मी अनुवादित केलेल्या अमीरबाई कर्नाटकी या कन्नड पुस्तकाचे प्रकाशन होवून आता एक वर्ष उलटून गेले आहे. एक दोन नवीन पुस्तकांच्या अनुवादाचे काम देखील सुरु झाले. मूळ कन्नड पुस्तकाचे लेखक जे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आहेत, ते रहिमत तरीकेरी परवा पुण्यात आले असता मला भेटले. त्यांनी मला सुचवले की मी केलेल्या अनुवादाच्या प्रक्रिये संबंधी लिहून काढावे. म्हणून हा आजचा ब्लॉग-प्रपंच. इतक्यातच आज मराठी भाषा दिन आपण साजरा केला. त्यानिमित्ताने अनुवाद साहित्याबद्दल देखील बोलले गेले. अनुवाद हा साहित्य प्रकार आता मराठी रुजू पहातोय, त्याला वाचकांची पसंती मिळते आहे, मराठी भाषा आणि साहित्य त्यामुळे समृद्ध होते आहे.
माझी मातृभाषा कन्नड आहे. पण मी पुण्यातच वाढलो, मराठी माध्यमात शिकलो. मी दहावीत असताना सुट्टीत कन्नड लिहायला आणि वाचायला शिकलो. दोन्ही भाषेची पुस्तके, मासिके आणि इतर साहित्य यांचे थोडेफार वाचन कायमच घरात होत असे. अनुवादाच्या आयडियाची कल्पना माझ्या ध्यानीमनी नसताना डोक्यात आली. त्याचे झाले असे की साधारण २००९ च्या सुमारास, ‘मयूर’ नावाच्या एका कन्नड मासिकात, मला गोहरबाई आणि बालगंधर्व यांच्यावर रहमत तरीकेरे यांचा एक लेख आढळला. बालगंधर्वावर कन्नडमध्ये असलेला तो लेख पाहून मला जरा आश्चर्यच वाटले. तो लेख वाचल्यानंतर, आणि रहमत तरीकेरे यांच्या बरोबर ईमेल आणि दूरध्वनीवर झालेल्या चर्चेत मला या विषयाची व्याप्ती समजली. स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा आताच्या कर्नाटकातील काही भाग बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये होता. मराठी आणि कन्नड जनात वेगवेगळया पातळीवर सांस्कृतिक देवाणघेवाण होत असे. संगीत नाटकं, बालगंधर्वांची नाटकं कन्नड प्रदेशात जात, तेथे प्रयोग होत, त्यांचा प्रेक्षक वर्ग तेथे होता. तर मी त्या लेखाचा मी मराठीत अनुवाद करून, तो लेख मी ग्रंथालीचे आणि ‘थिंक महाराष्ट्र‘चे दिनकर गांगल यांच्याकडे तो पाठवला. त्यावर त्यांनी संपादकीय संस्करण करून त्यांनी तो येथे प्रसिद्ध केला आणि मला बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. त्या विषयावर काम करणारे आणि त्याचा अभ्यास असणारया बऱ्याच व्यक्तींशी परिचय झाला. रहमत तरीकेरे यांनी अमीरबाई कर्नाटकी यांच्या चरित्रावर पुस्तक लिहित आहे असे कळवले. तत्काळ मी त्यांना त्याचा अनुवाद करण्याची परवानागी मागितली आणि ती त्यांनी आनंदाने दिली. आणि माझे सौभाग्य असे की ग्रंथाली यांनी देखील तो अनुवाद प्रकाशित करण्याची तयारी दर्शवली.
यथावकाश कन्नड मधील अमीरबाई यांच्या चरित्राचे प्रकाशन झाले(२०१२) आणि मला ते पुस्तक प्रो. तरीकेरे यांनी पाठवले. पुस्तक तर ३०० पानाच्या आसपास होते. माझ्या मनात धडकीच भरली, हे कसे आणि कधी होणार. मी संगणक क्षेत्रात कार्यरत आहे, आणि त्यामुळे वेळेचा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. पण मी मनाचा हिय्या केला आणि काम सुरु केले. रहिमत तरीकेरे यांच्या पुस्तकाची कन्नड भाषा तर ग्रांथिक होती. पुस्तक संशोधनात्मक होते, भरपूर तळटिपा, संदर्भ साहित्य यांची रेलचेल होती. भाषा ललितलेखांप्रमाणे सरळ आणि सोपी नव्हती. मूळ वाक्य, वाक्यरचना, त्याचा मतितार्थ समजायला बरेच कष्ट पडले. माझ्याकडे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाने प्रकाशित केलेला जुना कन्नड-शब्दकोश आहे, तो हाताशी घेतला. महाराष्ट्रातील, आणि मराठी, तसेच मुंबई, तेथील चित्रपटसृष्टी याचे संदर्भ बरेच असल्यामुळे पुढे पुढे समजायला सरळ होत गेले. सकाळी लवकर उठून १-२ तासांची बैठक मारून काम करायला लागलो, आणि हळूहळू अनुवादाला आकार येवू लागला. माझे सारे कुटुंबीय कर्नाटकातील विजापूरचे. त्यामुळे तेथील संदर्भांबद्दल चर्चा करता आली. कन्नड भाषेतील शब्दांच्या छटाबद्दल त्यांच्या बरोबर चर्चा करता आली. त्यातच मी २-३ महिन्यांसाठी अमेरिकेला गेलो, आणि काम बंद झाले. तेथून आल्यावर परत सुरु केले, आणखी माहितीबद्दल प्रो. तरीकेरे यांच्या बरोबर चर्चा सुरु झाल्या.
त्यातच २०१३ मध्ये मी, रहमत तरीकेरे यांचा पुण्यात सुदर्शन रंगमंच तर्फे चैतन्य कुंटे यांच्या बरोबर सुदर्शन संगीत सभा अंतर्गत, एक कार्यक्रम पुण्यात घडवून आणला. तो होता अमीरबाई आणि गोहारबाई यांच्या जीवनावर. त्याचे नाव होते -‘बिळगी भगिनी-शतमान स्मरण‘. त्यावेळेस ते पुण्यात आले होते, त्यामुळे प्रत्यक्ष चर्चा करता आली, आणि बरेच मुद्दे आणखीन समजले. याच पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर तरीकेरे यांनी बंगळूरू येथील लेखिका मंगला सर्वा यांच्याकडे दिले होते, त्यांचे देखील काम सुरु झाले होते. २०१४ मध्ये मी बंगळूरूयेथे गेले असता, प्रो. तरीकेरे, आणि मंगला सर्वा यांची भेट मंगला यांच्या घरी झाली. तेथे झालेली चर्चा अतिशय उद्बोधक होती. असे करता करता मुख्य पुस्तकाचे काम झाले आणि तो मसुदा मी ग्रंथालीचे संपादक अरुण जोशी यांच्याकडे पाठवला. त्यांची चिकित्सक नजरेने भाषिक दोष, वाक्यरचनेतील दोष, भाषांतरातील दोष, तसेच काही तपशीलातील दोष माझ्या निदर्शनास आणून दिले. तरीकेरे यांच्या सुचनेनुसार मुंबईचे प्रकाश बुरडे, धारवाड येथील प्रो. यार्दी, मुधोळचे आनंद झुंजूरवाड, मुंबईचे प्रकाश दिवाण इत्यादी जाणकारांना कच्चे खर्डे तपासून द्यायला पाठवले. त्या सर्वानी देखील बहुमोल सूचना दिल्या, आणि त्याचा देखील पुस्तक आकारास येण्यास उपयोग झाला. त्याच सुमारास मी रहिमत तरीकेरे यांनी लिहिलेल्या अमीरबाई कर्नाटकी यांच्या चरित्राचा संशोधनाचा निमित्ताने आलेल्या अनुभवांवर एक कन्नड लेख लिहिला, तो मी अनुवादित केला आणि तोही थिंक महाराष्ट्र वर येथे प्रसिद्ध झाला.
ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपुरकर यांनी मला कळवले की ग्रंथालीच्या ४०व्या वर्धापनदिनी डिसेंबर २५, २०१४ ला मुंबईत पुस्तक प्रकाशन करायचे आहे असे ठरले आहे. मुंबईत तो दिवस ग्रंथाली वाचकदिन म्हणून साजरा करते. दिवसभर कार्यक्रम असतो. संध्याकाळी पूर्वनियोजित पुस्तकांचे प्रकाशन असते. माझी त्यामुळे तारांबळ उडाल्यासारखी परिस्थिती झाली. अजून कितीतरी कामे राहिली होती. पुस्तकातील छायाचित्रांची यादी, त्यांची माहिती, छायाचित्रे ग्रंथालीला द्यायची होती. आणि मनोगत लिहायचे होते, मुखपृष्ठ करायचे होते. जसे काही काऊंटडाऊनच सुरु झाले होते. मुखपृष्ठासाठी पुण्यातील National Film Archives of India(NFAI) मधील आरती कारखानीस यांची माहिती तरीकेरे यांनी कळवली. आणि त्यांनी तत्परतेने एक अतिशय लोभस आणि दुर्मिळ असे अमीरबाई यांचे छायाचित्र उपलब्ध करून दिले. इतर सगळे सोपस्कार झाले आणि ग्रंथालीची आमंत्रण पत्रिका धडकली. रहमत तरीकेरे माझ्याकडे पुण्यात आले आणि आम्ही सर्वजण मुंबईस गेलो आणि प्रकाशन सोहळा संपन्न झाला. आणि गंगेत घोडे न्हाले.
हा अनुवाद करण्याचा माझा हेतू एवढाच होता की, अमीरबाई यांच्या चरित्राशिवाय, त्यांच्या आणि गोहरबाई यांच्या काळात महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील सांस्कृतिक देवाणघेवाण कशा प्रकारची होती यावर कर्नाटकातील संशोधकाच्या/अभ्यासकाच्या दृष्टीने टाकलेला झोत मराठी रसिकासमोर यावा. मला हा अनुवाद करताना खुपच मजा आली, दोन्ही भाषेच्या माझ्या आकालानात आणखीन भर पडली तसेच तो काळ समजून घेण्यातही मदत झाली. त्या दृष्टीने रहमत तरीकेरे यांच्या सोबत झालेल्या चर्चा, माझी पत्नी अनिता हिच्या बरोबर कन्नड भाषेतील बारकाव्यावर आणि शब्दार्थाच्या छटा यावर झालेल्या चर्चा खुपच उपयोगी पडल्या.
पुस्तक प्रकाशनानंतर यथावकाश पुस्तकाबद्दल अभिप्राय येवू लागले, फोन येवू लागले, मला एकूणच आणखीन मजा येवू लागली. पुस्तकाच्या दुकानात जाऊन मी माझे पुस्तक पाहू लागलो. पुस्तक प्रकाशित झाल्यावर पुण्यातील प्रसिद्ध संगीतज्ञ चैतन्य कुंटे यांना मी पुस्तक अभिप्रायासाठी दिले होते. त्यांनी काही दिवसापूर्वी, प्रत्यक्ष भेटी दरम्यान काही चुका निदर्शनास आणून दिल्या, पुस्तकातील काही निष्कर्षांबद्दल मला त्यांचे मत त्यांनी कळवले. ह्या सर्व गोष्टी मला रहमत तरीकेरे यांच्याशी बोलून, माझ्या अनुवादातील चुका दुरुस्त करून, दुसरी आवृत्ती करायची आहे, पाहुयात कसे जमते ते!