दिवंगत नाटककार, अभिनेता गिरीश कर्नाड यांचा एका कन्नड लेखाच्या भाषांतराचा पहिला भाग मी त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित २०२० मध्ये ह्या ब्लॉग वर येथे दिला होता. आज दुसरा भाग देत आहे. भारतीय कलेच्या इतिहासाबद्दल त्यांनी केलेले हे भाष्य नक्कीच विचार करायला लावणारे आहे. हा लेख असलेल्या एका कन्नड पुस्तकाचे मी सध्या मराठीत भाषांतर करत आहे.
कला आणि राष्ट्रीय ओळख
शहरी मध्यमवर्गाने स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतलेली होती. त्यावेळेस भारतीय नागरिकत्वाचे स्वरूप काय असावे हे निश्चित करणे अनिवार्य ठरले. ह्या प्रयत्नात कनिष्ठ समाजातील लोकांची ओळख असलेले व्यवसाय हे ‘पुरातन संस्कृती’चे प्रतिक म्हणून पुढे आले. मध्यमवर्गाने ह्या प्रतीकांना आपलेसे करून त्यांना राष्ट्रीय प्रतीकांचा दर्जा दिला आणि ती ओळख आणखी दृढ करण्याचे प्रयत्न सुरु झाले.
उदाहरणार्थ, १८९४मध्ये जेव्हा Indian National Congress स्थापित झाली, त्या वर्षापासून, प्रत्येक वर्षी कॉंग्रेसच्या मुख्य अधिवेशनाबरोबर, All India Music Conference ह्या राष्ट्रीय संगीत संमेलनाचे आयोजन केले जावू लागले. १९१५ मधील अधिवेशन मद्रास मध्ये होते. तेव्हा त्या निमित्ताने एक संगीत अकॅडेमी स्थापित केली जावी असा प्रस्ताव पुढे आला. त्या नुसार मद्रास संगीत अकादेमीची स्थापना झाली. त्या युगातील कोंग्रेस पक्षासारखेच, त्या अकादेमीमध्ये ब्राम्हणच बहुसंख्येने होते. त्यांच्यामध्ये पुरुष संगीतकार सार्वजनिकरित्या गाण्याची पद्धत असली तर देवदासी वर्गातील स्त्रियानांच फक्त बाहेर गाण्याची परवानगी होती. १९३३ मध्ये डी. के. पट्टम्माळ ह्या सार्वजनिकरित्या गाणाऱ्या पहिल्या ब्राम्हण महिला ठरल्या. त्यानंतर, संगीत महफिलीमध्ये उच्चवर्गातील महिलांनी संगीत सादर करणे हे लोकप्रिय होवू लागले. समाजात स्त्रियांच्या प्रती वाढत चाललेल्या उदार दृष्टीकोनाचा उत्साहात स्वागत केले गेले. मात्र ह्या परिवर्तनाचा लाभ हा उच्चवर्गातील स्त्रियांनाच झाला. पारंपारिकरित्या हेच करत असलेल्या कनिष्ठ वर्गातील स्त्रियांना मात्र रंगभूमीवरून बाहेर काढण्यात आले(आज जर आपण चेन्नईमध्ये ‘सार्वजनिकरित्या संगीत कोण गायले?’ असे जर विचारले तर चटकन आपल्यापुढे पट्टम्माळ यांचे नाव पुढे येते. शतकानुशतके गाणाऱ्या ह्या स्त्रियांना आपण आज विसरून गेलो आहोत)
याच तऱ्हेचे बदल(पलटवार) ललितकलेच्या क्षेत्रात देखील झाले आहेत, पण त्याचे कारण अतिशय वेगळे होते. ब्रिटीशांनी भारतीय संगीत क्षेत्रात ढवळाढवळ केली नाही. पण ललितकला क्षेत्रात(चित्र, शिल्प, वास्तू)भारतीय मागसलेले आहेत अशी त्यांची धारणा होती. भारतीयांना युरोपिअन सौदर्यशास्त्राचा परिचय करून द्यायला हवा असे त्यांचे मत होते. त्यामुळे ब्रिटीशांनी तीन नगरात(मुंबई, कोलकाता, चेन्नई), आणि नंतर लाहोर मध्येही, कला महाविद्यालये सुरु केली. कोलकातामधील कला महाविद्यालातील प्रो. ई. बी. हावेल यांच्या सारख्यांनी भारतीय चित्रशैली जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे खरे आहे. पण लंडनमध्ये शासकीय शैक्षिणिक दृष्ट्या मान्य पावलेली शैली शिकवण्याचे ब्रिटिशांचे ध्येय होते. पण ह्या महाविद्यालयामधून शिकवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमापेक्षा, तेथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी अधिक क्रांतिकारी होती. समाजातील जो वर्ग आपली कला उपजीविकेसाठी जगात होता, त्यांच्यासाठी सुरु केलेल्या ह्या महाविद्यालयामधून, श्रीमंत तसेच मध्यम वर्गातील विद्यार्थीच अधिक होते.
बंगालातील भूसुधारणा कायद्याच्या परिणामामुळे, स्वतःला भद्रलोक असे म्हणवणारा एक उच्चवर्ग तयार झाला. आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेला हा वर्गाने, साहित्य, रंगभूमी आणि शिक्षण क्षेत्रात स्वतःचे वर्चस्व स्थापन केले. ते कलेचे आश्रयदाते होते, रसिकही होते. वृत्तपत्रातून काम करणारे पत्रकार, समीक्षक हेही ह्याच वर्गातील होते. ललीतकलेचा अभ्यास करण्यासाठी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ह्या वर्गातील विद्यार्थी देखील होते. त्यामुळे, ह्या कलाविश्वात, पारंपारिक कलाकारांना स्थानच मिळाले नाही. (अशा पार्श्वभूमीवरून आलेल्या मैसूरचे वेंकटप्प कोलकात्याला गेल्यावर तेथील कलाकारांच्या वर्तुळात ते दाखल झाले, तसेच त्या वेळी सुप्रसिद्ध असलेल्या Modern Review या मासिकात त्यांचे चित्र प्रसिद्ध झाले). याचाच अर्थ असा की अश्या ह्या कला महाविद्यालयांमुळे भारतीय ललित कला क्षेत्रात एक नवा वर्ग निर्माण झाला. ह्या विद्यालयातील पदवीधर हे कलाकार झाले.
एकोणिसाव्या शतकातील युरोपियन romantic शैलीच्या आधीन न होता, स्वतंत्र नवीन अशी शैली निर्माण करण्याची ह्या कलाकारात ओढ होती. तो कलाकार बाजारपेठेकडे तिरस्कृत नजरेने पाहू लागला. Artist वेगळे झाले. Artisan झाले. कला वेगळी झाली, कलाकौशल्य वेगळे झाले. कला हे कसब आहे असे समजून जगणारे कलाजगतापासून दूर जावून खेड्या-पाड्यात गेले. असाच बदलाव नृत्यक्षेत्रातदेखील झाला. पण त्याला वेगळेच कारण होते. विसाव्या शतकातील भारतीय नृत्यकलेला पुनर्जीवित होण्यास पाश्चिमात्य जगताची ह्या रहस्यमय भारताबद्दल वाटणारे आकर्षण हेच होते, हे आपली विद्वान विसरले आहेत(किंवा जाणूनबुजून ह्या सत्याकडे दुर्लक्ष करत आहेत). विसाव्या शतकातील पहिल्या दशकात Ruth St Dennis नावाच्या अमेरिकन नर्तकीच्या नजरेस, अकस्मातपणे न्युयॉर्कमध्ये भारतीय खेड्यातील एक छायाचित्र पडले. त्यावरून स्फूर्ती घेवून, स्वतःची कल्पनाशक्ती वापरून, भारतीय नृत्य तेथील लोकांसमोर सादर करून, लोकप्रियता मिळवली. तिच्या नृत्याची नावे नर्तकी, राधा, The Nautch Girl अशी होती. काही वेळेस भारतीय संगीतकारांना रंगमंचावर बोलावले जायचे, पण त्यांचा उपयोग श्राव्य कारणासाठी नव्हे तर दर्शनीय शोभा वाढवण्यास होता. Ruth St Dennis १९१६ मध्ये Ted Shawn यांच्या बरोबर आपला चमू घेवून भारतात आली. ते भारत पहिल्यांदाच पाहत होते. इथले दारिद्र्य, घाणीचे साम्राज्य, रोगराई यामुळे हैराण झाले होते. तरीपण त्यांनी त्यावेळेस शंभरहून अधिक प्रयोग केले.
नोबेल पारितोषिक विजेते रविंद्रनाथ टागोर यांनी तिला शांतीनिकेतन मध्ये बोलावून, भारतीय नृत्याचे पुनःर्जीवन करावे असे तिला सुचवले यावरून तिचे नृत्य चांगलेच असले पाहिजे. त्याच वेळेस टागोरांच्या सारख्या प्रभृतीमध्येही भारतीय नृत्याबद्दल किती अज्ञान होते हे दिसून येते. याच सुमारास रशियन नृत्यांगना Anna Pavlova हिने पंडित रविशंकर यांचे थोरले बंधू उदयशंकर यांच्या बरोबर नृत्य प्रयोग सुरु केले. भारतीय नृत्य आणि रशियन ब्याले यांच्या मिश्रणातून एक नवीन नृत्य प्रकार निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. उदयशंकर यांनी १९३९ मध्ये भारतात परत येऊन अल्मोडा येथे Indian Dance Academyसुरु केली. तेव्हा सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर पाश्चात्य प्रेक्षकच होता. त्यानंतर चार वर्षानी मद्रास मधील श्रेष्ठ नृत्यांगना बालसरस्वती यांचे नृत्य पाहून ‘मी असे काही या आधी पहिलेच नाही’ असे उद्गार त्यांनी काढले होते. पाश्चात्यांच्या आस्वादासाठी उदय शंकर आपल्या कल्पनेप्रमाणे जी ‘भारतीय’ नृत्ये सादर करत होते, त्याला बालसरस्वती यांच्या नृत्यामुळे धक्का बसला.
दक्षिण भारतात कमीत कमी दीड हजार वर्षे देवदासी नृत्य कला जोपासत आहेत. कुलीन स्त्रियांना नृत्य निषिद्ध होते(भरतमुनी आपल्या ‘नाट्यशास्त्र’ ग्रंथात नाटक सादर करण्यास स्वतःचे शंभर पुत्र कामी आणतो, पण स्त्रियांच्या भूमिकेसाठी मात्र अप्सरेची योजना करतो!). ह्या दीड हजार वर्षांमध्ये एकाच राजाचे राज्य होते, तर एका बाजूला मंदिरांचे वैभव, ऐश्वर्य होते. या दोन्ही गोष्टी एकमेकांवर परिणाम करत होत्या. आणि एकमेकांना पूरक ठरत होत्या. ह्या व्यवस्थेमध्ये देवदासींना राजाश्रय आणि देवाश्राय दोन्ही मिळत गेला., आणि देवदासी प्रथा हि भक्ती तसेच शृंगार यांच्या कलात्मक मिश्रणातून उत्कर्ष पावत गेली.
विजयनगर साम्राज्याच्या पतनानंतर राजाश्रयामुळे टिकलेल्या कला दक्षिण भारतातील राजांच्या दरबारांत विखुरल्या गेल्या. तंजावूरचे नायक, भोसले राजघराणे, ह्या कलाकारांना आपल्या पदरी ठेवले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर या नृत्यकलेला दासीयाट्टम किंवा मराठी/उर्दू मूळ असलेले सादीर किंवा नाच (Nautch) असे संबोधले जाई. ह्या देवदासी मंदिरांतील उत्सवप्रसंगी सेवा अर्पण करत, तसेच लग्न सोहळ्यासारख्या इतर सामाजिक कार्यक्रमात देखील त्या आपली कला सदर करत असत. देवदासी ह्या देवाला वहिल्या गेल्या असल्यामुळे त्या अखंड सौभाग्यवती असतात असे समजले जात असे. वैधव्य त्यांच्या आसपास देखील फिरकत नसे. त्यामुळे त्या शुभ प्रसंगात सहभागी झाल्या तर कुठलेही संकट कोसळणार नाही असा विश्वास लोकांत होता. संगीत आणि नृत्य ह्या दोन्ही कला ह्या अश्या देवदासींनी जिवंत ठेवले असे म्हणता येईल.
1852 मध्ये ब्रिटीश सरकारने तंजावूर संस्थान बरखास्त केले. त्यामुळे तंजावूर मध्ये असलेल्या सुमारे १५०० देवदासींचा राजाश्रयच एकाएकी निघून गेला. राजा गेला, त्याबरोबर देवदासींचा पोषणकर्ता गेला. त्यामुळे पोटासाठी देवदासींना त्यांच्या जवळ असलेल्या नृत्य संगीतादी कला वापरून उपजीविका करावी लागली. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी वेश्या आणि देवदासी यांच्यात भेद उरला नाही असे म्हणावेसे वाटते.
ह्याचा परिणाम असा झाला कि, म्हैसूर संस्थानाच्या दिवाणजी यांनी , हा देवदासी संप्रदायच नष्ट करण्याच्या हेतूने , देवदासींना देण्यात येणारे इनाम, आणि इतर सवलती रद्दबातल करून टाकल्या. ह्यामुळे झाले असे कि, नृत्य गायनाची म्हैसूर परंपरा देखील नष्ट झाली.
१९१० च्या सुमारास मद्रास हे नाच विरोधी आंदोलनाचे केंद्र बनले होते. ह्या चळवळी मध्ये डॉ. मुत्तूलक्ष्मी रेड्डी नावाच्या एक महिला होत्या. मद्रास विधान परिषदेने देवदासी प्रथा बंद करावी तसेच त्याचा भाग असलेले सार्वजनिक नृत्याला निषेध करावा अशी त्यांची प्रमुख मागणी होती.
डॉ. अमृत श्रीनिवास नावाचे समाजशास्त्रज्ञ, यांच्या नुसार , ह्या नृत्य विरोधी चळवळीला देवदासी समाजातील पुरुषांचा मोठा पाठींबा होता. हि पुरुष मंडळी देवदासी नृत्य सुरु असताना वाद्याची साथ सांगत करायला बसत असत. त्यातील अनेक जण हे स्वतः स्वंतत्र कलाकार देखील होते. असे असून सुद्धा ह्या पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांचे उत्पन्न अधिक होते, आणि त्यामुळे स्त्रियांचे वर्चस्व अधिक होते. त्या पुरुषांच्या डोळ्यांसमोर तथाकथित पुढारलेले ब्राम्हण लोकं आणि तसेच इंग्रज लोकांची उदाहरणे होती, जिथे पुरुषांचे स्त्रियांपेक्षा अधिक वर्चस्व होते. त्यामुळे आपल्या स्वतःच्या समाजात, पुरुषांना स्त्रियांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे, ती बाब त्यांना खुपत होती.
हे anti-nautch (नाच विरोधी) आंदोलन जर यशस्वी झाले तर, भारतीय नृत्यच संपून जाईल हे आपल्या दूरदृष्टीने जाणले ते म्हणजे, मद्रास म्युझिक अकादमी कार्याध्यक्ष असलेले ई. कृष्ण अय्यर हे होत. त्यांनी ‘कल्याणी सिस्टर्स’ ह्या नावाने सुप्रसिद्ध असलेल्या दोन तरुण नृत्यांगनाना अकादमीत बोलावून त्यांचा रंगमंचावर कार्यक्रम घडवून आणला. तो कार्यक्रम पाहायला खूप काही प्रेक्षक आले होते असे नाही. ह्या उपक्रमामुळे मद्रास मध्ये कसलाही फरक पडला नाही. तरीसुद्धा भारतीय नृत्याच्या इतिहासात हि सर्वात महत्वाची घटना आहे या बद्दल संशय नाही. त्या दिवशी नृत्य हे मंदिरांतून तसेच राज दरबारांतून बाहेर आले होते. हे नृत्य जे धार्मिक कर्मकांडे यांच्याशी घट्ट बांधले गेले होते, ते बंधन तोडून, नृत्याने लोकाश्रयाच्या अंगणात पाउल टाकले. ह्या उपक्रमाला मद्रास म्युजिक अकादमीचा संपूर्ण पाठींबा होता. नृत्यकला जिवंत ठेवण्याचे आपले कर्तव्य आहे या भावनेतून, अकादमीच्या सदस्यांनी एक ठराव समंत केला. त्यात त्यांनी आधीचे ‘सादीर’ हे नाव खोडून ह्या नृत्य प्रकाराला भरतनाट्य असे नाव अर्पण केले.
आज सर्व साधारण पणे जो समज आहे कि भरतनाट्य हे नाट्यशास्त्रावर आधारित आहे, तो अजिबात खरा नाही. ‘सादीर’ नृत्य करणारे कलाकार महिला होत्या. काही वेळेला त्यांचे गुरु पुरुष कलाकार देखील असत. आणि त्यातही ब्राम्हण गुरु देखील असत. ह्या ब्राम्हण गुरूंना ‘भरतन’ असे संबोधले जात असे(देवदासी कुलाच्या गुरुजनांना ‘नत्तुवन’ असे संबोधले जाई). भरतनाट्य नृत्याला ब्राम्हण समुदायाचा असा संबंध जोडून, ब्राम्हण समाजात त्याला स्वीकृती मिळावी यासाठी, ह्या नृत्याचे नामकरण भरतनाट्य असे करण्यात आले.
हे असे सगळे झाल्यानंतर, तसेच ह्या नृत्याचा एका विशिष्ट जातीशी संबंध तोडून कृष्ण अय्यर यांनी नाट्यशास्त्र कर्ता भरत मुनी यांची ह्या नृत्याचा संबंध जोडला हा भाग वेगळा.
त्यांची हि युक्ती अतिशय यशस्वी झाली. ह्या नामकरणानंतर केवळ दहा वर्षातच मद्रास मधील ब्राम्हण समाज भरतनाट्य हे आपल्या पुरातन परंपरेतून आले असे समजू लागले, आणि तसे बोलूही लागले.
ह्या महत्वाच्या अश्या परिवर्तनाच्या युगात जाती, लिंग, तसेच आर्थिक संबंध यांनी कशी भूमिका निभावली हे समजायला पुढचे अर्धे शतक जावे लागले, ज्यात मद्रास मधील कलाजगतात तीन महिला कलाकारांच्या कामगिरीमुळे हे शक्य झाले.
सर्प्रथम बालसरस्वती यांच्या पासून सुरुवात करूयात. त्या भारतातील सर्वश्रेष्ठ नर्तकी पैकी आहेत असे निस्संकोचपणे म्हणता येईल. त्या जन्माने देवदासी होत्या आणि देवदासी संप्रदायाशी त्या शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिल्या. त्या मद्रास मध्ये आल्यावर, अकादमीच्या पदाधिकारी यांनी त्यांना चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच पुढे त्यांना नृत्य प्रशिक्षण संस्था सुरु करण्यासाठी जागादेखील देऊ करण्यात आली. तरीसुद्धा त्यांनी आपली कला रसिक रंजंक करून त्यावेळच्या समाजात(म्हणजे ब्राम्हण समाजात) लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धापर्यंत त्यांना आर्थिक चणचण सोसावी लागली, तसेच त्यांना समाजाचा तिरस्कार देखील सोसावा लागला. त्यामुळे कि काय, त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीला देखील त्यांनी नृत्य शिकवले नाही. आजच्या घडीला मद्रास मधील पालकांना आपल्या लहान मुलीना भरतनाट्य शिकवणे हे शिष्टसंमत झाले आहे, त्या पार्श्भूमी वर हा इतिहास ध्यानात घेणे जरुरीचे आहे.
दुसरी महिला म्हणजे श्रेष्ठ कर्नाटक गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी , ज्या देखील जन्माने देवदासीच होत्या. त्यांचा परिचय सदाशिव नावाच्या एका ब्राम्हण पत्रकाराशी झाला आणि पुढे त्यांच्या बरोबर विवाह देखील झाला. सदाशिव यांनी आपल्या युगाच्या अत्यंत अमुल्य अश्या संगीताच्या ठेव्याचे(म्हणजेच एम. एस. सुब्बलक्ष्मी यांची गायकी) जतन/वर्धन तर केलेच, तसेच ते त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येयच ठरवून घेतले होते. ते स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते, तसेच प्रसिद्ध पत्रकार राजगोपालचारी यांचे मित्र होते. ह्या सर्वांमुळे एम. एस. सुब्बलक्ष्मी यांची त्या काळातील अनेक मान्यवरांशी झाली. तसेच त्या स्वतः दिसायला अतिशय सुंदर होत्या. ह्या सर्वांचा उपयोग त्यांनी करून घेतला आणि आपली जन्मापासूनची देवदासी अशी ओळख त्यांनी पुसून काढत तमिळ ब्राम्हण समाजात आदर्श गायिका असे स्थान मिळवण्यात यशस्वी झाल्या. एखाद्या ब्राम्हण कलाकाराला मिळणारे स्थान त्यांनी प्राप्त केले.
तिसरी महिला कलाकार म्हणजे रुक्मिणीदेवी. ब्राम्हण कुटुंबात जन्म होऊन हि ते Theosophical Society of India या संस्थेचे सदस्य असलेल्या एका इंग्रज सद्गृस्थाबरोबर विवाहबद्ध झाले. देवदासींचीनृत्यकला पाहून त्या भारावल्या. ती कला त्यांनी आत्मसात करायची असा निर्धार केला. विदेशी पतीने दिलेल्या पाठिंब्यामुळे सामाजिक असंतोषाकडे दुर्लक्ष करायला सुलभ झाले. रुक्मिणीदेवी. ह्या काही श्रेष्ठ अश्या नृत्यांगना नव्हेत. तरी त्यांनी दोन गोष्टी केल्या. नृत्य आणि देवदासी यांचा जो ऐतिहासिक संबंध होता, तो त्यांनी पुढे आणला, तसेच नाट्यकलेला शुद्ध केले. भरतनाट्य कलेच्या प्रचारासाठी त्यांनी ‘कलाक्षेत्र’ नावाचे विद्यालय सुरु केले. आणि ते पुढे जाऊनअत्यंत यशस्वी ठरले. १९५५ मध्ये कलाक्षेत्र विद्यालयात १० विद्यार्थी होते. १९७६ साली ती संख्या १५० पर्यंत पोहोचली. त्यात एकही विद्यार्थिनी देखील देवदासी पार्श्वभूमी असलेली नव्हती हे विशेष!
रुक्मिणीदेवी यांचे दुसरे ध्येय होते ते ‘शुद्धीकरण’ .ते साध्य करण्यासाठी त्यांनी अवलंबलेल्या पद्धतीचे अनुकरण भारतातील इतर भागात झाले. संस्कृत पंडित(विशेषकरून ब्राम्हण), संगीतज्ञ, संगीत शिकवणारे गुरु या सर्वांच्या मदतीने ‘सादिर’ प्रकारात असलेली मुद्रा, भंगी, पदविन्यास वगैरे गोष्टी त्यांनी वापरून त्यांचे जतन केले. दक्षिण भारतात असलेल्या मंदिरातील शिल्पांतून दिसणाऱ्या मुद्रांचा अभ्यास करून त्यांचे नंदकिशोर यांच्या अभिनयदर्पण ह्या ग्रंथाशी संबंध जोडला. सांप्रदायिक ‘सदीर’ चे परिवर्तन त्यांनी मंदिरातील शिल्पांतून दिसणाऱ्या मुद्रा डोळ्यांसमोर ठेवून भरतनाट्य वेशभूषेत आवश्यक बदल देखील केले. नावाजलेल्या ब्राम्हण संगीतज्ञांना पाचारण करून त्यांनी नवीन रचना देखील बांधून घेतल्या. रुक्मिणीदेवी यांनी ‘सादिरनाच’ चे ब्राम्हणीकरण करून टाकले. एका दृष्टीने सुब्बलक्ष्मी यांनी जे आपल्या स्वतःच्या कलेबाबतीत केले, तेच
रुक्मिणीदेवी यांनी ‘सादिर’ याच्या बाबतीत केले असे म्हणावे लागेल.
केंद्र संगीत नाटक अकादमीचे भूतपूर्व अध्यक्ष डॉ. नारायण मेनन यांनी मला कथन केलेल्या एका घटनेमुळे मी कला आणि जातीभेद असे का बोलत असतो हे स्पष्ट होईल. १९६० मध्ये दिल्ली मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका चर्चा सत्रात रुक्मिणीदेवी यांनी अतिशय विस्ताराने आपण केलेल्या परिश्रमामुळे कसे ग्राम्य, अशुद्ध अश्या नृत्याला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याच्या उत्तरादाखल बालसरस्वती म्हणाल्या, ‘रुक्मिणीदेवी जे म्हणाल्या ते अतिशय खरे आहे. ह्या उच्च जाती मधील स्त्रियांनी आमचा व्यवसाय हिसकावून घेतला. आणि आमची कला मात्र आमच्या जवळच राहिली.’
ब्राम्हणी संस्कृतीच्या शिष्टाचार अंगी बाळगलेल्या सुब्बलक्ष्मी यांनी अशा वादविवादाचे प्रसंग जाणूनबुजून टाळले असे दिसते!
मद्रासच्या बुद्धीजीवी ब्राम्हण समाजाने भरतनाट्य हा कलाप्रकार म्हणून स्वीकार करायला तसा बराच अवधी लागला. तसेच साऱ्या भारतभर त्याबद्दल बोलू जाऊ लागले. पुढील एक दोन वर्षांतच शांतीनिकेतन मध्ये रवीन्द्रनाथ टागोर यांनी मणिपूर नृत्य प्रकारची पुन्हा प्रतिष्ठापना केली. मल्याळम कवी नारायण मेनन वल्लत्रोल यांनी कथकली च्या प्रसारासाठी केरळ कला मंडळ स्थापन केले. पुढील पंधरा एक वर्षांत कर्नाटकात के शिवराम कारंथ यांनी यक्षगान नृत्याच्या पुनर्जीवनासाठी स्वतःला वाहून घेतले. हे सर्व जण, इंग्रजी भाषा शिकलेले सुशिक्षित मध्यम वर्गीय लोकं होते हे विसरून चालणार नाही.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, आपल्या पारंपारिक कला ह्या राष्ट्राच्या सत्वाचे प्रतिनिधित्व करते अशी धारणा सरकार मध्ये होती आणि त्यामुळे त्याला सरकारने प्रोत्साहन देखील दिले. संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, ललित कला अकादमी ह्याच सुमारास आकारास आल्या. अज्ञानामुळे, दुर्लक्ष केल्यामुळे असेल, तसेच खेड्यापाड्यातून कुजत असलेली कला, शोधून काढून त्यांना प्रकाशात आणणे, प्रचार करणे, तसेच त्यात असलेल्या कलाकारांना आर्थिक आयाम प्रदान करण्याचे काम संगीत नाटक अकादमीने केले. शब्दशः भारताची अत्यंत प्राचीन अशी कला कुडीयात्तम पासून ते मध्ययुगातील धृपद, ग्रामीण पांडवाणी, इत्यादी कलाप्रकारांना नवजीवन मिळाले. इंदिरा गांधी यांनी आंतरराष्ट्रीय संबंध डोळ्यांसमोर ठेवून विविध देशांतून Festival of India सारखे उपक्रम राबवले. राजीव गांधी यांनी सुरु केलेले Zonal Cultural Council भारताची कला व्यापार हे सरकारी कृपादृष्टी असलेले उद्योग क्षेत्र झाले असे म्हणावे लागेल.
(क्रमशः)