बेट्टद जीव

मला कन्नड येत असूनही माझे कन्नड वाचन विशेष नाही, अगदी नगण्यच म्हणा ना. कन्नड मधील सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, यक्षगान संशोधक, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त असे कोटा शिवराम कारंथ यांचे एक पुस्तक मिळाले, म्हणजे त्याचा मराठी अनुवाद मिळाला. मूळ कन्नड शीर्षक बेट्टद जीव, अनुवादित पुस्तकाचे शीर्षक डोंगराएवढा असे आहे. अनुवाद उमा कुलकर्णी यांचा आहे. कन्नड मध्ये बेट्ट म्हणजे डोंगर. एक-दोन वर्षांपूर्वी बेट्टद जीव नावाचा याच कादंबरीवर आधारित असलेला एक कन्नड सिनेमा पाहिला होता. पण पुस्तक वाचताना जास्ती मजा आली. मी वाचत होतो तो मूळ पुस्तकाच्या १९८० मधील अकराव्या आवृत्तीचा अनुवाद. पाहिली आवृत्ती १९४०च्या दशकातील.

स्वतांत्र्यापुर्वीच्या काळातील ही कथा. कर्नाटकतील दक्षिणेकडील दुर्गम अश्या भागातील एका खेड्यात घडते. तीला कथा असे म्हणावे का असा प्रश्न पडतो. कारण  त्या खेड्यात राहणाऱ्या वृद्ध जोडप्याच्या जीवनातील ४-५ दिवसाचे जीवनमान म्हणजे बेट्टद जीव. त्या दुर्गम भागात अपार कष्ट करत, आपल्याच मस्तीत, हसत खेळत, जगणारे ते जोडपे. अश्या ठिकाणी पाय रोवून उभे राहिलेले गोपालय्या आणि शंकरम्मा हे जोडपे, त्यांचे सुख, दु:ख सांगणारी ही कादंबरी. मंगळुरूकडून आग्नेय दिशेला असलेल्या पुत्तूर, सुब्रमण्य, सुळीया, धर्मस्थळ या भागात घनदाट जंगल, कुमार पर्वत या सारखे डोंगर, सुपारी, नारळ, मसाले, कॉफी यांच्या बागा, रबराचे मळे, कावेरी नदीचे खोरे यामुळे समृद्ध असा हा भाग. मी थोडासा या भागात हिंडलो आहे, १०-१२ वर्षांपूर्वी. वनराजीने, वन्यजीवनाने अतिशय समृद्ध असा सह्याद्रीचा दक्षिणेचा भाग आहे.

कादंबरीट प्रथम पुरुषी निवेदन आहे, म्हणजे स्वतः लेखक गोष्ट सांगतो आहे. तो सुब्रमण्यजवळ असलेल्या गावी जात असता, वाट चुकतो. त्याला देरण्णा, बट्ट्या हे दोघे भेटतात आणि जवळच असलेल्या केळबैलू या गावी राहत असलेल्या गोपालय्या आणि शंकरम्मा या हव्यक ब्राह्मण कुटुंबात रात्रीचा मुक्काम करून पुढे जावे असा सल्ला देतात. ते दोघे त्याला त्यांच्या घरी सोडून आपापल्या मार्गाला लागतात. ते दोघे मिळून त्याचे छान असे आदरातिथ्य करतात. या सगळ्याचे अतिशय रसभरीत वर्णन येते. तेथील निसर्गाचे, त्यांच्या जीवनपद्धतीचे, खाण्या-पिण्याचे तपशील येतात. निवेदनाच्या, संवादाच्या ओघात समजते की त्यांचा एक तरुण मुलगा १०-१२ वर्षांपासून दुरावलेला असतो, घराकडे फिरकलेला नसतो, काही संपर्क देखील नसतो. त्याचे त्यांना शल्य असते, जीव तुटत असतो.

आणखीन काही दिवस राहण्याचा निवेदकाला त्यांचा आग्रह मोडवत नाही. सकाळ संध्याकाळ त्यांच्याबरोबर आसपास मनसोक्त भटकतो, मलनाड प्रदेशाच्या निसर्गपर्यटनाचा आनंद घेतो. पती पत्नी उभायांतील कडू गोड संवाद, खटके, मुटके, एकमेकांचे चिमटे हे सर्व त्याला अचंबित करत होते. ते दोघे किती आनंदी जीवन जगात होते आहे त्या परिस्थितीत. कर्नाटकातील हव्यक ब्राम्हण लोकांतील रिती रिवाज यांचे रितीरिवाज, खाण्यापिण्याची वैशिष्ट्ये(उदा. काईहुळी म्हणजे नारळाची आमटी), त्यांच्या शेताची, बागेची कामे, तसेच हत्ती, साप, हरीण या सारख्या जंगलातील जनावरांचा त्रास, होणारे नुकसान यांचे वर्णन वाचायला मिळते. त्या भागात राहणाऱ्या मलेकुडीय नावाच्या आदिवासी लोकांबद्दल देखील समजते. गोपालय्या यांच्या मनाच्या मोठेपणाची, लोकांवर जीव लावण्याच्या वृत्तीची उदाहरणे कादंबरीत येत राहतात. नारायण नावाचा एक गडी त्यांच्या शेतावर काम करायला असतो, त्यांनी कसायला जमीन देखील दिलेली असते, त्याचे लग्न करून दिले असते, त्याच्या मुलांचे देखील ती दोघेही खूप करत असतात. पण नारायणला चिंता असते या दोघांच्या नंतर आपले कसे होणार. म्हणून तो आपले पैसे खर्च करून स्वतःची अशी शेतजमीन घेण्याचा विचार करत असतो. पण इकडे गोपालय्या यांनी त्याची देखील व्यवस्था लावलेली असते. असे करत करत निवेदकाचा त्यांच्याकडील ४-५ दिवसांचा मुक्काम संपतो, पुण्याला, मुंबईला जाऊन मुलाचा शोध घेण्याचे आश्वासन देतो आणि कादंबरी संपते.

प्रसिद्ध नट एच. जी. दत्तात्रय यांनी गोपालय्या यांची, तर रामेश्वरी वर्मा यांनी शंकरम्मा यांची भूमिका केलेल्या या चित्रपटात आणि कादंबरी यात थोडासा फरक आहे. चित्रपटात त्यांच्या मुलगा स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी घर सोडून जातो अशी पार्श्वभूमी आहे, पण कादंबरीत तसे काहीच नाही. उलट कादंबरीत नारायणच्या पत्नीवर या मुलाने अतिप्रसंग केला असतो असे आले आहे, आणि त्यामुळे नारायण आणि त्याची पत्नी तो परत गावी आला तर कसे होईल याची धास्ती बाळगून असतात.  अनेक पुरस्कार मिळालेला हा चित्रपट युट्युबवर येथे आहे. असो. या कादंबरीला कारंथ यांची छोटीशी प्रस्तावना आहे. त्यात ते म्हणतात, ‘…माझे मित्र शुंटीकोप मंजुनाथ यांच्या घरी दहा दिवस ठाण मांडून लिहून काढली. तिथे जाताना संपाजे घाटात बस बंद पडली होती. तेव्हा बसमधून उतरून सभोवताली नजर फिरवत असता, बेट्टद जीव हे नाव सुचले….ह्या कादंबरीतील गोपालय्या हे व्यक्तिमत्व रंगवण्यास सुब्रमण्य सीमेवरील कट्टद गोविंदय्या ही थोर व्यक्ती! त्यांचे बोलणे, वागणे, सच्चेपणा, धीरोदात्तपणा या कादंबरीच्या प्रेरणास्थानी आहे. …’

अशी ही शिवराम कारंथ यांची कादंबरी, खऱ्याखुऱ्या माणसावर आधारलेली.  शिवराम कारंथ यांच्याबद्दल लिहायचे म्हणजे वेगळाच दीर्घ लेख लिहावा लागेल. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी पैलू होते. बघू पुढे मागे.

Leave a comment