया बझार, वीर घटोत्कच श्रीगणेश महिमा या सारखे पौराणिक चित्रपट देखील केले. ते देखील यशस्वी ठरले. पण ते इतर चित्रपटासारखे लोकप्रिय झाले नाहीत. त्याचे वेळेस तेलगु पौराणिक चित्रपट सुद्धा समाज मान्य झाले नव्हते. आज देखील नादिया हे नाव तिच्या सामान्य स्टंन्ट चित्रपटांमुळेच तसेच फियरलेस नादिया देखील ओळखले जाते.

नादिया आणि होमी १९६० मध्ये विवाह बद्ध झाले.
कुलाब्यातील एका जुन्या इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेल्या घरात ते राहत असत. Basant Film Distributors हि मुंबईतील मोठ्या विताराकांपैकी एक आहे. तसेच बसंत स्टुडियो मध्ये आजही बरेच चित्रपट बनत असतात त्यात होमी वाडिया व्यस्त असतात, असे असून सुद्धा माझ्या साठी ते आत्मीयतेने मुलाखतीकरता बोलले.

नादिया आता स्थूलपणाकडे झुकल्या आहेत. हसत हसत बोलत होत्या. सुरुवातीला मुलाखतीसाठी मागे पुढे पाहणाऱ्या नादिया यांनी नंतर त्या आणि होमी दोघांनी गतकाळातील अनेक स्मृतींना उजाळा दिला, चित्रपट व्यवसायातील अनेकोनेक गोष्टी सांगत गेल्या.

दिवाणखाण्यातील भिंतींवर त्यांच्या अश्वशर्यतीतील घोड्यांची छायाचित्रे टांगलेली होती. अजून एक चित्र रेफ्रीजीरेटर वर होते. ते नादियाच्या पूर्वजांचे होते असे त्यांनी सांगितले खरे, पण त्यात नादिया, होमी दोघे शंभर वर्षांपूर्वी असलेल्या विक्टोरियन युगातील वेशभूषा असलेले छायाचित्र होते. सिडनी मध्ये नादिया यांचा मुलगा असतो. एके काळी तो भारतीय हॉकी मध्ये गोली होता. त्याचे देखील छायाचित्र होते.

‘मला अभिमान वाटावा असा कुठला चित्रपट आहे? तसे पहिले तर काही चांगले पौराणिक चित्रपट देखील मी केले’ होमी हसत म्हणत होते, ‘पण माझे अत्युत्तम चित्रपट हे मेरीने त्यात काम केलेले चित्रपट होत.’

‘मी त्या जीवनातील प्रत्येक क्षण enjoy केला आहे’, नादिया-मेरी बोलल्या , ‘मला जर हे जीवन परत जगता आले तर मी चित्रपटक्षेत्रातच काम करेन!’

मला जर माझे बालपण परत मिळाले तर, मी तिचे चित्रपट परत परत पाहिले असते!

[सौजन्य: Cinema Vision, ३/१९७६]

(समाप्त)

‘फियरलेस’ नादिया, भाग#२

साधारण पाच वर्षांपूर्वी विशाल भारद्वाज दिग्दर्शित, आणि आजची वादप्रिय अभिनेत्री कंगना राणावत हिची प्रमुख भूमिका असलेला रंगून नावाचा चित्रपट आला होता. तो नादिया नावाच्या एका जुन्या काळातील अभिनेत्रीच्या आयुष्यावर आधारित होता. ती मी पाहिला होता, आणि आवडला होता मला. त्याच नादियावर १९७६ मध्ये गिरीश कार्नाड एक लेख लिहून गेले आहेत. त्यांच्या आगोम्मे ईगोम्मे (२००८, प्रकाशक मनोहर ग्रंथमाला, धारवाड) या कन्नड पुस्तकात तो आहे. त्याच वेळेला मला तो लेख भाषांतरित करून ब्लॉग वर टाकायचा होता. पण जमले नाही. आज तो योग येत आहे. हा लेख काही भागात ब्लॉगवर आपल्या साठी देत आहे. पहिला भाग येथे आहे. आज दुसरा भाग देत आहे.

फियरलेस’ नादिया, भाग#२

सहा आठवड्यात एका पेक्षा जास्त चित्रपट पाहायचे नाहीत, अशी माझ्या वडिलांची ताकीद मला होती. फिल्म माध्यमाबद्दल माझ्या वडिलांना नावड होती. पण ‘नादिया/वाडिया’ अशी नावे ऐकली कि ते काही कुरबुर न करता मला आणि माझ्या भावाला साडे तीन आणे देऊन चित्रपट पाहायला सोडत असत. या साडेतीन आण्यातील अर्धा आणा हा चित्रपटाच्या मध्यंतरात शेंगदाणे खाण्यासाठी होता. एखादा चांगला मारामारीचा चित्रपट पाहताना शेंगदाणे खाणे हा चित्रपट पाहण्याच्या विधीमधला अविभाज्य घटक होता. मध्यंतरानंतर प्रेक्षक चित्रपटगृहात हे भाजलेले शेंगदाणे चित्रपट पाहत फोडून खात असत. सुमारे दहा मिनिटे चित्रपटातील संवाद, संगीत ह्या शेंगदाणे फोडून खाण्याच्या आवाजात मिसळून जात असे!

हंटरवा लीच्या अभूतपूर्व यशामुळे होमी वाडिया यांना दिग्दर्शक म्हणून चित्रपट सृष्टीत मान्यता मिळाली. (‘माझे वय फक्त २४ वर्षांचे होते. माझी उत्कृष्ट दिग्दर्शकांत गणना होण्यास सुरुवात झाली’). तेवढेच नाही तर, त्या चित्रपटाच्या यशामुळे चित्रपटांचा एक नवीन प्रकार रूढ झाला. तो म्हणजे ‘स्टंन्ट फिल्म्स’. हाणामारीचे चित्रपट!

पुढची पंधरा वर्षे जी काही असे चित्रपट आले(ते वाडियांचे असो किंवा इतर फिल्म स्टुडियोचे असो), ते ह्या चित्रपटाला नजरेसमोर ठेवूनच बनवले गेले.

सूड घेण्याची प्रतिज्ञा करणारे एखादे पात्र(बऱ्याचदा ते स्त्री पात्र असे), त्याला एखादा मुखवटा(mask), हातात हंटर, मारामारी करण्यासाठी सज्ज असा अविर्भाव, जोडीला कुत्रा, घोडा हे सगळे ह्या अश्या चित्रपटांत आवश्यक गोष्टी होत्या.

प्रकाश पिक्चर्स यांच्या जवळ असलेला ‘बहादूर’ नावाचा घोडा, ‘टायगर’ नावाचा कुत्रा होता. मोहन चित्र नावाच्या फिल्म कंपनीच्या चित्रपटांची नावे सायकलवाली, मोटारवाली अशी होती. त्यांत रोमोला नावाची व्यक्ती सत्य, न्याय या करिता चेहऱ्यावर मुखवटा धारण करून हाणामाऱ्या करत असे. विठ्ठल आणि शंकरराव पहेलवान त्यांच्याच अश्या खास शैलीत ‘स्टंन्ट’ चित्रपट बनवत असत.

पण त्या शैलीतील चित्रपटांत यांपैकी आमच्या एवढे आणि आमच्या सारखे कोणी काम केले नाही, असे चेहऱ्यावर स्मित हास्य आणत होमी म्हणाले.

‘असे असले तरी १९३०च्या सुमारास प्रत्येक फिल्म स्टुडियो आपली स्वतःची अशी एक शैली होती. त्यात विशेष स्पर्धा नसे. कलाकार, तंत्रज्ञ आपापल्या स्टुडियो मध्ये निष्ठापूर्वक आणि अभिमानाने काम करत असत. ‘
‘इम्पेरिअल मध्ये सुलोचना, डी. बिल्लीमोरिया या सारखे नट होते. ते भव्य सेट असलेले, मोघल काळातील चित्रपट बनवत असत. त्यांच्या चित्रपटातील ‘स्टंन्ट’ हे वेगळे असत. खरे खुरे स्टंन्ट फक्त आमच्या चित्रपटांत असत.’

ततः प्रविशति नादिया!

दरबारातील दुष्ट वृत्तीचा मंत्री सदाचारी राजाला फसवून कारागृहात टाकतो. प्रजेला देखील तो विनाकारण त्रास देत असतो. राज्यात हाहाकार माजतो. असहाय राजकन्येला तो देशोधडीला लावतो. शेवटी न्यायासाठी लढायला तिलाच पदर सरसावून उभे राहावे लागते, लढावे लागते. त्या वेळेला, असहाय अशी राजकन्या आपला आधीचा पोशाख म्हणजे साडी वगैरे फेडून, अंगावरती काळा पोशाख, चेहऱ्यावर मुखवटा धारण करते. मग घोडेस्वारी करणाऱ्या , पोहायला येणाऱ्या, कुस्ती खेळणाऱ्या, जमिनीवरून उंचावर उडी मारून जाणाऱ्या, हाणामारी करणाऱ्या अश्या असामान्य योध्यात रुपांतर होऊन प्रेक्षकांसमोर येत असे. सारे प्रेक्षक्र या क्षणाची उत्सुकतेने वाट बघत असत. आणि तसे झाले रे झाले कि अतिउत्साही प्रेक्षक टाळ्या, शिट्या यांनी चित्रपटगृह डोक्यावर घेत असत. आसनावर उद्या मारत, त्यावर उभे राहून, मागील प्रेक्षकांकडून शिव्या खात असत. असा सगळा गोधळ माजत असे!

ऑस्ट्रेलिया मधील पर्थ शहरात १९१० मध्ये नादियाचा जन्म झाला. तिचे नाव मेरी ईव्हान्स. आई मुळची ग्रीस देशाची. वडील मुळचे वेल्स प्रांतातील. स्टेनो-टायपिंग शिकून नोकरी करत होती. वजन कमी करण्यासाठी ती नर्तन शिकू लागली. याचा परिणाम म्हणून Zacko या रशियन सर्कशीत काम करून लागली. नंतर मादाम अस्त्रोव्हा यांच्या ballet मध्ये त्या गेल्या. त्यांनी भारताचा दौरा केला.

‘त्या काळात चित्रपटगृहात चित्रपटासोबत, नृत्य सादर करत असत. देशात बऱ्याच ठिकाणी ब्रिटीश सैनिकांसाठी तसेच नागरिकांसाठी क्लब असत. नृत्याच्या कार्यक्रमासाठी लाहोर हे प्रसिद्ध होते. ‘

एका ज्योतिषाच्या सांगण्यानुसार त्यांनी नादिया हे नाव धारण केले.

जी. बी. एच. यांनी दिग्दर्शित केलेल्या नूर-ए-यमन या चित्रपटात तिला नृत्याच्या दृश्यात बोलावले गेले होते.(‘पर्शियन कथा होती. मी त्यात राजकन्या होते. ‘). त्यासाठी नादियाने नावात देवी हे लावयला जी. बी. एच. यांनी आग्रह धरला होता.

‘ते शक्य नाही असे मी बजावले’ .

‘नादिया हि माझ्या साठी खूप नशीबवान ठरली.’

‘फियरलेस’ नादिया आपल्या रुद्रवतारात, घोड्यावर चढून, बदला घेण्याचा डोळ्यात असलेला निर्धार, हे….असा आवाज काढत, खलनायकाच्या अंगावर धावून जाणे, हे सगळे मला माझ्या बालपणीच्या रोमांचकारी आठवणीचा भाग आहे. ती आम्हा १९४०च्या दशकातल्या आम्हा शाळकरी मुलांना आदर्शवत होती, धैर्य, शक्ती यांचे ते प्रतिक होती. त्या चित्रपटात कितीही हाणामारी असली तरी, हिंसा नसे. रक्तपात नसे. हाणामारीची ती दृश्ये ballet नृत्याप्रमाणे रचली जात असत.

‘माझा घोड्यांवर खूप जीव होता. मला ती आवडत असत. वाडिया मूव्हीटोन मध्ये पंजाब का बेटा नावाचा एक घोडा होता. नंतर ‘राजपूत’ नावाचा देखील एक घोडा होता. त्यांचे प्रशिक्षण आगा महम्मद नावाच्या घोडे प्रशिक्षकाकडे होते. दोन्ही घोडे अतिशय चाणाक्ष होते. कॅमेरा समोर ठेवल्याशिवाय काम करायला राजी होत नसत.;

‘काही वेळा त्यांना काय होत असे कोणास ठाऊक. एका चित्रपटात सयानी नावाचा नट खलनायकाची भूमिका करत होते. एक दिवस ते स्टुडियोत आरडाओरडा करत आले. पंजाब का बेटा हा घोडा त्यांचा असा आवाज ऐकल्याबरोबर, त्यांच्या अंगावर चालून गेला. सयानी अख्ख्या स्टुडियोभर त्याच्या पासून वाचण्यासाठी पळत होते, ‘बचाव, बचाव’ असे ओरडत होते. मी पाळणाऱ्या घोड्याला ताबूत आणण्यात तरबेज होते. ‘

नादियाने कधीही dummy किंवा duplicate लोकांचा वापरा करू दिला नाही. आपली साहसी दृश्ये तीच स्वतःच करत असे.

‘त्या काळात fight composer असा कोणी नसे. सगळी आमचीच कल्पनाशक्ती. आमच्याकडील आझमभाई, आणि मोहम्मद हे दोघे fighters पुढे fight composer झाले. ‘

‘आम्ही खूप काम करत असू, कष्ट करत असू. मी चित्रिकरणाबद्दल बोलत नाही, तर मी व्यायामशाळेत व्यायाम करत, कसरत करत असे. कायम काहीना काही गोष्टींचा सराव, नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयोग करत असे. माझी सहकारी मला gangster असेच म्हणत असत. एखाद्या पुरुषाला कसे उचलून खाली फेकायचे हे मी शिकले होते. मी तसे पहिल्यांदा केले ते आमच्या इथे खलनायकाचे काम करणाऱ्या सयानी याच्यावर. ‘

‘काही अनुभव खूपच भयानक होते, धोकादायक असत. Diamond Queen मध्ये एक दृश्य असे होते. त्यात एका उतारावरून घोडागाडी जोरात जात आहे, त्यात मी आणि सयानी दोघे हाणामारी करत आहोत. गाडीला आम्ही ब्रेक लावून घेतले होते. आणि आम्हाला हवे तेवढी ती गाडी खाली गेल्यावर ब्रेक दाबण्याचे ठरले होते. पण जेव्हा शॉट संपला, तेव्हा तो ब्रेक काही केल्या लागेना. गाडी आणखीन जोरात पुढे उतरू लागली होती. सयानी जोरजोरात ओरडायला लागले होते. मी त्याला न घाबरता, गाडीला घट्ट घरून राहा असे परोपरी बजावत होते. पण शेवटी त्याने हाय खाल्ली आणि गाडीतून खाली उडी मारली आणि पाय मोडून घेतला. मी तशीच गाडीत बसले होते. सुदैवाने पुढे एक अडसर आला आणि गाडी तेथे थांबली.’

‘तुमच्या चित्रपट कारकिर्दीत जीवावर बेतलेला कुठला अपघात असा झाला’, मी विचारले.

‘हंटरवाली मध्येच! मला अमावस्येची भीती वाटत असे. जॉन कावस पण तसेच होते. सगळा दिवस बाहेर चित्रीकरण झाले कि रात्री फिल्म स्टुडियो मध्ये चित्रीकरण होत असे. मला एका कोपऱ्यातून दुसरीकडे छतावर लोंबकळत असलेल्या दिव्याला धरून दुसऱ्या कोपऱ्यात जायचे होते, आणि तेथे मला जॉन कावस अलगद पकडून उतरवणार असे दृश्य होते. तीन वेळा व्यवस्थित तालीम झाली. पण शॉटच्या वेळेस नेमके जॉनने माझा हात सोडून दिला. मी तशीच आडवी खाली आले आणि जमिनीवर आदळले. मला सगळीकडे इजा झाली. स्टुडियो जवळ Kemp’s Corner मधून औषधे घेऊन मी रात्री साडेआठला घरी गेले. ‘

हे सगळे ते सांगत असताना, संभाषण चालू असताना, त्या मात्र ‘Oh, I loved it!, It was a great life, I have had much a marvelous time’ असे उद्गार काढत होत्या!

(क्रमशः)

‘फियरलेस’ नादिया, भाग#१

गत काळातील हिंदी चित्रपट पार्श्वगायिका, तसेच अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकी यांच्या कन्नड चरित्राचे मराठीत भाषांतर ग्रंथाली तर्फे २०१४ मध्ये प्रकाशित केल्या नंतर, २०१० मध्ये मी गिरीश कर्नाड यांच्या कन्नड लेखांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचे भाषांतर करायला घेतले होते. खूप सावकाश काम चालू आहे. आता पर्यंत एकूण सतरा लेखांपैकी पाच भाषांतरित झाले आहेत. ते ह्या ब्लॉगवर देखील टाकले आहेत. ह्या सगळ्या मध्ये २०२० मध्ये कोव्हीड काळात असामान्य अभिनेता दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या कन्नड मधील, त्यांच्या आईने लिहिलेल्या चरित्राचे, छोटेखानी पुस्तकाचे मराठीत भाषांतर करून देखील झाले. दोन्ही पुस्तकांसाठी प्रकाशक शोधणे चालू आहे. बघुयात कसे होते ते!

साधारण पाच वर्षांपूर्वी(फेब्रुवारी २०१७) विशाल भारद्वाज दिग्दर्शित, आणि आजची वादप्रिय अभिनेत्री कंगना राणावत हिची प्रमुख भूमिका असलेला रंगून नावाचा चित्रपट आला होता. तो नादिया नावाच्या एका जुन्या काळातील अभिनेत्रीच्या आयुष्यावर आधारित होता. ती मी पाहिला होता, आणि आवडला होता मला. त्याच नादियावर १९७६ मध्ये गिरीश कार्नाड एक लेख लिहून गेले आहेत. त्यांच्या आगोम्मे ईगोम्मे (२००८, प्रकाशक मनोहर ग्रंथमाला, धारवाड) या कन्नड पुस्तकात तो आहे. त्याच वेळेला मला तो लेख भाषांतरित करून ब्लॉग वर टाकायचा होता. पण जमले नाही. आज तो योग येत आहे. हा लेख काही भागात ब्लॉगवर आपल्या साठी देत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात अनेक Anglo-Indian असलेल्या नट नट्यांनी आपले योग दिले आहे. नादिया त्यातलीच एक, जिचे नाव Mary Evans असे होते. मिस गोहरा हिच्या वरील लेखात उल्लेख आलेल्या सुलोचना(जिचे नाव Ruby Myers) हि सुद्धा Anglo-Indian होती. ह्याच्या विषयी काही लिखाण झाले आहे का ते पाहिले पाहिजे. अर्थात Dorothee Wenner यांनी २००५ मध्येच नादियाच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले आहे. ते मी अजून वाचले नाही.

ह्याच जानेवारी महिन्यात तिची जयंती आणि पुण्यतिथी असते. नव्वदहून अधिक वर्षे झाली तिच्या जन्म होऊन आजमितीला. काही वर्षात शंभरी गाठेल.  युट्यूब वर नादियाचे काही चित्रपट आहेत. वेळ काढून कधीतरी पहिले पाहिजेत आणि तो काळ थोडासा तरी अनुभवता येईल असे वाटते. असो.

फियरलेस’ नादिया

१९७६ मध्ये Cinema Vision या मासिकाच्या संपादकांनी मला १९४०च्या दशकातील अभिनेत्रीपैकी कुठल्यातरी अभिनेत्रीची मुलाखत घ्यायला सांगितले. तेव्हा मी नादियाची मुलाखत घेईन असे सांगितले. संपादकांनी होकार दिला. पण त्यांना माझ्या निवडीचे आश्चर्य देखील वाटले. नादियाची ओळख हि मुलांत आणि अशिक्षित लोकांत फक्त हाणामारीच्या अश्या चित्रपटात काम करणारी नटी अशी हिणवणारी होती. ‘स्टंन्ट’ करणाऱ्या स्त्री बद्दल तुच्छित स्मिताशिवाय आणखीन वेगळी कोणती प्रतिक्रिया असणार असे त्यांना वाटले असणार. मी तिची मुलाखत घेण्याच्या वेळीस लोकं तिला विसरून गेले होते.

नादिया बरोबरची मुलाखत दुपारी बारा वाजता सुरु झाली. त्यांना त्यात विशेष रस नव्हता. ‘काय सांगू, सगळे संपले आहे आता!’ अशी त्यांची थंड प्रतिक्रिया असे. त्याच सुमारास Cinema Vision च्या संपादकांपैकी एक राणी बात्रा हे तेथे आले. मुंबईच्या दमट उन्हातून त्या धावत आल्या होत्या. दमल्या होत्या. आल्या आल्या त्यांनी नादिया यांना त्यांनी घरात व्हिस्की आहे का ते विचारले.

त्या बरोबर नादियांचा चेहरा उजळला. राणी बात्रा यांना त्यांनी व्हिस्की दिली. मलाही दिली. तुम्हाला नकोय का असे विचारले असता, ते म्हणाले कि माझ्या नवऱ्याला(म्हणजे होमी वाडिया) मी व्हिस्की प्यायलेली आवडत नाही, आहे छद्मी पणे हसत सांगितले. तेथे होमी सुद्धा होते, ते देखील हसले. त्या नंतर दोन दिवस आमचे संभाषण चालू होते.

Cinema Vision मध्ये मुलाखत प्रकाशित झाल्यावर त्याचे छान स्वागत झाले. लोकांना ती मुलाखत आवडली. The Illustrated Weekly of India मध्ये त्या मुलाखतीबद्दल मोठी अशी समीक्षा आली ,त्याच बरोबर नादिया यांच्या चित्रपटांबद्दल माहिती देखील आली. इतर वेगवेगळ्या ठिकाणहून देखील प्रतिक्रिया आल्या. होमी वाडिया यांना राणी बात्रा यांनी दूरध्वनी वर मुलाखतीबद्दल विचारले असता ते काही न बोलता, फक्त मनमोकळे हसले.

होमी वाडिया यांच्या रियाद या नावाच्या चुलत नातवाने नादिया यांच्या जीवनावर एक माहितीपट बनवला होता १९९४ मध्ये. तो करावा असे त्यांना वाटले याचे कारण मी घेतलेली मुलाखत आणि त्या संबधीचे लेखन. हि गोष्ट नंतर मला समजली. बर्लिन आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्याचे उत्साहात स्वागत झाले. आता भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात नादियाचा उल्लेख न करता जाता पुढे जात नाहीत, हे सांगायला मला संतोष होत आहे.

सगळ्याच्या आधी वर्गात बातमी आणणारा मुलगा त्या दिवसाचा हिरो ठरत असे. वर्गात पाय ठेवल्याठेवल्या तेथील उत्तेजित वातावरणच सांगत असे कि, शिरसी मध्ये एक नवीन ‘स्टंन्ट’ फिल्म येत आहे. त्यानंतर चर्चा होत असे कि तो चित्रपट नादिया किंवा वाडिया फिल्म्सचा(दोन्ही नावे अदलून बदलून आम्ही वापरत असू, एवढे ती दोन्ही नावे एकाच गोष्टीसाठी आहेत हे आमच्या डोक्यात फिट बसले होते) आहे. त्या चित्रपटाबद्दल आणखीन अधिक माहिती मिळेपर्यंत, तसेच चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याचा दिवस समीप आला कि, चित्रपटगृहात जाऊन भयानक गर्दीमधून तीन आण्याचे तिकीट काढून शेवटच्या आसनावर बसून तो चित्रपट कसा पाहायचा याचे स्वप्नरंजन होत असे.

‘कोहिनूर फिल्म्स स्टुडियोच्या समोर दिवारे फिल्म लॅबोरेटरी होती. तेथे मी आणि माझा थोरला भाऊ जमशेद काम करत असू.’ , होमी वाडिया सांगत होते. ‘मी लॅब टेक्नीशियन म्हणून काम करत होतो! ती १९२०ची गोष्ट आहे’. दोन्ही भाऊ चित्रपटसृष्टीत जाऊन काम करत असल्यामुळे, घराची मंडळी नाराज होती. जमशेद(जी. बी. एच ह्या नावाने प्रसिद्ध, जन्म १९०१) बी. ए. मध्ये पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले होते, आणि एल एल बी पदवी देखील मिळवली होती. असे असून सुद्धा, त्यांनी फिल्म्स जगतात जाण्याचा निर्णय घेतला होता. होमी त्यांच्या पेक्षा दहा वर्षांनी धाकटे होते. Matrick झाल्यानंतर कॉलेज मध्ये न जाता भावासोबत फिल्म्स क्षेत्रात काम करू लागले होते. १९२७ मध्ये दिवारे फिल्म लॅबोरेटरी सोबत त्यांनी वसंतलीला नावाचा चित्रपट बनवला. होमी वाडिया यांना चित्रपट दिग्दर्शन करण्याची प्रेरणा मिळाली होती ती Zorro चित्रपटामुळे!

‘त्या दिवसात कोहिनूर स्टुडियोच्या आसपास अनेक मुले चित्रपट क्षेत्रात येण्याकरिता फिरत असत. त्यातीलच एक यशवंत दवे नावाचा मुलागा मला म्हणाला, ‘मला हिरो करत नाहीत, मी Zorro चित्रपटात दाखवल्या सारखे एका घरावरून दुसऱ्या घरावर उड्या मारु शकतो.’ मग मी त्याची परीक्षा घ्यायची ठरवले. दिवारे फिल्म लॅबोरेटरी जवळ उताराचे कौलारू छत असलेले घर होते. त्यावर दवेने उड्या मारून दाखवल्या आणि तो परीक्षा पास झाला. बरीच कौले तुटली, फुटली. मोठा गोंधळ झाला त्यामुळे. जमशेद माझ्यावर त्यामुळे रागावला होता. पण दवेने स्वतःची योग्यता दाखवून दिली होती. त्यामुळे आम्ही त्याला घेऊन चित्रपट करण्याचे ठरवले.’

‘चित्रपटाचे नाव Thunderbolt अथवा दिलेर डाकू (१९३१) असे होते. कोहिनूर मधून एक हजार रुपये देऊन एक मुव्ही कॅमेरा Pathé (Pathé Frères) घेतला. दवेला काही मोबदला मिळाला नाही. बाबुराव पै यांचे बंधू खलनायक झाले होते. त्याला देखील काही दिले नव्हते. तसेच त्याची मोटार कार आम्हाला चित्रपटासाठी त्याने फुकट वापरायला दिली म्हणून त्याचे नाव सहदिग्दर्शक म्हणून लावले! नायिका मुमताज दिवसाला वीस रुपये घेऊन चार दिवस तिने काम केले. कथेची मुळ रूपरेषा जमशेदची होती. दिग्दर्शन, छायाचित्रण, आणि संकलन ह्या तिन्ही बाजू मीच सांभाळल्या.’

‘दोन हजार रुपयात चित्रपट बनला. तीन हजार रुपयात तो आम्ही ब्रिटीश इंडिया कॉर्पोरेशनला विकला. थोडेफार पैसे मिळाले त्यामुळे आम्हाला!’

त्या नंतर बरीच वर्षे होमी वाडिया यांनी दिग्दर्शन केलेच नाही. वाडिया बंधूंच्या ह्या चित्रपटानंतरच्या अर्धा डझन मूकपट जी. बी. एच यांनी दिग्दर्शित केले, आणि होमी यांनी छायाचित्रण केले. यातील एक चित्रपट तुफान मेल(१९३२). वाडिया बंधूंच्या चित्रपटात हमखास दिसणारे रेल्वेचे चित्रण याच चित्रपटापासून सुरु झाले. पुढची दोन दशके त्यांनी तयार केलेल्या चित्रपटांची नवे जरी पहिली तरी त्यांचे रेल्वे प्रेम लक्षात येते. मिस फ्रंटीयर मेल(१९३६), हरिकेन हंस(१९३७), तुफान एक्स्प्रेस(१९३८), फ्लायिंग राणी(१९३९)), पंजाब मेल(१९३९), हरिकेन स्पेशल(१९३९), सन ऑफ तुफान मेल(१९४७). त्यांचे प्रतिस्पर्धी असलेला रणजीत फिल्म स्टुडियो यांनी देखील त्यांच्या बरोबर भागीदारीत एक चित्रपट केला ज्याचे नाव होते रिटर्न ऑफ तुफान मेल, आणि त्यांचे वर्चस्व मान्य केले.

‘मी फ्रंटीयर मेल(१९३६) केला तेव्हा बोरीवलीच्या पलीकडे आमची स्वतःची रेल्वे फिरवण्याची व्यवस्था केली होती. पाच मालवाहतुकीचे डबे, एक प्रवासी डबा, एक इंजिन, हे सगळे आठ दिवस सकाळ सात ते संध्याकाळी पाच पर्यंत दररोज आमच्या तैनातीला होती. एका रेल्वे कंपनीच्या आणि विमान कंपनीच्या मध्ये असलेली स्पर्धा हा त्या चित्रपटाचा कथाविषय होता. त्यावेळची BBCI रेल्वे कंपनीला आमच्या चित्रपटाचे नाव आवडले नाही. फ्रंटीयर मेल हि त्यांच्या लोकप्रिय गाड्यांपैकी एक होती. त्यामुळे आम्ही चित्रपटाचे नाव बदलून मिस फ्रंटीयर मेल असे ठेवले.’

‘त्या चित्रपटाची नायिका होती नादिया. तिला रेल्वे डब्यावर फिरण्याचे दृश्य होते. तिला भूक लागली कि ती खाली न येत, वरच तीला तिचे sandwich पोहचते करत असू आणि ती तेथेच खात असे. ‘

वाडिया मुव्हीटोनने निर्मिती केलेल्या पहिला बोलपट म्हणजे लाले यमन(१९३३). जी. बी. एच. यांनीच त्याचे दिग्दर्शन केले होते. होमी वाडिया परत दिग्दर्शनाकडे वळले ते १९३४ मध्ये हिंदू मुस्लीम ऐक्य दाखणारा चित्रपट वीरभारत या चित्रपटाद्वारे.’

‘आम्ही त्या काळात वेगवेगळे प्रयोग करत असू. नवीन उत्साही होता’, असे होमी वाडियांनी आठवण काढली. ‘आम्ही आमचा दुसरा बोलपट सुरू केला होता. त्यावेळी आवाज रेकॉर्ड करण्यासाठी आमच्याकडे Audio Camex नावाचे ध्वनीमुद्रण यंत्र होते. त्याला एक मोठाले mike होते. पण तो अभिनेत्यांच्या अगदी तोंडाजवळ ठेवला तरच आवाज रेकॉर्ड होई. त्यामुळे close up घ्यावे लागत असत. आणि बाकीच्या वेळेस आवाज नंतर dub करत असू. ‘

‘आमच्या स्टुडियोमध्ये असलेल्या मूर्तींवर आघात केल्यावर सुंदर नाद निर्माण होई. तो आम्ही कहाँ है मंजिल तेरी(१९३९) मध्ये वापरला. त्याच प्रमाणे घोड्यांच्या टापांच्या आवाजाकरिता नारळावर आवाज काढण्यापेक्षा आमच्या सोलर दिव्यांवर आघात केल्याने जो ध्वनी निर्माण होई तो जास्त जवळ जाणारा होता असे लक्षात आले होते.’

होमी वाडिया यांच्या दिग्विजयासाठी कारणीभूत ठरला तो चित्रपट म्हणजे १९३४ मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हंटरवाली!

चित्रपट तत्काळ लोकप्रिय झाला. सुमारे दोन लाख रुपये खर्च करून तयार केलेला हा चित्रपट कपूरचंद नावाच्या चित्रपट वितरकाला दोनदा दाखवला तरी त्यांनी तो घ्यायला नाकारला होता. नंतर ह्याच चित्रपटाने एकूण खर्चाच्या पाच पट फायदा करून दिला.’

‘नायकाची भूमिका बोमन श्रॉफ यांनी केली होती. ते एक अतिशय धाडसी व्यक्तिमत्व होते. अगदी daredevil म्हणावे तसे. खरेखुरे इराणी होते. एकदा त्यांनी शब्द दिला म्हणजे पुरेसे, ते काम नक्कीच करणार. एकदा एका दृश्यात Tata Palace च्या वरून उडी मारली होती त्यांनी. असे असले तरी हंटरवाली चित्रपटाचे खरे यश त्यातील नायिका फियरलेस नादिया हिच्या मुळेच! अद्भुत ‘स्टंन्टवाली’ होती ती!

(क्रमशः)

Glorious Gohar, Part#3

मिस गोहार नावाची अगदी जुन्या काळात एक अभिनेत्री होती. तिचे पूर्ण नाव गोहार माम्माजीवाला. भारतीय संगीत आणि नाट्य क्षेत्रात अजून दोन गोहार होऊन गेल्या आहेत. त्यातील एक गोहार जान , जी शास्त्रीय संगीत गाणारी गायिका होती आणि दुसरी गोहराबाई कर्नाटकी, जी नाट्य क्षेत्रात कार्यरत होती. या मिस गोहार बद्दल गिरीश कर्नाड एक लेख लिहून गेले आहेत. त्यांच्या आगोम्मे ईगोम्मे या कन्नड पुस्तकात तो आहे. त्याचे मराठीत मी भाषांतर करत आहे. हा लेख काही भागात ब्लॉगवर आपल्या साठी देत आहे. दोन गोहार बद्दल लिहून झाले आहे. तिसऱ्या गोहर बद्दल लवकरच लिहीन. विक्रम संपत यांनी लिहिलेले तिचे चरित्र माझ्याजवळ आहे. असो. ‘ग्लोरिअस’ गोहार लेखाचा तिसरा आणि शेवटचा भाग आज देत आहे. पहिला आणि दुसरा भाग येथे आणि येथे अनुक्रमे पाहता येईल.

‘रणजीत स्टुडियो त्यावेळी किती चित्रपट करत असत?’, मी विचारले.

‘मूकपट युगात वर्षागणिक सहा ते आठ चित्रपट बनवत असू. कोहिनूर सुमारे एक डझनभर चित्रपट वर्षाकाठी करत असे. बोलपट सुरु झाल्यावर सख्या चार ते सहा वर आली. प्रभात आणि इतर स्टुडियो तर त्याही पेक्षा कमी चित्रपट करत होते. त्यामुळे रणजीत स्टुडियो खरें तर film factory म्हणूनच ओळखले जाई.’

‘सर्वसामान्य यश मिळवणारे चित्रपट साधारण आठ आठवडे चालत असत. दहा-बारा आठवडे जर चालला तर आम्ही खुश होत असू. ‘लंका नि लाडी’ पंचवीस आठवडे चालला. साऱ्या चित्रपटसृष्टीला त्या यशाने अवाक केले. पण तो एक अपवाद होता एवढेच.’

‘प्रेक्षकांची संख्या आजच्या पेक्षा खूपच कमी असे त्यावेळी, हे सांगायला नकोय. चित्रपटगृह किती होते? पहा, इम्पेरिअल होते(त्याला लोकं हत्ती हाथी असे म्हणत असत कारण त्याच्या फाटकावर दोन मोठाल्या हत्तींची प्रतिकृती होत्या) कृष्ण होते(त्यावेळचे Dreamland), त्यानंतर Westend (त्यावेळचे नाझ), ओपेरा हाउस देखील होते, तेथे ओपेरा व्यतिरिक्त नाटके, चित्रपट देखील दाखवत असत. आम्ही Westend आणि ओपेरा हाउस दोन्ही lease वर घेतली होती. ‘

‘चित्रपट व्यवसायात गैरव्यवहार होत असत का?’ असे मी विचारले.

‘तसे काही नाही. लहान मोठे राग लोभ हे असतच. एखाद्या स्टुडियोत काम करणारे नट नट्या यांना दुसऱ्या स्टुडियोने आपल्याकडे खेचून घेतले तर तो गैरव्यवहार ठरत असे.’

‘चित्रपट वितरण कसे होत असे?’ मी विचारले.

‘आम्ही चित्रपट वितरण कसे करत असू हे विशेष लक्षात नाही आता. पण वेगवेगळ्या प्रदेशात असलेल्या exhibitors (थियेटर मालाकांसोबत) आम्ही चित्रपट दाखवण्याची व्यवस्था करत असू. नवीन चित्रपट तयार झाल्यावर त्याच्या प्रिंट्स आम्ही पाठवत असून. ते देखील आमच्या चित्रपटांची वाट पाहत असत आणि त्याप्रमाणे ते थियेटर आम्हाला देत असत. खतम हो गयी बात!’

हि १९३० ची गोष्ट होती.

‘पण कालांतराने अभिनेते मंडळी स्टुडियोच्या नोकरीतून बाहेर पाडून स्वतंत्रपणे free lancing करू लागले तेव्हा चित्रपट व्यवसाय हा शेअर बाजारासारखा होऊ लागला. आता तर काय जे निर्माते जास्ती पैसे देऊ शकतात, त्यांनाच एखादा चांगला अभिनेता लाभतो. तानसेन, परदेसी चित्रपटाचा नायक खुर्शीद याला दुसऱ्या चित्रपट निर्मात्यांनी आमच्या पासून हिरावून घेतले. तो freelancer नट बनला. शेवटी आम्ही देखील अश्या freelancer नट नट्या आमच्या चित्रपटात घेऊ लागलो. जसे सुरय्या आणि देव आनंद यांना घेऊन आम्ही नीली हा चित्रपट केला.’

‘हॉलीवूडचा प्रभाव कसा होता? विदेश तंत्रज्ञानाच्या बाबतीत’, मी विचारता झालो.

‘काहीच नाही. रणजीत स्टुडियोत तर नाहीच नाही. त्या काळाच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा अशी असे कि एखादी चांगली मुलगी, एखादा चांगला मुलगा असावा लागे. हॉलीवूड चित्रपटात सुष्ट आणि दुष्ट अश्या दोन्ही प्रवृत्तीची पात्रे असत, किंवा चांगली असणारी मुलगी थोडीफार वाईट असू शकते. आजकाल तश्या प्रकारचे चित्रण आपल्या चित्रपटात येऊ लागले आहे. आम्ही एका अमेरिकन चित्रपटावर आधारित एकच असा चित्रपट बनवला होता, त्याचे नाव विश्व मोहिनी. त्याचे मूळ नाव Camille.त्यात खूप गाणी होती. त्यातील माझ्या भूमिकेसाठी मला एक पुरस्कार देखील मिळाला होता. पण कुठला तो आता आठवत नाही.’

‘हॉलीवूड चित्रपटांपासून स्फूर्ती घेऊन चित्रपट बनवणाऱ्यात वाडिया बंधू हे एक होते. त्यांच्या चित्रपटांत पाठलागाची दृश्ये, छतांवर हाणामारी, या सारखी दृश्ये हॉलीवूड चित्रपटांपासून प्रेरित असत. तुम्हाला वाडिया माहिती आहेत का? अतिशय सुसंस्कृत जोडपे होते वाडिया पती पत्नी यांचे. अतिशय बुद्धिमंत, उत्साही! असे लोकं आजकाल पाहायला मिळत नाहीत!’

‘आमच्या पेक्षा बऱ्याच वर्षांनी सुरु झालेल्या Bombay Talkies ने काही विदेश तंत्रज्ञान माहित असलेले तंत्रज्ञ घेतले होते. त्यातील हिमांशू राय पासून इतर अनेक लोकांची शिक्षण, काम करण्याची पद्धत हि सगळी हॉलीवूड प्रेरित होती.’

‘रणजीत स्टुडियोच्या इतिहासाच्या उत्तरार्धात हे सगळे बदलले.’

‘माझा शेवटचा चित्रपट ‘अछूत’ १९३६ मध्ये आला. मी अस्पृश्य मुलीचे काम त्यात केले होते. मोतीलाल हे माझे त्यात पती झाले होते. तो चित्रपट संपल्यानंतर, मी चित्रपटसृष्टी सोडून द्यायचे, त्यात अभिनय करण्याचे थांबवण्याचा निर्णय घेतला. उद्योगाचे प्रत्येक अंग बदललेले होते. मला कुठेच समाधान मिळत नव्हते. मी माझ्या कारकीर्दीच्या शिखरावर असताना बाहेर पडणे योग्य असा मी विचार केला. कोणीत तरी आपल्याला काढून टाकण्याचा आत बाहेर पडणे चांगले. आणि माझी आर्थिक स्थिती देखील समाधानकारक होती.’

‘रणजीत स्टुडियोचा अखेरचा चित्रपट अकेले मत जय्यो हा होता. मीनाकुमारी होती त्यात. चंदुलाल शहा यांनी निर्मिती केलेला तो शेवटचा चित्रपट. ‘

‘त्याच वेळेस आमच्या आयुष्याला उतरती कळा ल्गालायला सुरुवात झाली. एका काळात चंदुलाल शहा सारखे दूरदृष्टी असलेली व्यक्ती नव्हती. आता त्यांच्या आसपास कोणी नव्हते. त्यांना शेअर मार्केटचे व्यसन होते. त्यात ते आपले सगळे पैसे गमावून बसले. स्टुडियोत कर्मचाऱ्यांत अस्वस्थता वाढत होती. त्या नंतर आम्ही स्टुडियो काही तंत्रज्ञांच्या हाती देऊन त्यांना तो चालवण्यास दिला. सुरुवातीला आम्ही त्यांच्याबरोबर काम करत असू. पण नंतर ते अवघड होऊ लागले. चंदुलाल शहा अर्धांगवायुने ग्रस्त झाले. माझे आरोग्य देखील बिघडायला लागले होते. पूर्वीचा उत्साह आता उरला नव्हता. पाच सहा वर्षांपूर्वी एक चित्रपट करावा असे मी ठरवले होते. त्याचे नाव कच्चे धागे( ह्या नावाने जो नंतर चित्रपट आला तो माझा नव्हता, मी फक्त नाव नोंदवले होते, पण त्यांनी ते वापरून चित्रपट प्रदर्शित केला). मी तो चित्रपट जर खरेच केला असता तर काय झाले असत कोणास ठाऊक. आजकाल चित्रपट निर्मिती करणे हे एक प्रकारचे दुःस्वप्न झाले आहे. नट नट्यांना लाखो रुपये द्यायचे, इतर कर्मचाऱ्यांना विशेष काही मिळत नाही. सगळ गोंधळ आहे. मी चित्रपट बनवला नाही हे सुदैव माझे असे आज वाटते आहे.’

रणजीत स्टुडियोच्या अवनितीबद्दल बोलताना त्यांच्या बोलण्यात विषाद असा काही जाणवला नाही. जे झाले ते त्यांनी स्वीकारलेले होते. तरीही विनोदी स्वभाव, हास्य त्यांच्या चेहऱ्यावरून गेले नव्हते.

मी त्यांना विचारले कि सुलोचना यांना भेटणे शक्य आहे का. त्यांनी सांगितले, कि मीच त्यांना दूरध्वनी करून त्या बद्दल विचारते. तसा त्यांनी तो केला देखील.

‘त्यांना भेटण्याची इच्छा नाही’, असे त्यांनी मृदू आवाजात कळवले. ‘त्यांना बरे वाटत नाही, त्या दिवसांच्या आठवणी पुसून गेल्या आहेत, विरल्या आहेत असे त्यांनी सांगितले. आणि ते मी समजू शकते’.

मुलाखत संपल्यावर गोहार यांनी आपल्या घरातील आतल्या खोलीत असलेले कपात दाखवले. ‘मी वृत्तपत्रांत आलेल्या प्रत्येक लेखाचे, press cuttings नीट जपून ठेवले आहेत. माझ्या समाधानासाठी’, असे त्या म्हणाल्या. मी म्हणालो, ‘ठीक आहे. ,मी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला कळवतो. ते नक्कीच हा सगळा ठेवा घेऊन जातील.’ त्यांनी ठीक आहे असे म्हणत मान डोलावली. पण पुढे तो विषय मी विसरलो. नंतर मला त्या बद्दल लक्षात आले ते १९७५ मध्ये, जेव्हा गोहार यांचे निधन झाले तेव्हा. तो पर्यंत त्यांनी ते घर रिकामे करून दुसरी कडे गेल्या होत्या. आपल्याकडे ह्या अश्या दुर्लाक्षतेमुळे, विसरण्याच्या स्वभावामुळे इतिहास नष्ट पावत आला आहे.

[कृतज्ञता: Cinema Vision, Vol 1, No 1, Jan 1980]

(समाप्त)

Glorious Gohar, Part#2

मिस गोहार नावाची अगदी जुन्या काळात एक अभिनेत्री होती. तिचे पूर्ण नाव गोहार माम्माजीवाला. भारतीय संगीत आणि नाट्य क्षेत्रात अजून दोन गोहार होऊन गेल्या आहेत. त्यातील एक गोहार जान , जी शास्त्रीय संगीत गाणारी गायिका होती आणि दुसरी गोहराबाई कर्नाटकी, जी नाट्य क्षेत्रात कार्यरत होती. या मिस गोहार बद्दल गिरीश कर्नाड एक लेख लिहून गेले आहेत. त्यांच्या आगोम्मे ईगोम्मे या कन्नड पुस्तकात तो आहे. त्याचे मराठीत मी भाषांतर करत आहे. हा लेख काही भागात ब्लॉगवर आपल्या साठी देत आहे. दोन गोहार बद्दल लिहून झाले आहे. तिसऱ्या गोहर बद्दल लवकरच लिहीन. विक्रम संपत यांनी लिहिलेले तिचे चरित्र माझ्याजवळ आहे. असो. ‘ग्लोरिअस’ गोहार लेखाचा दुसरा भाग आज देत आहे. पहिला भाग येथे पाहता येईल.

मी ‘ पण तुम्ही ह्या छायाचित्रात खूपच glamorous दिसत आहात’ असे म्हटल्यावर, त्यांनी माझे मत ‘non-sense’ असे म्हणून झटकून टाकले.
‘मी साकारलेल्या अनेक पात्रांत मुलगी निष्पाप भोळ्या असत. जया भादुरी सारखेच. मला अभिनय येत नसे. काही काळानंतर सुलोचना इम्पेरिअल स्टुडियो मध्ये गेल्या. साऱ्या चित्रपटसृष्टीत त्यांना जेवढे पैसे मिळत, तेवढे अन्य कोणा तारकेला मिळाले नाहीत. महिन्याला एक हजार रुपयांहून अधिक. मुंबईच्या गव्हर्नरला देखील त्या काळी इतके पैसे मिळत नसत, अशी अफवा होती. मी देखील रणजीत फिल्म्स स्टुडियो मध्ये शिरले, त्यांची भागीदार झाले. त्यामुळे माझी गोष्ट वेगळीच झाली’

‘मी कुठल्याच चित्रपटात मुख्य भुमिके व्यतिरिक्त, नायिके व्यतिरिक्त इतर भूमिका केल्या नाही. एकच अपवाद म्हणजे Typist Girl(१९२६). सुलोचना त्या चित्रपटात नायिका होती. दिग्दर्शक चंदुलाल शहा यांनी मला एक छोटीशी भूमिका त्यात करण्यास विनवले. त्या चित्रपटात माझा नवरा हा दारुडा असतो, आणि दारूच्या नशेत तो माझ्या लहान मुलाला खिडकी बाहेर फेकतो असे अवघड दृश्य होते. चित्रपट खूपच गाजला. ते दृश्य सुद्धा लोकांना खूप आवडला होते.’

त्यानंतर मी विचारले ,’चंदुलाल शहा यांच्या बरोबर तुमचे काम कधी सुरु झाले?’

‘एक अपघात त्यासाठी कारण झाले. चंदुलाल हे कोहिनूर मध्ये होमी मास्टर यांचे सहदिग्दर्शक म्हणून काम करत होते. होमी मास्टर त्या वेळी शिरीन-फरहाद नावाचा चित्रपट बनवत होते. मी शिरीनची भूमिका करत होते, तर खलील हे फरहादची भूमिका करत होते. सुरुवातीच्या काही मूकपटातून आमच्या दोघांची जोडी बऱ्याचदा असे. एका दृश्यात दोन राक्षस शिरीनला डोंगरावरून खाली नेत आहेत असे होते. होमी मास्टर मला हे दृश्य समजावत असता, ते स्वतः पाय घसरून खाली पडले, आणि त्यांचा पाय मोडला. त्या काळात चित्रपट चित्रीकरण पंधरा ते वीस दिवसात संपवायचे असे होते. जास्तीत जास्त एखादा महिना चाले. त्या मुळे चंदुलाल शाह हे दिग्दर्शक झाले. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. त्या वेळेपासून माझे सगळे चित्रपट त्यांनीच दिग्दर्शित केले आहेत.’

भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील अत्यंत दैदिप्यमान आणि दीर्घकालीन साहचर्य त्या दिवशी सुरु झाले असे म्हणता येईल. गोहार १९३६ मध्ये निवृत्त होई पर्यंत चंदुलाल दिग्दर्शक, आणि गोहार तारका म्हणून अविरत कार्यरत राहिले. पुढील तीस वर्षे देखील त्यांच्यातील साहचर्य, व्यावसायिक भागीदारी, तेवढेच फलप्रद ठरले.

चंदुलाल शाह कोहिनूर सोडून जगदीश फिल्म्स मध्ये गेल्यानंतर, गोहार, राजा स्यान्डो, आणि छायाचित्रकार पांडुरंग नायक(‘त्यांचे काम पहिले आहे का? अतिशय गुणी कलाकार आहेत’), त्यांच्याबरोबर तिकडे गेले. पुढे चंदुलाल आणि जगदीश यांच्यात काही कारणाने बेबनाव झाल्यामुळे, चंदुलाल आणि गोहारा दोघांनी मिळून स्वतःची कंपनी सुरु केली, तिचे नाव रणजीत फिल्म्स स्टुडियो.

त्यांची भागीदारी अतिशय यशस्वी झाली(‘अर्थात त्यात आम्ही बरेच चढ उतार पाहिले’), हे लक्षात येण्यासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे. चंदुलाल यांनी गोहर साठी एक चांदीची प्रतिकृती असलेली एक इमारत जिचे नाव Dreamlandभेट म्हणून दिली. त्यात दिव्यांचे खांब होते, अंगण होते, एक विद्युत्चालीत उद्वाहक देखील होते.

आता तो चांदीचे महाल अस्तित्वात नाही. पण गोहार यांनी मला तो महाल करणाऱ्याने एक पुस्तिका तयार केली होती, ती दाखवली. त्यात असे म्हटले होते कि, चंदुलाल यांनी भारतातील राजा-महाराजांचे अनुकरण करून तसा तो महाल तयार करवून घेतला असेल.

पण मला जाणून घ्यायचे होते ते म्हणजे रणजीत फिल्म्स स्टुडियोची सुरुवात कशी झाली.
‘मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हते. ती संपूर्णपणे चंदुलाल यांची कल्पना होती. ते असामान्य होते, अनेक गोष्टीत ते पारंगत होते-व्यवहार कुशल, तंत्रज्ञ, कलाकार, लेखक देखील होते. त्यांनी मास्टर विठ्ठलदास यांच्या कडून कर्ज काढले होते. मी जास्तीचे बोलले कि काय!’ असे म्हणून, त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. ‘तुमची पहा, पन्नास हजार रुपये! १९२७ मध्ये खूप मोठी रक्कम होती ती. कर्ज काढताना मास्टर विठ्ठलदास यांनी एक अट घातली होती. मी त्यात भागीदार व्हावे अशी ती अट होती. मला माहित नाही त्यांनी मला भागीदार करून घेण्यास चंदुलाल यांना का सुचवले ते. त्या प्रमाणे मी भागीदार झाले. नंतर आम्ही ‘पती-पत्नी’ या नावाचा चित्रपट सुरु केला. एखाद दुसरे दृश्य वगळता सारा चित्रपट चंदुलाल यांच्या बहिणीच्या घरी चित्रित झाला होता. त्या चित्रपटाने खूप यश कमावले. त्यातून मिळालेल्या कमाई मुले आमचे कर्ज देखील फेडता आले. अशा तऱ्हेने रणजीत स्टुडियो सुरु झाला होता.’

रणजीत स्टुडियोचे मानचिन्ह म्हणजे पाळणारा घोडा. त्या मागे देखील एखादी रोचक कथा असेल अशी माझी अटकळ होती. पण ते तसे काही नव्हते. चंदुलाल मुळचे जामनगरचे. जामनगर हे संस्थान होते, तेथील महाराजांना चंदुलाल यांच्या कामात रस होता. त्या संबंधाची आणि पाळणारा घोडा मानचिन्ह असण्याचा काही तरी संबंध असावा. गोहरना देखील विशेष माहिती नव्हते.

‘आम्ही १९२७ मध्ये एका stage ने स्टुडियो सुरु केला होता. पण लवकरच पसारा मोठा होत गेला. चार stage झाले आमच्याकडे. त्यातील दोन stage सध्या रूपतारा स्टुडियो मध्ये आहेत. कधी पाहावे तेव्हा तीन stage वर कायम काहीना काही काम सुरु असे. चंदुलाल यांनी जयंत देसाई आणि नंदलाल जसवंतलाल यांना आपल्या हाताखाली तयार केले होते, त्या मुले पसारा वाढताना त्यांची खूपच मदत झाली.’

‘त्या stage वर छत नव्हते त्या वेळी. सगळे मोकळे. कारण सुर्प्रकाशाविना चित्रीकरण साध्य नसे. पडदे, reflector, वापरून सूर्यप्रकाश हवा तसा वळवून, stage वरील प्रकाशयोजना होत असे. तुम्ही जुन्या स्टुडियोत कसे काम चालते ते पहिले असेल ना. बराच पसारा असे.’

‘स्टुडियोचे कामकाज चंदुलाल यांचे बंधू दयाराम शाह हे पाहत. सहाशे कर्मचारी काम करत असत. तंत्रज्ञ, नट, नट्या, एक्स्ट्रा, आणि इतर कामगार मंडळी. हे सर्व लोकं दररोज काम असो नसो, स्टुडियो मध्ये येत असत, यावे लागत असे, इतर कार्यालयात जसे कामगारांना जावे लागते तसे.’

‘रणजीत स्टुडियो मध्ये दोन प्रकारचे चित्रपट तयार होत असत. एक तर सामाजिक आणि दुसरे stunt चित्रपट. त्या दोन्ही चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग अगदी भिन्न होता. सामाजिक चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना stunt चित्रपट पाहणे हिणकस वाटे. बजेट २५ हजार रुपयांपासून ते ६० हजार रुपयांपर्यंत असे. Stunt चित्रपटांचे बजेट थोडे जास्ती आहे. याचे कारण राजपुत्र, राजपुत्री यांची वेशभूषा, मोठमोठाले नेपथ्य, घोडे, doubles, काही दृश्ये चित्रित करण्यासाठी दोन दोन कॅमेरे लागत असत.’

‘सामाजिक चित्रपटांसाठी चांगली कथा मुख्य असे. आपल्या समाजात एखादी सर्वगुणसंपन्न अशी कोणी असते, तरीही पती वेगळी वाकडी वाट करतो, या सारख्या कथा तेथे चालत. आजकाल नवऱ्याला वाकडी वाट धरायला जाही कारण लागतेच असे नाही…’

‘एक चित्रपट केला होता, ज्याचे नाव, गुणसुंदरी . त्यात एका सरळमार्गी गृहिणीची कथा आहे. तिच्या पतीने पाश्चिमात्य संस्कृती अंगिकारली आहे. पत्नीने देखील सामाजिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या मागे राहिले नाही पाहिजे असे त्याला वाटत असते. पत्नीला त्यात विशेष रस नसतो. त्यामुळे पती बाहेरख्याली करायला लागतो. मग पत्नी त्याला धडा शिकवायचा असा निर्धार करते आणि ती सुद्धा पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारून आपल्यात बदल घडवते. मग बरेच काही पाणी वाहून गेल्यावर, मेलोड्रामा झाल्यावर, ते दोघे परत एकत्र येतात. १९२५-२६ मध्ये कोहिनूर साठी केलेला हा चित्रपट बराच यशस्वी झाला होता. १९३४ मध्ये हिंदी गुजराती मध्ये रिमेक झाला. नंतर निरूप रॉय बरोबर या चित्रपटची तिसरी आवृत्ती देखील नंतर आली. हे दोन्ही चित्रपट तेवढेच यशस्वी ठरले. या प्रकारचे कथानक नंतरच्या कित्येक चित्रपटांतून आलेले आहे हे वेगळे सांगायला नको. पण माझ्या गुणसुंदरी चित्रपटात ते पहिल्यांदा त्या प्रकारचे कथानक आले.’

चित्रपटाला आवाज मिळाल्यानंतर, समस्या वाढल्या का, असे विचारातच, ‘नक्कीच’! असे त्या म्हणाल्या, आणि हसल्या. ‘कावळ्यांची कटकट वाढली. दृश्ये पुन्हा पुन्हा चित्रित करावी लागली. एवढेच, विशेष काही नाही. बोलपट तंत्रज्ञान येणार याची अटकळ आम्हाला लागली होती. त्या दृष्टीने आमची तयारी देखील सुरु झाली होती. आमच्या तंत्रज्ञांनी ते चटकन आत्मसात केले. अभिनेत्यांना थोडासा त्रास झाला. आम्ही रणजीत फिल्म्स हे नाव टाकून देवून रणजीत मुव्हीटोन्स असे नवीन धारण केले.’

‘पहिला बोलपट देवी देवयानी हा होता, जो कच आणि देवयानी यांच्या पौराणिक कथेवर आधारित होता. त्यावेळी आमचा अभिनय, संवादशैली हि नाटकांच्या प्रमाणे होती. या चित्रपटाला संवाद अघा हशर काश्मिरी या नाटककाराने लिहिले होते. भाषा खूपच अलंकारिक होती, आणि वाक्यागणिक शायरी(काव्य) येत असे. मग आम्ही कज्जनबाई आणि निस्सार सारख्या रंगभूमी कलाकारांना बोलावले. नायकाचे वय ६५-७० च्या आसपास, मी वयाची विशी ओलांडली होती. नायक हा नाटक कंपनीत नाटकं करणारा प्रसिद्ध नट भगवानदास होता. चित्रपटात खूप गाणी होती. त्यामुळे मी खुश झाले. मला गायांची खूप आवड होती. मी काही संगीत, नृत्य शिकले नव्हते.’

‘चित्रीकरण करताना जवळच संगीत वाद्ये असल्यामुळे, जसे तबला, हार्मोनियम, सारंगी, आणि या सर्वांना तसेच गायकाला मिळून एकच माईक असल्यामुळे , चित्रपटातील गाणी हि mid-shot मध्ये करावी लागत असत’.

‘अश्या कृत्रिम अभिनयाचे, नाटकी, जोरकस शैली असलेला अभिनय एक दोन बोलपटापुरता होता. पुढे वास्तववादी शैली चित्रपटात असायला हवी असे आमच्या लक्षात आले’

‘बोलपट आल्यामुळे अभिनेत्यांना मार बसला. मी सुदैवी होते-मला उर्दू येत असे. मी लहान असताना मला एक मुल्ला घरी येत असत आणि कुराण शरीफ शिकवत असत. फारसी भाषा देखील थोडीफार येत असे. माधुरी काळाच्या पडद्याआड गेली. सुलोचनाचे देखील तेच झाले. मी आणि सुलोचना दोघी मैत्रिणी होतो. मी सुलोचनाला सारखी सांगत असे. माधुरी Anglo-Indian होती. तो घरी इंग्रजी बोलत असे. माझी मातृभाषा हिंदुस्तानी. तिने का स्वतःला बदलले नाही, कळले नाही. तिला आवश्यक वाटले नसावे. असो, खूपच दुर्दैवी होते ते सगळे.’

(क्रमशः)

Glorious Gohar

मिस गोहार नावाची अगदी जुन्या काळात एक अभिनेत्री होती. तिचे पूर्ण नाव गोहार माम्माजीवाला. भारतीय संगीत आणि नाट्य क्षेत्रात अजून दोन गोहार होऊन गेल्या आहेत. त्यातील एक गोहार जान , जी शास्त्रीय संगीत गाणारी गायिका होती आणि दुसरी गोहराबाई कर्नाटकी, जी नाट्य क्षेत्रात कार्यरत होती. या मिस गोहार बद्दल गिरीश कर्नाड एक लेख लिहून गेले आहेत. त्यांच्या आगोम्मे ईगोम्मे या कन्नड पुस्तकात तो आहे. त्याचे मराठीत मी भाषांतर करत आहे. हा लेख काही भागात ब्लॉगवर आपल्या साठी देत आहे. दोन गोहार बद्दल लिहून झाले आहे. तिसऱ्या गोहर बद्दल लवकरच लिहीन. विक्रम संपत यांनी लिहिले तिचे चरित्र माझ्याजवळ आहे. असो. ‘ग्लोरिअस’ गोहार लेखाचा पहिला भाग आज देत आहे.

‘ग्लोरिअस’ गोहार

मुंबईत रॉक्सी चित्रपटगृहाशेजारी एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी उभी राहिलेली एक इमारत आहे, जिचे नाव Dreamland आहे. त्यात चवथ्या मजल्यावर एक अलिशान घर आहे. दिवाणखान्यातील वस्तू ह्या १९२०च्या काळातील अलिशान शैली असलेल्या आहेत हे दिसते आहे. लाल रंगांच्या मऊ मऊ गुबगुबीत सोफा. भिंतीवर विक्टोरियन युगाच्या उत्तरार्धातील एक चित्र लटकलेले आहे. ते प्राचीन ग्रीक वादक Orpheusआपल्या संगीताने सारे जंगल मंत्रमुग्ध करत आहे असे चित्रित केले आहे. रणजीत स्टुडियो मधील एका कलाकाराने ते चित्र काढले आहे. कोपऱ्यातल्या एका मेजावर रणजीत यांचे एक शिल्प आहे. खिंकळणारा घोडा, फडकत असलेला रुमाल, . रणजीत स्टुडियोने निर्मित केलेला १०० वा चित्रपटाचे ते स्मृतिशिल्प होते. जवळच असलेल्या एका वहीत त्या सगळ्या १०० चित्रपटांची नावे होती.

गोहार दिवाणखान्यात येताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास ओसंडून वाहत होता, त्यात घराच्या आलिशानतेची सावली होती. विशेष अशी उंची नसलेली, साधारण स्थूलतेकडे झुकलेली शरीरयष्टी त्यांची होती. गोल गुबगुबीत चेहरा. खालील ओठ थोडासा पुढे आलेला . त्या आरामात येऊन बसल्या. मुलाखती दरम्यान पुढील दीडतास त्या तश्याच न हलता बसून होत्या. बोलताना येणारे चैतन्यपूर्ण हास्य, आणि काही तरी सांगताना डावा हात हवेत फिरवण्याव्यतिरिक्त त्याची कशीच हालचाल नव्हती. मी जमिनीवर एक पाय रोवून त्यांचे ऐकत बसलो असता, त्या जवळ येऊन पाठीमागे हात बांधून दोन्ही पाय विलग करून उभ्या राहिल्या, तेव्हा त्यांची ती चर्या, मला नेपोलियनची आठवण करून दिली.

त्यांचे बोलणे सहज प्रवाही, झऱ्याच्या वाहत्या पाण्यासारखे होते. स्वतःबद्दल बोलताना, त्या स्वतःवरच विनोद करत, त्या बोलत होत्या. त्यांच्या देहबोलीतून अभिमान, आत्मविश्वास दिसत होता, तर बोलताना त्यांच्या खट्याळ स्मित आणि हास्यामध्ये एक विचित्र विरोधाभास दिसत होता. मी ‘तुमचे घर खूपच छान आहे ‘असे म्हणताच, ‘ओह, जुने होत चालले आहे’, असे म्हणत त्यांनी ते सहज झटकून टाकले. अभिनेत्री म्हणून त्यांचे सुरुवातीचे दिवस कसे होते, असे विचारताच, ‘मी खूप वाईट नटी होते’ असे त्या म्हणाल्या. छायाचित्रे काढणाऱ्या छायाचित्रकाराकडे बघून त्या म्हणाल्या, ‘तुम्ही तुमच्या फिल्म्स वाया घालवत आहात’. पण हे अशे बोलणे फक्त त्यांच्या स्वतःविषयी असेल तरच! दुसऱ्यांविषयी बोलताना मात्र त्या गंभीरपणे बोलत. डोळ्यांच्या पापण्या न हलवता बोलणे, तसेच त्यांच्या आवाजात आणि देहबोलीत दिसणारा आत्मविश्वास, या दोन्ही गोष्टी त्यांचे मुळ व्यक्तिमत्व उभारत होते. ‘ग्लोरिअस’ गोहार होऊन चित्रपटसृष्टीच्या त्या मोठ्या तारका झाल्या होत्या, तसेच, ‘मिस जी. के. मामाजीवाला’ ह्या नावाने सुमारे पन्नास वर्षे चित्रपट व्यवसायात त्यांचे असलेले प्रभुत्व या सगळ्यात त्यांची चाणाक्ष बुद्धीचे दर्शन घडत होते.

(दीडतासाच्या मुलाखतीच्या दरम्यान त्यांचा संयम एकदा ढळला. मी विचारले, ‘तुमची आई नर्तकी होती असे मी ऐकले आहे’. गोहार यांचा पारा चढला लगेच, आणि लगेच त्या म्हणाल्या, ‘मला त्याबद्दल बिलकुल बोलायचे नाही. I don’t want it mentioned’. मी त्याबद्दल लिहिणार नाही असे म्हणताच त्यांचा पारा उतरला आणि पूर्ववत झाल्या. हि गोष्ट मी Cinema Vision मध्ये छापलेल्या मुलाखतीत मी नमूद केलेली नाही).

‘तुम्हाला काय विचारायचे आहे?’ त्यांनी सुरवातीला प्रश्न केला. ‘मी आधीच कित्येक मुलाखती दिल्या आहेत. तेच तेच सांगण्यात काय अर्थ आहे?’
तसे असेल तर त्यांनी आपले आत्मचरित्र का बरे लिहिले नाही. भारतीय चित्रपट इतिहासाच्या अभ्यासकांना ते मूल्यवान संदर्भ वाटेल, असे मी म्हणालो.
‘काही वर्षांपूर्वी तसा विचार केला होता, ते खरे आहे. पण तोपर्यंत बऱ्याच गोष्टी विस्मृतीत गेल्या होत्या. मी आधीपासूनच लिहित आले असते तर बरे झाले असते. त्या वेळी किती उपद्व्याप होते, त्यामुळे रोजनिशी ठेवू शकले नाही’
‘अजून एक समस्या अशी आहे कि, चित्रपटांना आवाज प्राप्त झाल्यावर एक दोन वर्षात रणजीत स्टुडियोला आग लागली. आमची आधीच्या अनेक चित्रपटांच्या फिल्म्स, अनेक वस्तू, सर्व काही आगीत भस्म झाले. ‘

त्यांनी असे म्हटल्यावर, मी माझ्या मुलाखतीची सुरवात प्राथमिक प्रश्नानेच केली. त्या अभिनय क्षेत्राकडे वळल्या कश्या?

‘माझ्या आई वडिलांच्या मनात मी ह्या क्षेत्रात यावे असे काहीच नव्हते. मला खरेतर डॉक्टर व्हायचे होते. पण मी matrick मध्ये असताना माझ्या वडिलांचे एक मित्र एक ऑफर घेऊन आले. मी आनंदाने नाचू लागले. महिन्याला तीनशे रुपये पगार त्या वेळेस खूप होता. चित्रपटाचे नाव होते बाप कमी अर्थात Fortune and Fools. त्यावेळेस मूकपट दोन दोन नावाने प्रदर्शित होत असत. इंग्रजीत एक आणि गुजराती किंवा हिंदी मधील एक नाव. मीच चित्रपटाची नायिका होते. त्यामुळे पुढे आणखीन एक दोन चित्रपटात काम मिळाले. पण मला यश असे म्हणता येईल ते लंका नि लाडी अर्थात The Bride from Ceylon या चित्रपटामुळे. तो चित्रपट करताना सुरुवातीलाच एक गमतीशीर घटना घडली.’

‘कोहिनूरची निर्मिती असलेला तो चित्रपट होमी मास्टर यांनी दिग्दर्शित केला होता. त्यांनीच मला नायिकेची भूमिका दिली. पण कथा होती ती मोहनलाल दावे यांची. त्या काळातील ते सलीम जावेद होते असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या परवानगीशिवाय नट नटी यांची निवड करू नये असा त्यांचा हट्ट होते. त्यांना माझी झालेली निवड रुचली नव्हती. पण होमी मास्टर यांनी मला त्या दिवशी यायला सांगितले होते. मी घरून मुहूर्तासाठी प्रसाद तयार करून घेऊन गेले. कॅमेराच्या पुढे गेले. तेथे मोहनलाल मला पाहून लांब गेले आणि येरझाऱ्या घालू लागले. माझ्याबद्दलचे त्यांचे मत मला माहित होते. त्यामुळे मी अतिशय तणावाखाली होते. मी एका दुर्बल अश्या मुलीची पात्र करत होते. पहिल्याचा शॉट मध्ये माझ्या रडण्याचे दृश्य होते. मला आधीच रडवेले झाले होते. कॅमेरा सुरु झाला आणि मला खरेखरेच रडू सुरु झाले, रडू दाबून ठेऊ शकलेच नाही. सगळ्यांनी माझी खूप प्रशंसा केली. हाच माझ्या कारकिर्दीचा शुभारंभ झाला असे म्हणूयात! ‘

त्यांनी जसे सुरुवातीलाच साली जावेद यांच्या नावाचा उल्लेख केला, तसेच, साऱ्या मुलाखतीत ते आजकालच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांचा उल्लेख त्या करत जातात. त्यामुळे मी त्यांना ‘तुम्ही आजकालचे चित्रपट पाहता का?’ असे विचारणार होतो. पण तो प्रश्न सोडून द्यावा लागला, याचे कारण उघड आहे, त्यांना आजकालच्या चित्रपटसृष्टीबद्दल माहिती नक्कीच आहे.

‘आजकालचे नट नट्या अतिशय कष्ट करत आहेत. दिवसाला तीन तीन शिफ्ट करून देखील किती चांगले काम करत असतात! आम्ही आमच्या काळात इतके कष्ट घेतले नाही. मी तेवढी polished देखील नव्हते. आमचा अभिनय अतिरंजित अश्या प्रकारची होती. आजच्या अभिनेत्रींना चांगल्या कुटुंबाची घराची पार्श्वभूमी असल्यामुळे, त्या सुशिक्षित आहेत. आमच्याजवळ त्यावेळी बहुतेक अधिक शिस्त होती असे म्हणता येईल. आम्ही ज्या स्टुडियोत पगारी नोकरदार असू त्या स्टुडियोशी आमची बांधिलकी असे. आजचे कलाकार अधिक कष्ट करत आहेत हे मात्र नक्कीच सत्य आहे. राजेश खन्ना किंवा अमिताभ बच्चन एवढ्या उंचीवर जाऊन सुद्धा किती प्रामाणिकपणे काम करत आहेत.’

आम्ही परत त्यांच्या कारकिर्दीच्या वाटचालीबद्दल बोलू लागलो. ‘लंका नि लाडी’ झाल्यावर मी कोहिनूरचे काही चित्रपट केले. कोहिनूर स्टुडियो मूकपट काळातील महत्वाचा स्टुडियो होता. त्यांच्या कडे मोहनलाल भवनानी सारखे दिग्दर्शक होते. मूकपट काळातील ते प्रसिद्ध दिग्दर्शक होते, तसेच अतिशय चांगली व्यक्ती होती. एस मोदी, जमुना, गुलाब,अर्माल्येन यासारख्या तारका होत्या. पण काही काळात मी आणि सुलोचना top star झालो. तिच्या आणि माझ्या चित्रपटातील पात्रांत बराच फरक असे. त्या लावण्यवती होत्या. माझे रूप सामान्य होते.’

(क्रमशः)

Apu Trilogy

सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांनी दिग्दर्शित केलेल्या तीन चित्रपटांना(पथेर पांचाली, अपराजितो आणि अपूर संसार) एकत्रित पणे Apu Trilogy(अपुत्रयी) असे संबोधले जाते. हे तिन्ही चित्रपट भारतीय चित्रपट इतिहासात मैलाचा दगड होऊन बसले आहेत. गेल्या आठवड्यात हे चित्रपट पाहायला मिळाले. त्याबद्दल आज लिहायचे आहे.

ह्या पूर्वी मी सत्यजित राय यांचे चित्रपट एक-दोन अपवाद सोडल्यास तसे पाहिले नव्हते. एक तर त्यांनी मुख्यतः बंगाली भाषेत चित्रपट केले. खूप पूर्वी दूरदर्शन वर त्यांचा शतरंज के खिलाडी हा हिंदी चित्रपट पहिला होता.

हे तिन्ही बंगाली चित्रपट विभूतिभूषण बंडोपाध्याय यांच्या प्रसिद्ध बंगाली दोन कादंबऱ्यावरून सत्यजित राय यांनी तयार केले. पथेर पांचाली हा तर त्यांचा पहिलाच चित्रपट. १९५५ मध्ये प्रदर्शित झाला. फ्रांस मधील कान (Cannes)चित्रपट महोत्सवात त्याला पुरस्कार मिळाला. ह्या चित्रपटाला The Best Human Document असे संबोधले गेले. ते अतिशय खरे आहे. नववास्तववाद या पठडीतील हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व काळातील बंगाली खेड्यातील जीवनाचे रम्य चित्रण , एखादा माहितीपट करावा या पद्धतीने केले आहे. खेड्यातील भिक्षुकीवर जगण्याऱ्या एका कुटुंबाची हि कहाणी आहे. वडिलोपार्जित मोडके तोडके घर आहे, पण कर्जामुळे शेतजमीन गमावून बसल्यामुळे घराची परिस्थिती तशी वाईट आहे. नवरा बायको मुलगी आणि अपु नावाचा मुलगा, आणि त्याची अतिशय म्हातारी आजी असे हे कुटुंब. तिन्ही चित्रपट ह्या अपुच्या भावविश्वाभोवती फिरतात त्यामुळे अपुत्रयी असे नामकरण. स्वातंत्र्यपूर्व काळातील सामान्य भारतीय जनता कोणत्या प्रश्नांचा सामना करत होती, जगण्याचे निरनिराळे पेच कसे सोडवत होती, कौटुंबिक आणि सामाजिक अनुबंध कसे होते, याचे चित्रण या अपुत्रयी मधून घडते.

Image Courtesy: Internet

पथेर पांचाली मध्ये आजी आणि त्याची मोठी बहिण यांचे निधन होते, आणि कुटुंब बनारसला घर सोडून निघून येते. अपराजितो मध्ये कुटुंबप्रमुख हरी मरण पावतो, अपु शाळेत जाऊ लागतो, तसेच पुढे कोलकाता येथे जाऊन पुढील शिक्षण देखील घ्यायला सुरुवात करतो, आणि इकडे त्याची आई आपल्या गावी एकटी झुरून मरण पावते. तिसऱ्या चित्रपटात अपूचा विवाह होतो, त्यांच्या पत्नीचा अपर्णाचा पहिल्याच बाळंतपणात अकाली मृत्यू होतो, आणि अपु आणि त्यांचा मुलगा हे पुढे जीवनाची मार्गक्रमणा सुरु ठेवतात. असा हा काळाचा एक मोठा पट, जो कादंबरीत सलग अनुभवता येतो, तसाच तो येथे देखील अनुभवता येतो. पांचाली म्हणजे बंगाली गाण्याचा एक प्रकार, जसे बाउल हा गायनप्रकार आहे तसा. अपूर संसार ह्या चित्रपटात एक आज सहज मान्य न होण्यासारखी गोष्ट अशी आहे कि अपु मित्राबरोबर त्याच्या गावी बहिणीच्या लग्नसमारंभात जातो, पण नवरदेव हा मानसिक रुग्ण आहे शेवटच्या क्षणी समजल्याने, आणि हा विवाह झाला नाही तर प्रश्न निर्माण होतील याकरिता, अपुला नवरदेव म्हणून उभे करतात आणि अचानकपणे तो विवाहबंधनात अडकतो. शंभर एक वर्षांपूर्वी भारतीय समाजात आहे होत असावे , पण हि घटना आज चित्रपटात पाहताना का कोणास ठाऊक पटत नाही.

सत्यजित राय यांनी पथेर पांचाली १९५०च्या आसपास तयार करायला सुरुवात होईपर्यंत भारतात चित्रपट हे माध्यम सुरु होऊन ४० वर्षे होत आलेली होती. नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. दोन महायुद्धे होऊन गेलेली आहेत. जगात चित्रपट मध्यम हे कलाविष्काराचे माध्यम म्हणून अनेकजण वापरू लागले होते. सत्यजित राय यांची जडण घडण देखील याच काळात आणि पार्श्वभूमीवर होत गेली. त्यांच्यावर अनेकांचे संस्कार होत गेले, पाश्चिमात्य देशात चित्रपट हे अविष्काराचे माध्यम म्हणून वापरले गेलेले त्यांनी अनुभवलेले होते. भारतात चित्रपट माध्यमाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात, मुंबईत झाली (दादासाहेब फाळके ह्यांच्या रूपाने) आणि भारतात चित्रपट हे कलाविष्काराचे मध्यम हे पश्चिम बंगालात सुरु झाले, आणि ते सत्यजित राय यांचा रूपाने. ह्या त्यांच्या कलाकृतींमुळे भारतीय चित्रपटांना वेगळी ओळख आणि उंची प्रदान करून दिली.

Image Courtesy: Internet

सत्यजित राय ह्यांनी त्यांच्या मेरी सेटन लिखित चरित्रात म्हटले आहे कि My films speak for what I stand for. They are all concerned with the new versus old. नवे आणि जुने म्हणजे आधुनिकता/नवता/प्रगती, आणि जुने म्हणजे परंपरा यांचे द्वंद. त्याची प्रचीती ह्या तिन्ही चित्रपटातून येते. चित्रपटात काळ जसा जसा बदलत जातो , तसे तपशील बदलत जातात. पहिल्या चित्रपटात बायोस्कोपवाला गावागावातून फिरताना दाखवला आहे, रस्ते असे नाहीतच, नुसत्या पायवाटा, गावातून नुकतीच सुरु झालेली रेल्वे , ती एक दोनदा दिसते. गावातील संथ जीवन , कादंबरीतील निवेदनाप्रमाणे दाखवलेले आहे. दुसऱ्या चित्रपटात कुटुंबप्रमुखाची अर्थार्जन करण्याचे क्षेत्र बदललेले आहे. बनारस येथे तो धार्मिक कार्य करण्याचे काम करतो आहे, आजारी पडल्यावर डॉक्टर दिसतो,. तिसरा चित्रपट तर कोलकात्यासारख्या शहरातच घडतो. अपुचे घर हेच रेल्वे स्टेशनजवळ असते त्यामुळे रेल्वे रूळांचा खडखडाट, रेल्वेच्या शिटीचा आसमंत चिरून जाणारा आवाज, हॉटेल, ट्राम, घरातील विजेवरील दिवे इत्यादी सर्व बदल चित्रपट अगदी तपशिलाने टिपतो आणि दाखवतो.

सत्यजित राय यांची परवा दोन मे पासून जन्मशताब्दी सुरु झाली. सत्यजित राय आणि त्यांचे हे तीन चित्रपट यांच्याबद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांनी बनवलेले इतरही अनेक चित्रपट वेळ काढून पाहायाचे आहेत आणि त्याबद्दल लिहायचे देखील आहे. एक दोन वर्षांपूर्वी त्यांच्या संगीतक्षेत्रातील कामगिरीवर एक माहितीपट पहिला होता, त्याबद्दल मी लिहिले होते, ते जरूर वाचा.

अशोक राणे: एक चित्रपटमय माणूस

मी पाहिलेल्या आणि मला भावलेल्या चित्रपटांच्या विषयी मी अनियमितपणे माझ्या ब्लॉग वर लिहित असतो. अर्थात ते परिचयात्मक किंवा आस्वादक स्वरूपाचे असते, समीक्षात्मक वगैरे असे ते नसते. २०१७ मध्ये चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमात मी भाग घेतला होता. तेव्हा पासून अशोक राणे हे नाव चित्रपट माध्यमाचे अभ्यासक म्हणून प्रकर्षाने माझ्या समोर येऊ लागले. ते जगभरातील चित्रपट महोत्सवातून ज्युरी म्हणून अधिक जास्त प्रसिद्ध आहेत हे देखील समजले होते. चित्रपट कलेविषयी आणि इतर तत्सम विषयक नव्या जुन्या पुस्तकांचा देखील हळू हळू परिचय होऊ लागला. त्यातूनच गेल्या महिन्यात अशोक राणे यांचे आत्मकथन असलेले चांगले जाडजूड पुस्तक हाती लागले.

गोव्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांच्या ह्या पुस्तकाला विशेष पुरस्कार देण्यात आल्याचे वाचले. त्यामुळे थोडासा हा पुस्तक परिचयाचा उद्योग. हे पुस्तक तसे रूढार्थाने आत्मचरित्र नव्हे, पण त्यांनी विविध ठिकाणी लिहिलेल्या नव्वद लेखांचा संग्रह आहे. अतिशय वाचनीय असलेले हे पुस्तक कुठूनही वाचता येते. त्यात त्यांनी स्वतःच्या चित्रपट पाहण्याच्या अनावर ओढिबद्द्ल, झपाटलेपणा बद्दल आणि त्याबद्दल बोलण्याच्या, लिहिण्याच्या मानसिकतेबद्दल अगदी भरभरून, हाताचे काही न राखता सांगितले आहे.

सुरुवात अर्थात त्यांच्या बालपणीपासून आहे. मुंबईतील, कामगार वस्तीतील त्यांचे जग. त्यावेळेस त्यांच्या चित्रपट पाहण्याच्या असाध्य हौशीचे त्यांनी किस्से सांगितले आहे. एक पडदा चित्रपट गृह, चित्रपटांची दुनिया या बद्दल त्यांनी लिहिलेला एक अनुभव वाचून मला मी सातवी आठवी मध्ये असताना(म्हणजे १९८२) एका मित्राच्या नादी लागून चिंचवड मध्ये असलेल्या जयश्री या एक पडदा चित्रपटगृहात हिरोंका चोर नावाचा तद्दन फालतू चित्रपट चोरून आत घुसून पाहिला होता आणि पकडला गेलो होतो, त्याची आठवण झाली. तो आता युट्यूब वर आहे, इच्छुकांनी जरूर पाहावा.

त्यांच्या ह्या चित्रपट पाहण्याच्या वेडाचे त्यांनी आयुष्याचे श्रेयस आणि प्रेयस ठरवून टाकले. गेली चार दशके ते सातत्याने लेखन करीत आले आहेत. विविध दैनिकांतून त्यांनी चित्रपटसमीक्षा लिहिली आहे, ती मी अधूनमधून वाचलेली आहे. लोकमत मध्ये त्यांनी मोन्ताज नावाची लेख मालिका(साप्ताहिक सदर) वर्षभर चालविली, ज्यात त्यांनी अनेक चित्रपटातील फक्त एखादा प्रसंग निवडून त्याबद्दल त्यांनी लिहिले आहे. पण हे आत्मचरित्रासारखे त्यांचे जाडजूड पुस्तक वाचून चित्रपट क्षेत्रात त्यांनी काय काय केले आहे हे समजल्यावर तोंडात बोट घालावेसे वाटते. काय त्यांची अचाट चित्रपटभक्ती, काय त्यांचे जगभरातील विविध चित्रपट महोत्सवातून फिरणे, आणि काय त्यांचे अफाट लेखन!

आयुष्यात खूप लवकर त्यांचा मुंबईतील फिल्म सोसायटीशी संबंध आला, आणि चित्रपट साक्षरता त्याच्यांत भिनली. फिल्म सोसायटी चळवळीत एक क्रियाशील कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिले. दिनकर गांगल, सुधीर नांदगावकर यांच्या सारख्या कडून त्यांना नेहमी पाठबळ मिळाले. त्यातून त्यांची कारकीर्द वेगळ्या दिशेने घडत गेली. विविध देशांतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून जाण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक व्यापक आणि विशाल असे परिमाण प्राप्त झाले. अनेक दूरचित्रवाणी मालिकांचे पटकथा – संवाद लेखक म्हणून तर त्यांनी नाव मिळविलेच परंतु दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही त्यांनी मुलुखगिरी केली. त्यांच्या नावावर ‘मस्तीभरा है समा’, ‘माय नेम इज अन्थनी गोन्साल्विस’ असे जवळपास सात-आठ माहितीपट आणि ‘कथा तिच्या लग्नाची’सारखा चाकोरीबाहेरचा चित्रपटही जमा आहे. ह्या सर्व प्रवासाबद्दल त्यांनी पुस्तकात लिहिले आहे.

राणेंनी आपले पुस्तक आंद्रे बाझां, फ्रान्स्वा त्रूफो आणि पॅरिसचे ‘सिनेमाथेक फ्रॉन्से’ हे पहिले चित्रपट-संग्रहालय जिद्दीने स्थापन करणारे आणि त्याचे प्राणपणाने जतन करणारे ऑनरी लाँगलुवा या त्रयीला अर्पण केले आहे. त्यांच्या बद्दलचे लेख ह्या पुस्तकात आहेत, त्यामुळे सामान्य वाचकाला त्यांच्या कामाची ओळख होते. सजगतेने चित्रपट पहात, त्यावर विचार करत त्यांनी या चित्रपट माध्यमाविषयीच्या , त्याच्या भाषेविषयीची जाण घडवत आणली. त्यासोबत याविषयीच्या पुस्तकांचे, नियतकालिकांचे वाचन आणि मनन देखील उपयोगी पडले. लौकिक अर्थाने शिक्षण न घेता, असे शिक्षण घेत घेत त्या विषयात आपले स्थान निर्माण केले.

अशोक राणे यांचा जन्म तसा गुजरातेतील एका कनिष्ठ मध्यमवर्गीय मालवणी कुटुंबात झाला, पण मुंबईत त्यांची जडणघडण झाली. ऐन तारुण्यातच त्यांना चित्रपट पाहण्याची गोडी लागली, ते त्यासाठी सारी मुंबई पालथी घालत. त्यांना खरेतर नाटकांची आणि तसेच वाचनाची देखील आवड निर्माण झाली. जुन्या काळातील एक पडदा चित्रपट गृहात त्यांनी अनेक चित्रपट पहिले, त्यांची काही चित्रपट तिकिटे त्यांनी पुस्तकात छापलेली आहेत. पुढे ‘टाईम्स ऑफ इंडिया’त उपजिविकेसाठी नोकरी करता करता त्यांनी चित्रपट माध्यमाविषयीची आपली आवड पोटतिडिकेने सांभाळली, जपली आणि उत्तरोत्तर वाढवत नेली. समाजात चित्रपटमाध्यमाविषयी एक प्रकारचे चंदेरी आकर्षण तर असतेच, तसेच मराठी पांढरपेशा कुटुंबातून ह्या क्षेत्राविषयी असलेल्या गैर समजुतीमुळे तुच्छता देखील असते. चित्रपटाच्या दुनियेत वावरणारा किंवा त्याच्या नादी लागलेला म्हणजे ‘वाया गेलेला’ असे समीकरण बनले आणि ते वाढत्या वयाच्या तरुण-तरुणींच्या माथी मारले गेले. हे समीकरण कसे चुकीचे आणि पोकळ आहे ते अशोक राणे यांचे ‘सिनेमा पाहणारा माणूस’ नावाचे आत्मकथन वाचून लक्षात येते. कसलेही शिक्षण नसताना, इंग्रजी भाषेचे वावडे असताना, केवळ एखाद्या गोष्टीच्या हव्यासापोटी एक माणूस कसा घडू शकतो त्याचे अशोक राणे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांचे हे लेखन म्हणजे गेल्या पन्नास-साठ वर्षांच्या काळाचे, चित्रपट मध्याचे, त्यातील व्यक्तींचे, घटनांचे दास्ताऐवजीकरण आहे. अश्याच तर्हेचे दुसरे उदाहरण म्हणजे माझा मित्र महेश केतकर(याचे नुकतेच अकाली निधन झाले) याने संगीतकार राहुदेव बर्मन यांच्या संगीताच्या वेडापायी २००० साला पासून वर्षातून दोन आगळे वेगळे कार्यक्रम करण्याच्या उपक्रमाने आज जे स्वरूप धारण केले आहे, त्या मागे देखील असेच झपाटलेपण होते.

अशोक राणेंच्या ह्या पुस्तकात एका लेखातून पंडित जवाहरलाल नेहरूं यांच्या दूरदृष्टीपणावर प्रकाश टाकला आहे. पुण्यात FTII आणि NFAI या चित्रपटविषयक संस्था स्थापण्यात त्यांचा पुढाकार होता. प्रा.सतीश बहादूर जे अलाहाबाद विद्यापीठात शिकवत, तिथे ते १९६०च्या दरम्यान फिल्म सोसायटी चालवत. मारिया सितोन ही परदेशी विदुषी त्यांचं काम आणि ज्ञान पाहून प्रभावित झाली. तिने बहादूर यांची नेहरूंकडे प्रशंसा केली. नेहरूंनी नव्याने सुरू झालेल्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ताबडतोब त्यांची नेमणूक केली. अशोक राणे यांचं ‘सिनेमा पाहणारा माणूस’ हे पुस्तक म्हणजे चित्रपट जगतातील अशा असंख्य आणि विलक्षण गोष्टींचा अक्षरशः खजिना आहे. मी हे पुस्तक आधी वाचनालयातून आणून वाचले होते, पण ते माझ्या संग्रही असावे असे वाटल्याने ते विकत घेतले. हा खजिना तो लुटताना चित्रपटमाध्यमाचं अवघं अंतरंग उलगडतं आणि समृद्ध व्हायला होतं आणि चित्रपट भाषा, चित्रपट मध्यम या बद्दल अनेक विषयांची ओझरते का होईना माहिती हे पुस्तक करून देते. पुस्तकातल्या शेवटच्या लेखात त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे कि, आगामी काळात(म्हणजे वय वर्ष ७५ च्या पुढील काळात) देखील कायम चित्रपटांच्या सोबत राहता यावे, तेही मेरे पास सिनेमा है असे म्हणत!