मी गेल्या महिन्यात(जानेवारी २०१८) मध्ये अमेरिकेत गेलो होतो. तेथेच असताना लिपीतज्ञ(typographer) मुकुंद गोखले यांचे निधन झाल्याची दुःखद वार्ता कळाली. मी पूर्वी त्यांच्याबद्दल या ब्लॉगवर लिहिल्याप्रमाणे, त्यांचा आणि माझा कित्येक वर्षापासून परिचय होता. दोन-तीन वर्षांपूर्वी मी त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो होतो. प्रकृती तशी खालावलेलीच होती, पण ते एका प्रकल्पावर काम करत होते. तो प्रकल्प म्हणजे एक पुस्तक जे त्यांचे सहकारी, ज्येष्ठ लिपी संशोधक लक्ष्मण श्रीधर उर्फ लिपिकार बापू वाकणकर यांचे चरित्र. त्यांनी त्याचे बाड मला तो आस्थेने चाळायला दिला. गोखले यांच्या निधानापुर्वीच काही महिने आधी ते प्रकाशित झाले होते. त्यावर मला थोडेसे लिहायचे होतेच.
पुढील आठवड्यातच जर्मन पुस्तक मुद्रण तंत्रज्ञ गुटेनबर्ग याच्या स्मरणार्थ जागतिक मुद्रण दिन साजरा केला जातो(फेब्रुवारी २४). गेल्या १०००-१२०० वर्षात मुद्रण तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे. आजकाल तर ३डी प्रिंटिंग सारखे हवी ती वस्तू, हव्या त्या आकारात तयार करू शकणारे मुद्रण तंत्रज्ञान आले आहे. मुद्रणक्षेत्रात संगणकाचा वापर तर अनिवार्यच आहे. पण जेव्हा भारतीय लिपि वापरून मुद्रण करण्याची गोष्ट येते तेव्हा त्याचा इतिहास खूप जुना नाही. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर याकडे विशेष लक्ष गेले. त्यातील महत्वाचे नाव म्हणजे लिपिकार लक्ष्मण श्रीधर वाकणकर. जागतिक मुद्रण दिनाच्या निमित्त भारतीय भाषांमध्ये पुस्तकं छापण्याच्या दृष्टीने विविध भारतीय लिप्यांसाठी मुद्रण तंत्रज्ञान विकसित करणारे, संगणकीय उपयोजनासाठी काम करणारे लिपिकार बापू वाकणकर, तसेच मुकुंद गोखले यांचे स्मरण करायला हरकत नाही.
मुकुंद गोखले यांनी लेखन, संपादन केलेल्या, आणि मुंबईच्या सुमंगल प्रकाशनने प्रकाशित केलेल्या चरित्राचे शीर्षक आहे ‘लिपिकार बापू वाकणकर: व्यक्ती आणि कार्य”. तसे हे पुस्तक छोटेखानी आहे, १८६ पानांचे. मुखपृष्ठ वयोवृद्ध बापूंच्या छायाचित्राने सजला आहे. ते पाहून मला Institute of Typographical Research(ITR) मधील माझे दिवस आठवले(१९९१-९२), जेथे मुकुंद गोखले काम करीत, आणि बापूंचे तेथे वास्तव्य असे, जे आम्हा सहकाऱ्यांना दररोज भेटत. तेथेही ते आम्हास कायम कार्यमग्न असलेले दिसत, बहुधा ते अक्षररचना मासिकाचे संपादन, आणि इतर लेखन असे काम करत असावेत. पुढे अर्थात काही वर्षातच १९९ मध्ये त्यांचे निधन झाले. वाकणकर घराणे तसे मुळचे कोकणातील, पण २-३ शतकांपूर्वी पूर्वज माळव्यात(बृहन्महाराष्ट्रात) स्थायिक झाले. १९१३ मध्ये त्यांचा मध्य प्रदेशमधील गुणा या ठिकाणी झाला. त्यांचे धाकटे बंधू डॉ. विष्णू वाकणकर हे थोर पुरातत्व शास्त्रज्ञ होते, ज्यांनी जगप्रसिद्ध अशी भीमबेटका येथील अश्मयुगीन गुहा शोधून काढली(माझ्या Indology course च्या दरम्यान भीमबेटका आणि आजूबाजूचा परिसर पाहायला गेलो होतो, त्याबद्दल कधीतरी परत). माझा एक वैदर्भीय मित्र त्यांची वेबसाईट करण्याच्या कामात काही वर्षांपूर्वी गुंतला होता. ती वेबसाईट येथे पाहता येईल.
पुस्तकात सुरुवातीला लेखकाचे मनोगत आहे, ज्यात चरित्रसंशोधनासाठी केलेली धडपडीचे, आशा-निराशेचे क्षण वेचले आहेत. बापूंवरील प्रेमापोटीच त्यांनी हे अवघड असे काम पुरे केले. कलासमीक्षक, मुद्रणतज्ञ असलेले दीपक घारे यांची छानशी प्रस्तावना, ज्यात त्यांनी कार्याचा, संशोधनाचा गौरव केला आहे. वाकणकर घराण्याचा पूर्वेतिहास, त्यांचा जन्म, जडणघडण, क्रांतिकारी चळवळीशी संबंध, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आलेला संपर्क, रासायनिक वस्तूंच्या निर्मितीचा कारखाना, मुंबईत क्रोमोप्रिंट्स नावाचा व्यवसाय असा सगळा जीवनप्रवास पहिल्या ६-७ प्रकरणातून गोखले यांनी आढावा घेतला आहे.
देवनागरी लिपि मुद्रणाच्या दृष्टीने सुलभ व्हावी यासाठी भारतात १९३५ मध्ये लिपिसुधार समिती सुरु झाली होती. आचार्य कालेलकर तिचे अध्यक्ष होते. त्यांनी बापूंना या कामात ओढले. तेथे त्यांनी टाईपरायटर वर देवनागरी लिपि कशी वापरता येईल, तसेच देवनागरी लिपि मधील सुलभपणे मजकूर कसा छापता येईल याकडे लक्ष दिले. त्याचा इतिहास, बापूंचे प्रयत्न हे सगळे गोखले यांनी मांडले आहे. पुढे १९७९ मध्ये ITRच्या स्थापनेत स्वतः मुकुंद गोखले, वसंत भट यांच्या महत्वाचा सहभाग त्यांचा होता. ITR तर्फे भारतीय भाषांसाठी photo typesetting, desktop publishing, font designing, phonetic keyboard design क्षेत्रात संशोधन आणि सेवा देण्यात त्यांचा सहभाग होता. त्या सगळ्याची पार्श्वभूमी, विचार विनिमय यालाही एक इतिहास आहे ते गोखले यांनी विस्तृतपणे मांडले आहे. मी ते सगळे काही थोडा काळ का होईना पहिले आहे याचा मला आनंद आहे. CALTIS(Calligraphy, Lettering and Typography of Indian Scripts) नावाने प्रसिद्ध असलेली आंतरराष्ट्रीय परिषद त्यांनी १९८३, १९८४, १९८५ साली भरवली, तसेच आधी म्हटल्या प्रमाणे अक्षररचना मासिकाचे कामही त्यांनी हिरीरीने केले.
गणेशविद्या हे त्यांचे भारतीय लिपीच्या उगमाबद्दलचे मूलगामी विचार प्रकट करणारे महत्वाचे पुस्तक. यांचे उपशीर्षकच होते A Traditional Indian Approach to Phonetic Writing. अथर्वशीर्षामध्ये ‘सा एषा गणेशविद्या’ असा एक श्लोक आहे, त्याचा त्यांनी पाठपुरवा कसा केला, आणि ध्वन्यात्मक लेखनाची भारतीय परंपरा यावर संशोधन करून ते मांडले. हे त्यांच्या सततच्या चिंतनशील स्वभाववैशिष्ट्याचे प्रतिकच म्हणावे लागले. ते टाटा प्रेसने १९६६ मध्ये प्रकाशित केले, त्याचे मराठी भाषांतर १९९८ मध्ये पुण्यातच झाले. यांचे सर्व विवेचन, इतिहास गोखले यांनी दोन प्रकरणातून मांडला आहे. यामुळे पुढे त्यांना संगणकावर देवनागरी वापराबद्दल सुलभता आणण्यात यश आले.
अभ्यासकांसाठी उपयुक्त अशी वाकणकर साहित्य सूची, त्यांनी मिळवलेले पेटंट्स, व्याख्याने, विविध लेख यांची सूची देखील दिलेली आहे. पुस्तकात छायाचित्रे सुद्धा पुरेशी आहेत, त्यामुळे, ते देखणे देखील झाले आहे. उजैनमध्ये वाकणकर शोध संस्थान नावाची संस्था स्थापन झाली आहे, तेथे बापूंचे, तसेच त्यंच्या पुरातत्व शास्त्रज्ञ असलेल्या बंधूंची विविध कागदपत्रे, साहित्य इत्यादीचे एक archive उभे राहिले आहे.
आजकाल नवनिर्मिती(innovation), उद्योजकता(entrepreneurship), startups यांचा सर्वत्र बोलबाला आहे. माझ्या मते लक्ष्मण श्रीधर उर्फ लिपिकार बापू वाकणकर हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. लिपिशास्त्रातील त्यांच्या योगदानाचे महत्व अजूनही फार थोड्या लोकांना माहिती आहे. दिवंगत मुकुंद गोखले यांच्या या चरित्रलेखनामुळे बापू वाकणकर यांच्या जीवनाची, कार्याची तपशीलवार माहिती उपलब्ध झाली आहे. ते आपण सर्वानी जरूर वाचावे, आणि त्यातून स्फूर्ती घ्यावी असेच ते आहे. आणि आणखी एक. ह्या पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद लवकरात लवकर व्हावा, जेणेकरून जगभर लिपिकार बापू वाकणकर यांच्या कार्याचा आणखी प्रसार होईल. मला असेही वाटते की त्यांच्या लेखांचे, अक्षररचना मासिकातील इतर लेखांचे संकलन पुस्तक रुपाने आले तर तेही खुपच उपयोगी होईल.