मी पूर्वी ह्या ब्लॉग मध्ये नोंदवल्याप्रमाणे गतकाळातील प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक अभिनेता गुरुदत्तच्या त्याच्या आईने, वासंती पदुकोण, यांनी लिहिलेले कन्नड भाषेतील चरित्राचा मी मराठीत अनुवाद केला आहे. त्याची क्रमशः प्रसिद्धी या ब्लॉग वर जमेल तसे करतो आहे. एप्रिल महिन्यात गिरीश कार्नाड यांनी लिहिलेली प्रस्तावना प्रसिद्ध केली होती, तर जुलै महिन्यात त्यांचे बंधू आत्माराम यांनी लिहिलेला परिचय प्रसिद्ध केली होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चरित्राचा पहिला भाग प्रसिद्ध केला होता (माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#१) आणि लगेचच दुसरा भागही सदर केला होता(भाग#२). सप्टेंबर महिन्यात मध्ये तिसरा आणि चौथा भाग देखील दिला होता(भाग#३ आणि भाग#४). आज पाचवा भाग देत आहे. काही दिवसातच म्हणजे ऑक्टोबर ९ रोजी गुरुदत्तची पुण्यतिथी आहे. त्यादिवशी सहावा आणि शेवटचा भाग देण्याचा मानस आहे.
मूळ कन्नड पुस्तकात प्रकरणे किंवा भाग नाहीत, पण मी ते ब्लॉगच्या सोयीकरता केले आहेत, ह्याची नोंद घ्यावी.
माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#५
१९५२ च्या मी महिन्यात गुरुदत्तचा विवाह गीता सोबत झाला. गीता रॉय बरोबर गुरुदत्तने तिच्या पैश्यांसाठी तिच्या बरोबर लग्न केले असे टाईम्स ऑफ इंडिया मध्ये अतिशय अवहेलना करणाऱ्या बातम्या त्यावेळी आल्या होत्या. गुरुदत्तला कधीच आर्थिक लोभ नव्हता. असे असते तर तिचे सगळे पैसे घेऊन तिला शोधचिट्ठी देऊ शकला असता. त्याच्या कडे त्याने स्वतः कमवलेले पैसे होते. कोणाचेही देणे त्याने ठेवले नव्हते, तसेच तो परोपकार करण्यासाठी, दानधर्म करण्यासाठी तो नेहमी पैसे खर्च करत असे. त्याबद्दल तो चर्चा देखील करत नसे. हा चित्रपट व्यवसाय असाच आहे, जेथे कायम लोकं आत्मस्तुती करत असतात. गुरुदत्तला ह्या सर्वांमध्ये काहीच रस नसे. तो आणि स्वतःचे काम हेच त्याचे लक्ष होते. त्यामुळे त्याचे सद्गुण कोणाला समजले नाही, त्याचे सुख दुःख तो कधी कोणाला सांगत नसे, त्यामुळे ते कुणाला समजले नाही. पैश्यांची चणचण असेच. पण त्यामुळे हाती घेतलेले काम त्याने कधी सोडले नाही, कधी कोणाकडे जाऊन पैसे मागितले नाहीत. बाज चित्रपटानंतर आरपार चित्रपटासाठी शामा नावाच्या अभिनेत्री नायिका आणि गुरुदत्तने नायक असे काम केले. श्रमजीवी लोकांचे जीवन चित्रित करणारा हा चित्रपट खूप चालला, त्याने त्याला खूप नाव दिले, आणि पैसे देखील दिले. ह्याच दरम्यान घरातील वातावरण बदलल्याने देविदास, विजय हे दोघेही अभ्यासात मागे पडू लागले. देविदासला बोर्डिंग शाळेत पाठवून द्यावे असा सल्ला मी गुरुदत्तला दिला. त्याला ते त्यावेळी शक्य नव्हते तरी त्याने त्याला SSPM मध्ये त्याला पाठवले. आत्माराम आणि नागरत्न ह्यांचा विवाह त्याच सुमारास झाला.
गीता लग्नानंतर पूर्वी सारखी राहिली नाही. तिचा स्वभावच बदलला. लग्नानंतर ते सुखी राहतील असे वाटले होते, पण ती दोघे कायम भांडत असताना दिसत असत. गीता तशी चांगली मुलगी होती. पण का कोणास ठाऊक हे लग्न सुखी होणार नाही अशी मला भीती वाटत राहिली होती. गुरुदत्त माझ्या जवळ होता तेव्हा मी त्याला सूचित केले होते. त्याला देखील कधी कधी तसे वाटत होते कि काय कोणास ठाऊक. पण दिलेल्या शब्द तो कायम पाळत आला होता. तो म्हणत असे, ‘आई, मी काही झाले तरी गीतावर प्रेम करतो. तिच्याशी लग्न करणार असे वचन दिले आहे, ते मी कसे मोडू?’ ते साध्य नाही, नशिबात काय असेल ते होवो, तू उगाच चिंता करू नको.’ त्यानेच असे म्हटल्यानंतर, आणि तो कुटुंबाचा आधार होता, असे असताना मी त्याच्या वर जबरदस्ती कशी करणार? मी केली तरी तो ऐकणारा नाही, असा विचार करून गप्प राहिले.
१९५४ जुलै महिन्यात गुरुदत्तच्या थोरल्या मुलाचा तरुणचा जन्म झाला. त्याच वर्षी मे महिन्यात ललिताला मुलगी झाली होती. गुरुदत्तला स्वतःच्या मुलापेक्षा तिच्याच मुलाचे कौतुक, प्रेम अधिक होते. त्यानेच त्या मुलीला सर्वात प्रथम पाहिले. तिचे त्याने कित्येक छायाचित्रं काढली. कित्येक वर्षानंतर घर परत एकदा लहान मुलांने भरून गेले होते. दोन्ही मुलाचे बारसे करण्याचे ठरले होते. मुलीच्या मुलीचे कल्पना हे नाव ठेवले. गुरुदत्त-गीता ह्यांच्या मुलाचा जन्म झाल्यावर दोघेही आनंदात होते. मुलासाठी त्यांनी एकीला आया म्हणून घरात ठेवले होते. मी अधिककरून मुलीकडेच असे, कारण तिला आया ठेवायचे नव्हते, आणि तिला तशी अनुकुलता देखील नव्हती.
एका वर्षात गीता अनेक वेळेला अतिशय रागाच्या भरात घर सोडून गेली. लग्न झाल्या नंतर देखील तिला पूर्ण स्वातंत्र्य घेतले होते. नवरा असल्या मुळे ती अजून स्वैराचारी झालेली नव्हती. तिने कमावलेले पैसे तिच्याजवळच असत. गुरुदत्त त्यात बिलकुल लक्ष घातले नाही, किंवा कधी काही विचारले नाही. यासर्वांमुळे तिच्या आसपास मित्र मैत्रिणी गोळा झाले होते. ते सर्व एकत्र इकडे तिकडे जात येत असत. तिचा स्वैराचार बळावत चालेला होता. त्याच वेळेस गुरुदत्तने जर तिच्या वर लगाम खेचला असता तर काहीतरी बदललेलं असते असे आता वाटते आहे. तिला तशीच मोकळी ठेवण्याची चूक झाली.
१९५५ मध्ये गुरुदत्त खार मधील १२ व्या रस्त्यावरून १९ व्या रस्त्यावर नवीन मोठेसे घर भाड्याने घेतले आणि तिथे तो राहायला गेला. गुरुदत्तचा स्टुडिओ ताडदेव येथे होता. ह्या वेळेस एखादा हास्यप्रधान चित्रपट करावा या हेतूने मधुबालाला नायिकेचे काम दिले आणि त्याने स्वतः नायकाची भूमिका केली. हा चित्रपट देखील खूप चालला. पैसे देखील मिळू लागले होते. त्याच वेळी त्याच्या मुलाचा, तरुणचा, पहिला वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या आमंत्रणाची पत्रिका ललितानेच तयार केली होती. गुरुदत्त आणि गीता अनेक वेळेला एकत्र मुंबई फिरून आले, लंडन येथे देखील जाऊन आले. माझे यजमान त्याच वर्षी निवृत्त झाले. मी दिल्ली, काश्मीर, जयपूर, हरिद्वार, ऋषिकेश वगैरे ठिकाणे पाहून आले, आणि माझी अनेक दिवसांची इच्छा पूर्ण झाली. माझ्या आईला ललिताच्या घरी ठेवले होते. माझे यजमान देखील दोन्ही मुलांकडे काही दिवस राहायला लागले. मी मुंबई सोडताना अंगात ताप होता. पण मी कोणाला सांगितले नव्हते. मला मुंबईतून काही झाले तरी निघून जायचे होते. आमचा संसार कायमच गरिबीचा होता, कायम पैश्यांची चणचण असे. त्यातच मुलांना मोठे करायचे, त्यांना चांगले व्यक्ती बनवायचे हा ध्यास घेतलेला. असे करत कष्ट झेलीत सासर रथ मी इथपर्यंत ओढला होता. मुलांवर ओझे बनायचे नाही असे देखील ठरवले होते. त्यांनी कोणाला सांभाळायचे? सदा भांडणाऱ्या बायकोला कि उसासे टाकणाऱ्या आई-बापांना. हा अनुभव आम्हालाच आला होता असे नाही, साऱ्या जगताचीच हि कहाणी आहे.
गुरुदत्त माझ्या पासून दूर झाला होता हे जरी खरे असले तरी, तो माझे हवे नको ते पाहत असे. मला कुठे जायचे असेल तर तिथे तो पाठवून द्यायचा. मला फिरायची हौस होती, निसर्ग सौदर्य पाहायचे होते. त्यामुळे दार्जीलिंग, काश्मीर अश्या ठिकाणी फिरून आले. मी त्याच्या खाजगी गोष्टींत, वैवाहिक जीवनात, व्यवहारात मी लक्ष घालत नसे. माझ्या कडून काही त्रास होऊ नये असेच पाहत असे. पण मनातून असेही वाटत होते कि आता दुसऱ्याच्या मर्जीत राहून आपल्याला जगावे लागणार.
गुरुदत्त जरी अंतर्मुखी होता तरी त्याचे मं अगदी निर्मल होते. परनिंदा त्याला सहन होत नसे. त्याचा तो सरळ स्वभावच त्याच्यावर उठला. त्याचे हितशत्रू त्याची खोटी स्तुती करून त्याला फसवत असत. काही झाले तरी परोपकार, गरीब विद्यार्थ्यांना घरी जेवायला बोलावणे, त्यांच्या शिक्षणासाठी पैसे देणे, अश्या गोष्टी तो करतच राहिला, तेही निरपेक्ष भावनेने. आत्माप्रौढी मिरवत नसे. तो काही बोलत नसल्यामुळे, तो अहंकारी आहे असा गैरसमज झाला होता; त्याला कोणी नीट समजावून घेतलेच नाही. पदवीधर नव्हता तरी पण त्याला वाचनाचे वेड होते. शेक्सपिअर, बर्नार्ड शा, इमिली झोला, वूडहाउस, टोलस्टोय, स्टाईनबेक ह्या सारख्या लेखकांच्या साहित्यकृती तो कायम वाचत असे. पारंपारिक धार्मिक गोष्टींमध्ये त्याला रस नसला तरी तो भगवद्गीता, कुरण, बायबल वाचत असे. त्याला जसे समजेल उमजेल तसे तो आपल्या आयुष्यात त्यातील शिकवण आचरणात आणण्याचा प्रयत्न करी. दिवस रात्र तो चित्रपटांचाच विचार करत असे. कुठे तरी शून्यात नजर जाई, समोर कोण आहे नाही हे देखील त्याला बऱ्याचदा समाजात नसे. गीताचा स्वभाव ह्याचा विरुद्ध होता. ती कायम तिच्या मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात असे. कुठल्यातरी मृगजळाच्या मागे ती असे. स्वतःच्या सुखापुढे तिला दुसरे काही दिसत नव्हते. देवाच्या देणगीमुळे तिच्याकडे अतिशय चांगला गळा होता. पार्श्वगायनात लता मंगेशकरनंतर हिचेच नाव होते. पण तिचे नशीब नव्हते. ती स्वभावाने थोडी फटकळ झाली होती, मृदू अंतःकरण तिच्या जवळ नव्हते. चकचकीतपणा, लोकांचे गोड गोड बोलणे हेच तिला आवडे, यश तिच्या डोक्यात गेले होते. त्यामुळे गुरुदत्त आणि गीता यांचे कधी विशेष जमलेच नाही. गुरुदत्तचा सरळ, निर्मळ स्वभाव तिने कधी समजावून घेतलाच नाही; दुसऱ्यांना समजावून घेणे तिच्याकडे नव्हतेच. असे असले तरी गुरुदत्त तिच्यापासून काही लपवत नसे. ती जवळ आली कि तिला सर्व काही सांगत असे, तिचे मत विचारत असे. आता त्यांच्यात थोडा सलोखा, प्रेम आहे असे वाटते न वाटते, त्यांचे भांडण सुरु होई. त्याचा परिणाम काय होणार? ती तिच्या माहेरी निघून जाई. इथे असली तरी तिचे जेवण माहेरहूनच येई. या नवरा-बायकोचे जीवन आम्हाला मात्र अतिशय गूढ वाटे.
गुरुदत्त एकदा हैदराबाद येथे चित्रपटाचा प्रदर्शनासाठी गेला होता. तेथे त्याने रोजुलू मरायी नावाचा एक तेलुगु चित्रपट पाहिला. त्यात वहिदा रहमान हिने काम केले होते, त्यात तिचे नृत्य त्याला खूप भावले. लगेचच तिला आपल्या पुढच्या चित्रपटात घेण्यासाठी तिच्या आईची अनेक वेळेला भेट घेऊन विचारले तरी ती नाही म्हणत होती. एकदा त्याच्या डोक्यात एखादी गोष्ट आली तर तो सहसा तो पूर्ण केल्या शिवाय राहत नसे. अनेक प्रकारे प्रयत्न केले, तिच्या आईच्या मनासारखाच करार केला आणि शेवटी तिची परवानगी घेऊनच मग परत आला. तिला घेऊन केलेला चित्रपट अतिशय यशस्वी ठरला. सगळ्यांनी सुरुवातीला तिला का घेतले असे गुरुदत्तला सुनावले होते. त्याने कोणाचे ऐकले नव्हते. सांगितलेले काम ती चोख करेल असे तो सांगत असे. ती त्यावेळी फक्त सोळा वर्षांची होती. ती विशेष काही शिकली नव्हती. वडील निधन पावल्यानंतर घराची परिस्थिती अतिशय वाईट होती. त्या वेळी ती कोणातरी करवी चित्रपट क्षेत्रात आली. गुरुदत्तने तिला ह्या चित्रपटातून लोकांसमोर आणल्यानंतर सर्वाना गुरुदत्तचे दिग्दर्शन कौशल्य, त्याची ह्या माध्यमावरील पकड लक्षात आली. ह्या चित्रपटाने गुरुदत्तला मिळालेल्या पैश्याने ऑफिसमधील सर्वाना, घरातील नोकरांना तीन तीन महिन्यांचा बोनस दिला. आधीपासूनच तो स्टुडियो मधील लोकांना पैसे देणार, मग घरी पैसे देणार. चित्रीकरण सुरु असताना सगळे न बोलता चूप बसावे असा त्याचा दंडक होता. थोडा जरी आवाज झाला, किंवा सांगितलेल्या कामात चूक झाली तर तो सिंहासारखा गर्जत असे. सगळे ह्याला घाबरून असत, पण काम झाले कि तो त्यांचा परम मित्र असे. त्यांच्या सुख दुःखात सहभागी होत असे, काय हवे नको ते विचारत असे. त्यामुळे स्टुडियो मध्ये तीनशेच्या आसपास काम करणारे लोकं त्याच्या शब्दावर, भारोस्यावर काम करत. त्याला जरा काही झाले कि देवाची प्रार्थना करत असत! प्रत्येक वर्षी एक शिल्पकार गणपतीच्या दिवसात गणपती आणून देत असे. तो १९६३ मध्ये निधन पावला आणि ती प्रथा थांबली.
गुरुदत्तला लहान मुले खूप आवडत असत. त्यातच त्याच्या थोरल्या मुलावर तरुणवर गुरुदत्तचे विशेषच प्रेम. काळ वेळ विसरून तो काम करत असे, त्यामुळे तो त्यातूनच काही वेळ आठवणीने काढून त्याला उचलून खेळवत असे. त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असे. त्याने आता तयार केलेला प्यासा हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय झाला होता. ऐश्वर्य, नाव, लोकांचे प्रेम हे सर्व त्याला ह्या चित्रपटामुळे मिळाले. लोणावळ्यात त्याने काही एकर जमीन घेऊन तीन खोल्यांचा बंगला बांधला होता. त्याला कंटाळा आला, किंवा चित्रपटासाठी काही लिखाण करायचे असेल तर तो तेथे जाऊन राहायचा. स्वतःच्या हाताने स्वयंपाक करत असे, शेतावर असलेल्या मजुरांबरोबर काम करत असे. त्यांच्या कडून ज्वारीच्या अथवा बाजरीच्या भाकऱ्या आणि चटणी मागून खात असे; त्याने तेथे बांधलेल्या विहिरीचे पाणी शेंदून तो पीत असे. जवळपासचे मजूर वगैरे आले त्यांना पाणी देत असे. ती विहीर त्या सगळ्यांना एक तीर्थक्षेत्र होते. सगळे तेथून पाणी नेत असत. त्या जमिनीत जे काही पिकत असे, ते ऑफिस मध्ये, तसेच आपल्या भावा-बहिणींमध्ये वाटत असे, उरलेले घरी आणत असे. ह्या सर्वांमुळे लोणावळ्याची जागा त्याला अतिशय भावली होती. पण हेच गीताच्या रोषाला कारण झाले होते. खेड्यातील जीवन म्हणजे ती नाक मुरडत असे. गुरुदत्तने कसल्याही गोष्टी उत्साह दाखवला तर त्याच गोष्टीत ती निरुत्साही असे. नवरा बायकोच्या ह्या अश्या रुसव्या-फुगव्या मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचा अरुणचा जन्म झाला. हि गोष्ट १९५६ मधील. ह्या वेळेला देखील मुलगी व्हावी असे त्यांची इच्छा होती. पण तसे झाले नाही. ह्या दरम्यान गुरुदत्तने पाली हिल्स येथे शंभर वर्षे जुना बंगला विकत घेतला. त्यात त्याने हजारो रुपये खर्च करून त्याला हवे तसे बदल करून घेतले. मोठ्या घरात राहण्याचे त्याचे स्वप्न त्याने पूर्ण केले. गुजरातच्या गायी, सयामी मांजरे, विविध जातीची कुत्री, विविध पक्षी, माकडे, ससे त्याने पाळली होती. ह्या सर्वांवर कडी म्हणजे त्याने घरात एक वाघाचे एक पिल्लू देखील आणले होते. घरात एक छोटेखानी सर्कस तयार झाली होती. वाघाच्या पिल्लाने अरुणला एकदा चाटले होते असे मी ऐकले होते. त्याने ते पिल्लू लगेच कोणाला तरी दिले. धन-धान्य, पशु-पक्षी, मुलबाळे, सती-संत. गीता आता विविध व्यसनात गुरफटू लागली होती, आपल्या मित्र मैत्रिणीसोबत राहून, ती आपला सोन्यासारखा संसार बिघडवत होती.
गुरुदत्तला शास्त्रीय संगीत खूप आवडत असे. एकदा अत्तरबाई, एकदा सिद्धेश्वरीदेवी, अली अकबर, विलायत खान यांना बोलावून घरात संगीत मैफिल घडवली. दुसऱ्या दिवशी काहीतरी क्षुल्लक कारणाने परत भांडण होत असे. नेहमी प्रमाणे ती माहेरी जात असे, नंतर मुलांना बोलावून घेत असे. शेवटी ह्यानेच जाऊन तिला समजावून परत घरी घेऊन आणायचे. त्या भल्या माणसाला बायको-मुलं-घर म्हंटले कि काहीही अहंकार नसे. पुरुषी अहंकार सगळा विरघळून जात असे. एवढे करून देखील तिच्या मनाला काही समाधान तृप्ती नसे. गुरुदत्त स्वतःचे दुःख स्वतःकडेच ठेवत असे. एकदाही त्याने बोलून दाखवले नाही.
हाताखालच्या काम करणाऱ्यांमध्ये कोणी जरी थोडशी चुणूक दाखवली तर, तो त्यांना विविध संधी देत असे. स्वतः बाजूला होऊन त्यांना पुढे करत असे. राज खोसला याला सी आय डी चित्रपटात दिग्दर्शनाची संधी दिली, प्रमोद चक्रवर्तीला दोन चित्रपटात दिग्दर्शनाची संधी दिली. तसेच निरंजन नावाच्या कोणाला राज फिल्म करायला त्याने परवानगी दिली. त्याची कथा एका इंग्रजी कादंबरीवर आधारित होती. त्यात शिमल्यामधील बर्फ वर्षावाचे दृश्य चित्रीकरण करण्याचे साहस त्यानेच प्रथम दाखवले. त्याने गुरुदत्त कडे सात वर्षे काम करून देखील, त्याला त्याने दिग्दर्शन आवडले नाही. चित्रपट अर्धा तयार झाला होता. त्याने तो तेथेच अर्ध्यावर थांबवला. लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्या नन्तर एखादा बंगाली चित्रपट करावा अशी त्याची आशा होती. गौरी चित्रपटात गुरुदत्त नायक आणि गीता नायिका असे ठरले होते. एका शिल्पकाराच्या जीवनाची ती कहाणी होती. कलकत्त्यात चार महिने घर भाड्याने घेऊन, बंगाली रिती-रिवाजांचा अभ्यास करून, त्याने चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले. काही रील्सचे चित्रीकरण झाल्यावर गीताने काम करण्यास असमर्थता दर्शवली. गुरुदत्तच्या उत्साहावर पाणी पडले. हजारो रुपयांचे नुकसान झाले. हा धक्का सहन न झाल्याने, गुरुदत्त एक आठवडा कुठे गायब झाला होता ते समजले नाही. तो हरवला आहे हे समजल्यावर मी भ्रमिष्टासारखी झाले. कधी तो परत येईल असा विचार करत मी त्याची वाट बघत बसे.
जसे जसे गुरुदत्तच्या पदरी यश पडत गेले, तसे तसे, गीताच्या कारकिर्दीला ग्रहण लागत गेले. सगळे म्हणत असत कि गुरुदत्तच तिला गायची परवानगी देत नाही. खरी परिस्थिती काय होती, ते आमचे आम्हालाच माहित. तिनेच तिच्या वाईट सवयीमुळे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला होता. गुरुदत्तच्या चित्रपटात तिचे पार्श्वगायन चांगले होत होते, पण बाहेरील दुसऱ्या चित्रपटात चांगले होत नव्हते. तिने तिचा सुरेल आवाज गमावला होता. तिचे स्वतःचे नातेवाईक सुद्धा तिच्या पासून दूर होऊ लागले होते. हि दुनियाच अशी आहे, नाही का? इतकि वर्षे तिने त्यांच्या साठी काम करून त्यांना पोसले, आणि तिच्या कठीण समयी ते दूर झाले. तिचे कोणी ऐकेनासे झाले.
तिच्या स्वैराचाराला आळा बसू लागला. वहिदा गुरुदत्तच्या जीवनात आली हे आणखीन एक कारण. गुरुदत्त-वहिदा यांच्या विषयी गीतानेच अनेक अफवा पसरवायला सुरुवात केली. चित्रपट क्षेत्रात तर अशा बातम्यांना लगेच खतपाणी घातले जाते. असे असल्यावर काय सांगावे? ती स्वतः पत्नी सारखे न वागता, गुरुदत्तला लोकांच्या नजरेतून उतारवयाचे काम ती करत होती. गुरुदत्तच्या जवळच्या लोकांना हे सर्व माहिती असल्यामुळे, ते शांत असत, वहिदाला त्यांनी बाजूला केले नाही. पण ती स्वतःहून बाहेर गेल्यावर, तिला एकाहून एक चांगली कामे मिळत गेली. तिचे नशीब चांगले होते. तिचे काम लोकांना देखील आवडत होते, आणि ती त्यामुळे प्रसिद्ध होत गेली.
गौरी आणि राज या चित्रपटांमुळे गुरुदत्तला भयंकर फटका बसला. लाखो रुपयांचे नुकसान झाले. घरातील वातावरण तर हे असे होते. त्याच्या मनाचा तोल ढळू लागला, त्यात आश्चर्य ते काय. त्याला मद्रासच्या चित्रपटातून काम करायला संधी येत होत्या. या वेळेपर्यंत ते त्याने स्वीकारले नव्हते. आता निरुपाय होता, म्हणून त्याने मद्रासच्या निर्मात्यांच्या काही हिंदी चित्रपटांतून नायकाची कामे स्वीकारली. त्याच सुमारास चौदहवी का चांद चित्रपटाची बोलणी सुरु झाली. आधीच त्याने हात पोळून घेतले असल्यामुळे त्याने ते दिग्दर्शित न करता, दुसऱ्याला ते दिले. ते यशस्वी व्हावे याकरिता अनेक गाणी, नृत्ये त्यात त्याने घालायला लावली आणि तो चित्रपट त्याने संपवला. त्याच्या बाकीच्या चित्रपटांपेक्षा तो तसा बाजारू चित्रपट होता; त्यात कलात्मकता कमीच होती; सर्वसाधारण प्रेक्षकांसाठी तो बनवलेला होता. लोकांना तो अतिशय आवडला, त्याचे लोकं कौतुक करून लागले. ते त्याला आवडले नाही. असे असले तरी त्याला गाळातून बाहेर काढले. स्टुडियो मधील सर्वाना त्याने बोनस दिला. भाऊ विजय आणि मुलगा तरुण यांना दार्जीलिंगला फिरायला पाठवले. नंतर परदेशात देखील त्यांना पाठवायचे होते. पण देवाच्या मनात वेगळेच होते. त्याच्या कितीतरी योजना पूर्ण होऊ शकल्या नाही. एवढेच नाही तर, निराशेने भरलेले मन, अपयश पचवलेल्या मनःस्थितीत, त्याने चित्रपटातून नायकाच्या भूमिका कश्या काय करत राहिला, देवच जाणे! मोठ्यांचे आशीर्वाद, साधूसंतांची कृपा, स्वतःचे मनोधैर्य, सहनशीलता ह्याच गोष्टी त्याचे रक्षण करत होत्या असे वाटते. चित्रपट क्षेत्र हा एक व्यवसाय आहे. त्यासाठी व्यावसायिक वृत्तीच हवी. गुरुदत्त सारख्या हळव्या, संवेदनशील मनाच्या लोकांचे ते काम नाही. एकदा त्याच्या तावडीत सापडले कि बस, त्यातून बाहेर येणे अतिशय अवघड. चौदहवी का चांद चित्रपटाच्या आधी कागज के फूल हा चित्रपट त्याने सुरु केला होता, जो त्यानेच लिहिला होता, तसेच त्याने दिग्दर्शित केला. गुरुदत्तच्या चित्रपट क्षेत्रातील अनुभवच त्या चित्रपटाची कथावस्तू होती. हिंदुस्तानात पहिल्यांदा सिनेमास्कोप चित्रपट केला तो गुरुदत्तनेच. लोकांना जरी आवडला होता, कौतुक होत होते, तरी तो चित्रपट चालला नाही. त्यामुळे त्याचे पुढील चित्रपट दुसऱ्यांनी दिग्दर्शित केले. दुसऱ्याला कोणाला तरी संधी देऊन त्यांना पुढे आणायचे अशी त्याची इच्छा होती. स्वतःचे बलिदान केले. !
ह्या नंतर बंगाली चित्रपट करायच्या इच्छेने श्री विमल मित्र यांच्या मिथुन-लग्न हि कथा निवडली. (हे पुस्तक मी कन्नड मध्ये अनुवादित केले आहे, आणि काव्यालय प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे). ह्यात तंद्रा बर्मन हिला घेऊन तीन रिळे चित्रीकरण केले आणि त्यानंतर ते त्याने थांबवले. याचे कारण तिने अनेक प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली होती. त्याने असे कितीतरी चित्रपट सुरु करून मध्येच अर्धवट सोडले त्याला काही गणतीच नाही. तसेच कितीतरी कथांचे हक्क पैसे देऊन घेतलेले, कराराच्या फाइल्स कोपऱ्यात पाडून होत्या. गुरुदत्त अतिशय संवेदनशील, मनाला येईल तसेच झाले पाहिजे अश्या मताचा असल्यामुळे, कामात थोडीशी देखील हयगय चालत नसे.
या दरम्यान गीताचा दोनदा गर्भपात झाला. तिचे स्वास्थ्य बिघडले होते. तिच्या प्रत्येक बाळंतपणी, आणि तिची प्रकृती बिघडली असताना मी हॉस्पिटल मध्ये तिच्या सोबत असे. आत्मारामने गुरुदत्त फिल्म्स कंपनी सोडून बर्मा-शेल मध्ये नोकरी सुरु केली. तेथे माहिती-पट बनवणाऱ्या विभागात काम मिळाले. १९५७ मध्ये तीन वर्षांसाठी लंडनला निघून गेला.
आत्माराम माहिती-पट क्षेत्रात बरेच नाव कमावले. गुरुदत्तला लंडनमध्ये चित्रपट वितरणासाठी एक कार्यालय हवे होते. त्या वेळेस गुरुदत्त मॉस्को, लंडन, जर्मनी ह्या ठिकाणी भेट देऊन आला. आत्माराम मध्ये असलेल्या प्रामाणिकपणा, अनुभव, कामाप्रती उत्साह या सर्वांमुळे, त्याला परत आपल्या स्टुडियो मध्ये काम करण्यासंबधी विचारले. आत्मारामला सुद्धा लंडन मध्ये राहयचे नव्हते, कारण त्याची मुलगी मोठी झालेली होती. तेथील संस्कार, वातावरण आपल्या मुलीवर परिणाम करतील असे त्याला वाटत होते. १९६० मध्ये आत्माराम लंडनहून मुंबईला आपल्या कुटुंबासमवेत परतला. आणि गुरुदत्त फिल्म्स मध्ये काम करू लागला. त्याच वर्षी त्याच्या लहान भावाने एका पंजाबी मुलीशी प्रेमविवाह केला. आणि त्याच वर्षी माझे यजमान निर्वतले.
मी १९५९ मध्ये माझ्या आई सोबत माटुंगा मधील घरी राहत होते. माझ्या आईला ऐकू कमी येत होते, दृष्टी देखील क्षीण झाली होती, स्मरणशक्ती क्षीण झाली होती. त्या घरात राहायची सवय असल्यामुळे ती आपले काम आपणच करत असे. गुरुदत्त कितीही रागवत असला तरी त्याच्या जवळ राहणे अनुकूल होत नव्हते. तो म्हणत असे, ‘आई, ,माझ्या मुलांना तू आवडतेस. त्याच्याबरोबर का राहत नाहीस? इथे राहायला आवडत नसले तर शेजारी एक दुसरा बंगला मी बांधतो, तेथे राहा’. पण त्याच्या बरोबर राहणे मला शक्य नव्हते. असे असले तरी त्याच्या घरी कोणी आजारी असल्यास, गीताच्या बाळंतपणी, किंवा त्यांचे भांडण झाल्यास मी जाऊन राहत असे. मला देखील गुरुदत्तला सोडून राहायचे म्हणजे जीवावर येत असे. माझ्या वृद्ध आईला सोडून कशी जाणार? तरीही मी अधून मधून जात असे, हे खरे आहे. पण नियतीने आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे हे कसे कळणार? आम्ही सर्व त्यांच्या इतके जवळचे असून देखील त्याच्या मनात काय खळबळ चालू हे कळत नव्हते. त्याच्या जवळ राहून त्याला काही नैतिक धैर्य देण्याचे देखील आम्हाला जमले नाही.
१९६१ मध्ये साहिब बीबी गुलाम हा चित्रपट करावा असा त्याच्या मनात विचार आला. कथा श्री विमल मित्र यांची होती, मोठा कठीण विषय होता. जुन्या काळातील जमीनदारांची ती कथा होती. एकदा मनात आले कि तो कसा काय थांबणार? कलकत्त्यात घर भाड्याने घेतले, जुन्या जमीनदाराचे घर शोधून काढले. वहिदा, मीनाकुमार, रहमान त्यात होते, आणि तो नायक होता. दिग्दर्शनासाठी त्याचा चांगला मित्र असलेल्या अब्बर अल्वी याला पाचारण केले. त्याने गुरुदत्तच्या अनेक चित्रपटांसाठी संवाद लिहिले होते. अतिशय प्रतिभावान होता. असे असले तरी तो दिग्दर्शन पहिल्यांदाच करणार होता. साऱ्या चित्रपटात गुरुदत्तने त्याच्या मागे उभे राहून दिग्दर्शन केले, हे सर्वाना माहित होते, पण नाव त्याचेच दिले. हा चित्रपट चालला नाही. पण तोच चित्रपट पाहायला लोकं गर्दी करतात.
त्याचे सुमारास घरातील परिस्थिती अतिशय दुःखाला कारण झाली होती. १९६१ मध्ये गुरुदत्तचे वडील गेल्यानंतर घरात कोणी विचारायला असे राहिले नाही असे झाले. गीता तर दिवस-रात्र नशेत असे. घरातील नोकरचाकर मंडळी गुरुदत्तसमोर चांगले वागत, पण नंतर त्याच्या मागे घरमालकिणीच्या हातातील बाहुल्या झाले होते. गीताने त्यांना पैसे देऊन आपल्या बाजूला केले होते.
१९६१ ऑक्टोबर मध्ये विजयला भयंकर आजार होऊन तो गुरुदत्तकडे राहायला आला. त्याच्या अपेंडिक्सचे ऑपरेशन करायला लागले. त्याच सुमारास गीता गायब झाली होती. कशी कोणास ठाऊक पण तो स्वःच परत घरी परतली. त्यावेळेला अनेक अशा गोष्टी घडल्या कि ज्या सांगू नयेत, किंवा सांगता येत नाहीत. गुरुदत्तच्या मुलाला तरुणला कोणीतरी पैशांसाठी फसवले, बदनामी केली असे समजल्यावर गुरुदत्तने त्याला दार्जीलिंगहून बोलावून घेतले. त्यावेळी गीता आपल्या माहेरी होती. मुलावरून दोघांत कडाक्याचे भांडण झाले. शेवटी तरुणला ती घेऊन गेली. एवढ्या मोठ्या घरात मला एकटीलाच राहावे लागले, असते, म्हणून मी माझ्या सासूला बोलावून घेतले.
त्या रात्री गुरुदत्तची मनःस्थिती कशी होती देवालाच माहिती. तरुण म्हणजे त्याचा जीव कि प्राण. काही दिवसांपूर्वी अशी आवई उठली होती कि तो गुरुदत्तला घटस्फोट देणार आहे. गीता देखील सहजसहजी देणार नाही असे देखील कानावर येत होते. मुले तिच्याकडेच राहणार, तसेच दोघांचेही समाजात नाव होते, त्यामुळे देखील होणारा अपमान त्याला सतावत होता. लग्न करताना सुद्धा त्याने रजिस्टर पद्धतीने करायला त्याचा नकार होता. हिंदू धर्माप्रमाणे, शास्त्रोक्तपद्धतीने, लोकांसमोर तो विवाह करायचा असा त्याचा आग्रह होता. गुरुदत्तला घटस्फोट सारख्या आधुनिक पद्धती मान्य नव्हत्या. चित्रपट-व्यवसायाशी निगडीत पार्ट्यांना तो अगदी अगत्य असेल तरच तो जाई. क्लब, रेस अश्या गोष्टी त्याला आवडत नसत. घोड्याच्या शर्यती त्याने कुतूहल म्हणून एक-दोनदा पाहायला गेला असेल. जातीभेद, धर्मभेद तो पाळत नसे. परंपरागत असलेल्या काही अंधश्रद्धा देखील पाळत नसे. भगवद्गीता, कुराण, बायबल वगैरे तो वाचे, पण मंदिरात, मस्जिद, मठात कधी गेला नाही. गीतेतील शिकवणीप्रमाणे फळाची आशा न करता तो आपले काम करत असे. जीवनातील एक देखील क्षण तो वाया न घालता कार्यरत असे. घर, स्टुडियो एवढेच तो करे, दुसरीकडे कुठेही जात नसे. वेळ मिळाला कि मुलांबरोबर खेळणे, स्वयंपाक करणे , दुसऱ्यांना जेवू घालत असे, वाचन करत असे, हे त्याचे वेळ घालवण्याचे उद्योग असत. त्याचा पुस्तकांचा संग्रह मोठा होता, मराठी, उर्दू, इंग्रजी, बंगाली, हिंदी अशी सर्व पुस्तके त्याच्याकडे होती. त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी देखील बाजूला एक उघडे पुस्तक निपचीत पडले होते.
लहानपणापासूनच त्यांच्या सगळ्या कामात प्रयोगशीलपणा दिसून येत असे. इंग्रजी चित्रपटांमध्ये जसे दोन-तीन लघुकथा एकत्र करून चित्रपट बनवतात तसे, त्याला हिंदीत देखील करायचे होते. त्याची ती इच्छा प्रबळ होती, पण शेवटीही ती पूर्ण झालीच नाही.
(क्रमशः)